अ‍ॅपशहर

न्या. विजया कापसे-ताहिलरमाणी

मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील नळगीर गावच्या विजया कापसे-ताहिलरमाणी या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती झाल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती.

महाराष्ट्र टाइम्स 18 Aug 2018, 7:17 am
मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील नळगीर गावच्या विजया कापसे-ताहिलरमाणी या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती झाल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती. त्यांचे वडील एल. व्ही. कापसे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक तसेच नामांकित वकील होते. त्यांचाच वारसा न्या. विजया यांनी पुढे चालवला. आज त्या दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती बनल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vijaya-kapse-tahilramani


उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक होण्यापूर्वी त्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील होत्या. ९०च्या दशकात गाजलेल्या अनेक प्रकरणांत त्या सरकारची बाजू मांडत होत्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी व १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहंमद इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची या खटल्यात त्यांनी सरकारची बाजू मांडली होती. उल्हासनगरच्या रिंकू पाटील हत्या प्रकरणातही त्यांनी आरोपींना शिक्षा देण्यासाठी आपले कसब पणाला लावले होते. निवृत्त न्यायाधीश जे. डब्ल्यू. सिंग यांचे निलंबन, राठी हत्याकांड, गँगस्टर शरद मोहळ, प्रसिद्ध दिग्दर्शक सलीम खान यांचा अटकपूर्व जामीनअर्ज आणि लॉकअपमध्ये मारला गेलेला बाबू रेशीम अशा गाजलेल्या सर्व प्रकरणात त्यांनी सरकारची बाजू मांडली होती.

माफियाकडून मिळालेल्या पैशातून भरत शहा याने ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हा चित्रपट तयार केला होता. या प्रकरणात भरत शहाला एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या प्रकरणातही त्यांनी आरोपीला शिक्षा देण्यासाठी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता. राज्यभर गाजलेल्या बालहत्याकांड प्रकरणात सीमा व रेणुका या गावीत भगिनींना फाशीची शिक्षा झाली होती, या प्रकरणातही त्यांनी सरकारी वकील म्हणून मांडणी केली होती. सांगलीचे अमृता देशपांडे हत्या प्रकरणही त्यांनी हाताळले होते. फौजदारी खटल्यांमध्ये त्यांचे अलौकिक कसब होते. २००१ मध्ये त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या. तब्बल १७ वर्षे न्यायादान केल्यानंतर आता त्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती झाल्या आहेत. ही घटना महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज