अ‍ॅपशहर

रा. अ. कुंभोजकर

सव्यसाची संपादक आणि लेखक रा. अ. कुंभोजकर यांच्या जाण्याने माध्यमांच्या स्थित्यंतराचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. कुंभोजकर ज्या काळात पत्रकारितेत आले, तो काळ अत्यंत अडचणीचा आणि कसोटीचा.

Maharashtra Times 11 Mar 2017, 12:00 am
सव्यसाची संपादक आणि लेखक रा. अ. कुंभोजकर यांच्या जाण्याने माध्यमांच्या स्थित्यंतराचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. कुंभोजकर ज्या काळात पत्रकारितेत आले, तो काळ अत्यंत अडचणीचा आणि कसोटीचा. पण एक अभ्यासू आणि भाषा, साहित्याची उत्तम बैठक असलेला पत्रकार किती अंगाने पत्रकारिता समृद्ध करू शकतो याचे ते आदर्श उदाहरण होत. माध्यमांमधील विविध पदांवर काम करताना सजग, सकस, अभिरुचिसंपन्न वाचक हाच केंद्रबिंदू मानत त्यांनी नित्यनेमाने शब्दसेवा बजावली. वाचकांना दर्जेदार आणि वाचनीय मजकूर देताना बुद्धीचा आणि समयसूचकतेचा कस लागायचा. त्यांचा मूळचा पिंड साहित्यिकाचा, वाचनही अफाट. त्यामुळे त्यांना शब्दांची उणीव कधी जाणवली नाही. बातम्या आणि संपादनात गुरफटलेले रा. अ. कुंभोजकर नाना या नावाने परिचित होते. पुढच्या टप्प्यात ते विशेष पुरवण्यांच्या पानोपानीच जास्त काळ रमले. विशेषतः त्यांनी दैनिकांच्या पुरवण्यांचे संपादन दीर्घकाळ केले. त्यांची जडणघडण ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर, डॉ. अ. वा. वर्टी आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या हाताखाली झाली. त्यामुळे, त्यांच्या एकूणच कामामध्ये कमालीची शिस्त आणि दर्जा असे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम r a kumbhojkar marathi literary critic no more
रा. अ. कुंभोजकर


बेळगावसारख्या सीमाभागात राहून त्यांनी दीर्घकाळ मराठी भाषेची सेवा केली. त्यांनी स्वतःच एका कार्यक्रमातील मनोगतात म्हटल्याप्रमाणे त्यांची वाङ्मयीन बैठक तयार व्हायला हेच तीन गुरू कारणीभूत झाले. त्यांनी किर्लोस्कर मासिकात आयुष्याचा अठ्ठावीस वर्षांचा प्रदीर्घ काळ घालवला. तो कालखंडही कथा-कादंबऱ्यांकडून नियतकालिकांच्या पुरवण्या संग्रही ठेवून वाचण्याचा. यामुळे पुरवण्यांना अपेक्षित असलेले साहित्यिक मूल्य आणि दर्जा ठेवण्यात कुंभोजकर यशस्वी ठरत गेले. त्यांची उमेदवारी सुरू झाली ती वि. स. खांडेकरांचे शिष्यत्व पत्करून. त्यांच्या सहवासात त्यांनी जी पाच-सहा वर्षे घालवली त्याबद्दल ते नेहमीच कृतज्ञतेने बोलत. लेखकाने चिंतनाशिवाय लिहू नये असे ते सांगत. एखादी गोष्ट नाट्यमय पद्धतीने मांडली म्हणजे ती कशी आकर्षक होते, याचे शिक्षण त्यांना भाऊसाहेबांकडे लेखन करताना मिळाले आणि ज्याचा वापर त्यांनी पुढे पत्रकारितेतही सक्षमपणे केला. विषय कोणताही असो, तो नेमकेपणाने आणि गांभीर्याने कसा मांडायचा, याचा वस्तूपाठच त्यांना या काळात मिळत गेला. ‘अमृत’मधील त्यांचे दिवस असे घडणीत गेले. त्यांना मुकुंदराव किर्लोस्करांच्या हाताखाली काम करता आले. खांडेकर आणि वर्टी यांच्याकडून मिळालेली गंभीर साहित्यविषयक जाण आणि किर्लोस्कर यांच्याकडून मिळालेला लोकसंग्रहाचा वारसा त्यांनी पुढे आयुष्यभर जपला म्हणूनच ते जेथे जातील, त्या दैनिकांशी किंवा नियतकालिकांशी माणसेही जोडत गेले, त्यांनी संपादक आणि लेखक अशी ओळख निर्माण केली ती यामुळेच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज