संकुचित विचारधारांना आणि सुधारणांऐवजी समाजाला पूर्वग्रहदूषित धारणांच्या वाटेने घेऊन जाणाऱ्या प्रवृत्तींना लोकाश्रय मिळू लागलेला असतानाच्या कठीण काळात राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची निवड झाली आहे. आग्रहपूर्वक परंतु कोणताही अभिनिवेश टाळत अत्यंत परखड भाषेत मुद्दा मांडणे, हे देवी यांचे वैशिष्ट्य आहे. बोलीभाषा आणि छोट्या समुहांच्या म्हणून ओळखल्या जात असलेल्या हजारो भाषांचा गेल्या काही दशकांत झालेला अथवा होत असलेला लोप हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ती केवळ एक बाजू आहे. '
समविचारी व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांची भक्कम एकजूट उभारून आपण फॅसिस्ट शक्तींशी लढूया', असे जे आवाहन त्यांनी निवडीनंतर केले, ते काम ते स्वतः विविध प्रकारे करत आले आहेत. बडोद्यात महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठात १६ वर्षे इंग्रजीचे अध्यापन केल्यावर त्यांनी 'तेजगड अकादमी' स्थापून भाषा संवर्धनाच्या कामास स्वतःला वाहून घेतले. लीड्स तसेच येल विद्यापीठात त्यांनी याच विषयाचा जागतिक संदर्भात सखोल अभ्यास केला. खुल्या विचारांना होणारा विरोध, विचारांचा प्रतिवाद करण्याऐवजी हत्या करून विचार संपवण्याच्या वाढलेल्या प्रवृत्तींच्या विरोधात देशभर वातावरण निर्मिती करण्यासाठी, समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी 'दक्षिणायन' या चळवळीची स्थापना केली. लेखक, कलावंत, विचारवंत यांना त्या चळवळीशी जोडून घेतले. 'वानप्रस्थ' या पुस्तकामुळे गणेश देवी मराठीत सर्वदूर माहिती झाले.
मराठी, गुजराती तसेच इंग्रजी भाषांमधून त्यांनी आजवर वीस ग्रंथ लिहिले असून अलिकडे त्यांचे 'त्रिज्या' हे नवे मराठी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातला धागा म्हणून देवी यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्र सेवा दल आणि सेवादलाच्या उदार, समावेशक विचारसरणीकडे तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.