अ‍ॅपशहर

मंगला बर्वे

मंगला बर्वे यांनी लिहिलेलं 'अन्नपूर्णा' हे पुस्तक म्हणजे, सासरी निघालेल्या मुलीसाठी पाचवा वेदच जणू! एवढे हुकमी पाककलाशिक्षण या पुस्तकाने मराठी गृहिणींना आजवर दिले आणि यापुढेही देत राहील. मंगला बर्वे या पुस्तकाच्या रुपाने अजरामर 'अन्नपूर्णा' बनल्या आहेत.

Maharashtra Times 29 Oct 2016, 4:31 am
मंगला बर्वे यांनी लिहिलेलं 'अन्नपूर्णा' हे पुस्तक म्हणजे, सासरी निघालेल्या मुलीसाठी पाचवा वेदच जणू! एवढे हुकमी पाककलाशिक्षण या पुस्तकाने मराठी गृहिणींना आजवर दिले आणि यापुढेही देत राहील. मंगला बर्वे या पुस्तकाच्या रुपाने अजरामर 'अन्नपूर्णा' बनल्या आहेत. मराठीत पाककृतींच्या पुस्तकांची परंपरा जुनी आहे. १९१०मध्ये लक्ष्मीबाई धुरंधर यांचे 'गृहिणीमित्र' हे पाककृतींचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर कमलाबाई ओगले यांचे 'रुचिरा' आले. मंगला बर्वे यांचे अन्नपूर्णा उशिराच म्हणजे १९७८मध्ये आले. परंतु या पुस्तकाला जे यश मिळाले, ते अनन्य आहे. याचे गमक त्यांच्या पाककृतींच्या नेमकेपणात आहे. हा नेमकेपणा मंगलाबाईंनी त्या-त्या पाककृती पुनःपुन्हा करून कमावला होता. एखादा पदार्थ सवयीने करता येतो, किंवा प्रत्येकाच्या हाताची चव पाककृतीत उतरते हे खरे, तरी किमान आपण दिलेल्या नेमक्या मापाने कुणी पदार्थ केला, तर त्याची चव बिघडणार नाही, याची पुरेपूर काळजी मंगलाबाईंनी घेतली होती. त्यामुळे नवगृहिणींसाठी आजही 'अन्नपूर्णा' हेच गाईड आहे. किंबहुना मंगला बर्वे म्हणजेच अन्नपूर्णा असे समीकरण जुळले आहे. आधी 'अन्नपूर्णा' व नंतर तशीच अनेक पुस्तके त्यांनी लिहिली असली, तरी मूळ आवड वेगळी असावी. वडील स. आ. जोगळेकर ('गाथा सप्तशती'चे अनुवादकर्ते) यांच्याकडून साहित्यगुणांचा वारसा आला होता. लग्नानंतर पती साहित्यिक अच्युत बर्वे यांच्यामुळे साहित्याची आवड फुलली. परंतु लग्नानंतर बर्वे यांच्याबरोबर त्यांच्या कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या हॉटेलांत जाणे वाढले. तेथील वैविध्यपूर्ण पाककृती बघून मंगलाताईंची ‌जिज्ञासा चाळवली आणि तोच श्रीगणेशा ठरला त्यांच्या लेखनाचा. मग त्यांनी आधी परंपरेने आलेल्या पाककृती लिहून काढल्या. परंतु, हॉटेलांत गेल्यावर तिथल्या खानसाम्यांकडूनही वेगवेगळ्या शाकाहारी-मांसाहारी पदार्थांच्या रेसिपी मिळवल्या. वहीत जमा केलेल्या या रेसिपी आधी वेगवेगळ्या मासिकांत प्रसिद्ध केल्या. त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे नंतर ‘मॅजेस्टिक’तर्फे ‘अन्नपूर्णा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे आणि आजही पाककृतींच्या विभागात सर्वाधिक खपाचा विक्रम याच पुस्तकाच्या नावावर आहे! विशेष म्हणजे, या एका पुस्तकाच्या रॉयल्टीपोटी मंगला बर्वे यांना तीसेक लाखाहून अधिक रुपये मिळाले. हा साहित्याच्या क्षेत्रातला विक्रमच आहे. अर्थात, मंगलाताईंसाठी पैशापेक्षा पाककृतीतला नेमकेपणा कायम महत्त्वाचा राहिला. त्यामुळेच कुणी अन्नपूर्णा वाचून एखादा पदार्थ केला की, त्यांचा पुढचा प्रश्न असायचा- ‘मग जमला ना बरोबर?’ आता ‘हो नेमका जमला’ असे उत्तर द्यायला आता मंगलाताई नाहीत. पण जोवर मराठी मुली लग्न करून सासरी जातील तोवर त्यांना ‘अन्नपूर्णा’ चवदार सोबत करीत राहील. मंगला बर्वे यांची आठवण दरवळत राहील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज