आपल्या सशक्त लेखणीने मराठीतील वाचकांचे लक्ष वेधून घेतलेल्या कविता महाजन यांचे आकस्मिक निधन अत्यंत धक्कादायक आणि मराठी साहित्याचे नुकसान करणारे आहे. कविता, कथा, कादंबरी आणि बरेचसे अनुवाद, संपादन तसेच अन्य साहित्य असे भरीव कार्य त्यांनी आपल्या अल्पायुष्यात केले. नुकताच आपला ५१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या महाजन यांचा जन्म नांदेड येथे झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुढील शिक्षण प्रारंभी नांदेडमध्येच आणि पुढे औरंगाबादेत घेतले. मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पुढील आयुष्यात मराठी साहित्य हीच त्यांची ओळख झाली. वसईत दीर्घकाळ मुक्काम केलेल्या महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांतही काम केले होते. त्या निमित्ताने त्यांचा आदिवासी समाजजीवनाचा अभ्यास उत्तम होता. आदिवासी समाजाचे तसेच व महिलांचे प्रश्न त्यांनी मांडले. वारली लोकगीते, आदिवासी लोकगीतांचे संकलन व संपादन हे पुस्तक त्या कार्यातूनच घडले. ललित साहित्यात प्रारंभी कवयित्री म्हणून प्रस्थापित होत असतानाच त्यांच्या ‘ब्र’ व पुढे ‘भिन्न’ या कादंबऱ्यांनी वेगळा आविष्कार घडवला. बंडखोर लेखिका आणि अस्सल चित्रण ही त्यांची ओळख सर्वत्र झाली. कविता, कादंबरी लेखन करत असताना स्वत:तील संपादन आणि अनुवाद कौशल्यही त्यांनी सिद्ध केले. एका बाजूला आपल्या लेखनातून प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले तर दुसरीकडे साहित्याच्या विविध रूपांनाही साकारले. त्या अर्थाने त्यांचा साहित्य व्यवहाराचा परीघ मोठा होता. म्हणून त्यात बालसाहित्य, ब्लॉगलेखन आणि पाकशास्त्र यांचाही समावेश झाला. त्यांच्या साहित्याची दखल मराठी जगताने घेतली आणि त्यांना यथोचित पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या 'रजई' या त्यांनी केलेल्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कार मिळाला. शिवाय कवयित्री बहिणाई पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार असेही सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या निधनाने सर्जनशील कवयित्री, लेखिका आणि अनुवादक हरपला आहे. त्यांचे लेखनकार्य ऐन भरात असताना त्यांचे निघून जाणे चटका लावणारे आहे.
कविता महाजन
आपल्या सशक्त लेखणीने मराठीतील वाचकांचे लक्ष वेधून घेतलेल्या कविता महाजन यांचे आकस्मिक निधन अत्यंत धक्कादायक आणि मराठी साहित्याचे नुकसान करणारे आहे. कविता, कथा, कादंबरी आणि बरेचसे अनुवाद, संपादन तसेच अन्य साहित्य असे भरीव कार्य त्यांनी आपल्या अल्पायुष्यात केले.
महाराष्ट्र टाइम्स 29 Sep 2018, 10:13 am