अ‍ॅपशहर

पुष्पा भावे

ज्यांचे कार्य आणि वाटचाल रुढार्थाने कोणत्याही पुरस्काराच्या चौकटीत बसू शकत नाही, अशी खूप कमी माणसे असतात. प्रा. पुष्पा भावे या त्यापैकी एक. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंतराव भालेराव यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणारा अनंत भालेराव पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे.

Maharashtra Times 13 Oct 2017, 11:48 pm
ज्यांचे कार्य आणि वाटचाल रुढार्थाने कोणत्याही पुरस्काराच्या चौकटीत बसू शकत नाही, अशी खूप कमी माणसे असतात. प्रा. पुष्पा भावे या त्यापैकी एक. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंतराव भालेराव यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणारा अनंत भालेराव पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pushpa bhave
पुष्पा भावे


अध्यापन आणि सामाजिक क्षेत्रात व्रतस्थपणे काम करताना माध्यमांच्या प्रकाशझोतात राहण्याचे सनसनाटी उद्योग पुष्पा भावे यांनी कधी केले नाहीत. पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाबाईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट अशा संस्थांचे काम करतानाही त्यांच्या वैचारिक दृष्टीचे दर्शन घडले. मराठीच्या अध्यापक म्हणून काम करीत असल्या तरी त्यांनी आपली अध्यापकाची भूमिका केवळ वर्गखोलीपुरती मर्यादित ठेवली नाही. समाजात मिसळून कार्यकर्त्याची आणि समाजशिक्षकाची भूमिका प्रभावीपणे बजावली. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही छोट्या-मोठ्या संस्थेने किंवा कार्यकर्त्याने साहित्यविषयक काही गंभीरपणे करायचे ठरवले तर पुष्पाबाई अशा ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. कार्यकर्त्यांचे बळ वाढवतात. त्यामुळेच महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या लेखक-कवींच्या दोन पिढ्या त्यांना आदरार्थी जिव्हाळ्याने ‘बाई’ म्हणून संबोधतात. साहित्यात नाटक हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्या क्षेत्रात त्यांचा प्रत्येक शब्द वजनदार मानला जातो. डॉ. श्रीराम लागू यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुष्पाबाईंच्या संपादनाखाली निघालेला 'आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू' हा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो. निडरपणा म्हणजे काय, याचे उदाहरण म्हणून पुष्पाबाईंकडे पाहता येते. मुंबईतला मराठी माणूस कमी होत असल्याची चर्चा आजही होते. परंतु त्याविरोधात पंचवीस वर्षांपूर्वी पुष्पा भावे आवाज उठवत होत्या आणि मराठी माणसांना मुंबईबाहेर घालवण्यास मराठी माणसांचे कैवारी म्हणवून घेणारेच जबाबदार असल्याचे सांगत होत्या. त्यांचा हा गौरव प्रत्येक कार्यकर्त्याला आपलाच गौरव वाटेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज