भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा खरा वारसदार जर कुणी असेल, तर तो ऋषभ पंत आहे, असे कुणी तरी मागे म्हणाले होते. ते खरे होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल; मात्र भारतीय संघात पुढील काही वर्षे ऋषभ पंतचे बस्तान बसणार, हे नक्की! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पंतने विजयी खेळी केलीच; पण कसोटी क्रिकेटमधील धोनीचा झटपट एक हजार धावा करण्याचा विक्रमही मागे टाकला. ब्रिस्बेनमधील या कसोटीत भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयात पंतचे मोठे योगदान आहे. ८९ धावांची नाबाद खेळी करून त्याने भारताला एक अविस्मरणीय असा विजय मिळवून दिलाच; पण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही भारताकडे राखण्यात पंतने मोलाचा हातभार लावला. अर्थातच, भारताच्या या विजयात सगळ्याच खेळाडूंचे योगदान वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचे आहे; पण पंतला मिळालेल्या संधीचे त्याने अक्षरशः सोने करून दाखविले. वृद्धिमान साहाऐवजी दुसऱ्या कसोटीपासून भारतीय संघात प्रवेश केलेल्या पंतकडून यष्टिरक्षणात बऱ्याच गफलती झाल्या खऱ्या; पण फलंदाजीतून त्याने ही कसर भरून काढली. तिसऱ्या कसोटीत भारतासमोर ४०७ धावांचे लक्ष्य असताना, ९७ धावांची खेळी करून पंतने ज्या जिगरबाज खेळीचे प्रदर्शन केले, त्याला तोड नाही. चौथ्या कसोटीतही पंत पुन्हा मदतीला धावून आला. त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यामागील उद्देशच तो होता, की त्याने झटपट धावा जमवत प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणावे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्याने ते डावपेच यशस्वी करून दाखविले. फटकेबाजी हे पंतचे अस्त्र असले, तरी तो कसोटी क्रिकेटमध्येही चपखल बसेल असा खेळाडू आहे, हे सिद्ध करण्यात तो यशस्वी ठरला आहे. १६ कसोटी सामन्यांत त्याच्या खात्यात १०८८ धावा जमा झाल्या आहेत. त्यात दोन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. ही कामगिरी त्याच्या वन डे आणि टी-२०तील कामगिरीपेक्षाही सरस आहे, यावरून त्याने कसोटी क्रिकेट गांभीर्याने घेतले आहे, असे म्हणायला वाव आहे. दिवसेंदिवस तो कामगिरीने श्रीमंत होत आहे.