कवी नलेश पाटील यांचे अकस्मात जाणे अनेकांना धक्का देणारे ठरले, कारण त्यांचे असणे हेच अनेकांसाठी चैतन्यदायी होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत निसर्गकवी म्हणून त्यांची मुद्रा ठसठशीत होत गेली तरी त्याआधी सदैव इतरांना हसत हसवत ठेवणारा मित्र, अतिशय हुशार व्हिज्युअलायजर आणि कॉपीरायटर, आपल्या छोट्या छोट्या तत्त्वांसाठी आग्रही असलेला माणूस, उत्तम चाली सुचणारा शीघ्र कवी-गीतकार अशा त्यांच्या ओळखी निर्माण झालेल्या होत्या. ‘कवितांच्या गावा जावे’ या अरुण म्हात्रे यांनी सुरू केलेल्या कवितांच्या कार्यक्रमात नलेश पाटील सुरुवातीपासून सहभागी झाले होते. त्यांनी गाऊन म्हटलेल्या अत्यंत परिणामकारक अशा त्यांच्या निसर्ग कवितांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले रसिक निर्माण केले होते. ‘निळा बटवा सुटला, झाल्या चिल्लर चांदण्या’ अशा ओळी त्यांच्या मुखातून सहज पाझरायच्या आणि त्यातल्या चित्रमयतेने, अत्यंत वेगळ्या प्रतिमांनी रसिक लुब्ध व्हायचे. त्यांच्या प्रत्येक कवितेला वन्समोअर ठरलेला असायचा. नलेश पाटील यांच्या निसर्ग कविता त्यांच्या पूर्वसूरींहून वेगळ्या होत्या. त्यांतला रंगांचा लिप्ताळा, चित्रदर्शित्व आणि गेयता ही खास नलेश यांची होती. त्यांनी कलाक्षेत्रात व्हिज्युअलायजर म्हणून स्वतःचा अमीट ठसा उमटवला होता. त्यांच्या कवितांतही हे व्हिज्युअलायजेशन प्रत्ययकारक होऊन यायचे. मात्र, त्यांच्या हयातीत त्यांचा एकही कवितासंग्रह प्रकाशित झाला नाही. अनेक मान्यवर प्रकाशक त्यांच्या कविता छापण्यास उत्सुक असूनही ते स्वतःच याबाबत विशेष आग्रही नव्हते. जाहिरात क्षेत्रात मात्र नलेश पाटील हे फार मोठे नाव होते. व्हिज्युअलायजर आणि कॉपीरायटर म्हणून मुद्रा, त्रिकाया, ओएनएम, रिडिफ्युजन अशा मोठमोठ्या जाहिरात कंपन्यांत त्यांनी काम केले आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिके पटकावली. जाहिरात क्षेत्रात त्यांची जोडी गंगाधर मेनन या मान्यवर व्हिज्युअलायजरशी जमली आणि या दोघांनी मिळून आश्चर्यकारक कामे जाहिरात क्षेत्रात करून दाखवली. क्लोरोफील या जाहिरात क्षेत्रातील पहिल्या कन्सल्टिंग एजन्सीने नलेश पाटील यांना क्रिएटिव्ह डायरेक्टर पदावर सन्मानाने बोलावले. तिथे ते अखेरपर्यंत होते. पण एवढ्या मोठ्या पदावर काम करतानाही त्यांची राहणी साधी राहिली. गावच्या चावडीवर बसलेल्या पाटलाप्रमाणे ते खुर्चीवर पाय दुमडून तंबाखू मळत मोठमोठ्या लोकांशी दिलखुलास चर्चा करत. पण जाहिरात क्षेत्रात त्यांनी कधी आपले कवीपण मिरवले नाही की कवितेच्या गावात आपला जाहिरातक्षेत्रातला दरारा दाखवला नाही. खांद्याला झोळी वा पिशवी लावून सर्वत्र सहज संचार करणारा हा कलावंत आपल्यातून त्याच सहजतेने निघून गेला.
नलेश पाटील
‘निळा बटवा सुटला, झाल्या चिल्लर चांदण्या’ अशा ओळी त्यांच्या मुखातून सहज पाझरायच्या.
Maharashtra Times 10 Sep 2016, 4:00 am