नोंद : वसुधा पाटील
कथा, एकांकिका आणि बालसाहित्य असे लेखन करणाऱ्या वसुधा पाटील यांच्या निधनामुळे, वाचकांच्या पिढ्या घडविणाऱ्या लेखिकेने विराम घेतला आहे. मुंबईतील गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या त्या विद्यार्थिनी. तेथेच शिक्षिका म्हणूनही त्यांनी लौकिक मिळवला. रोजच्या जगण्यातील नाट्य टिपणारी कथानके, व्यक्तिरेखांचा नातेसंबंध, स्वभावधर्मानुसार होणारा त्यांचा विकास, ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. उत्कृष्ट साहित्याच्या तीन राज्य पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. उत्तम कथाकथन करणाऱ्या वसुधा पाटील यांनी एकांकिकांमधूनही कामे केली. 'आक्की', 'उडालेले रंग', 'मूर्तिकार', 'करपलेली पालवी', 'भवरीमाय', 'अखेरच्या क्षणी', 'बसंती', 'जमुना के तीर', 'प्राक्तन', 'मालवून टाक दीप', 'अगतिक', 'पक्षितीर्थ', 'गुलाम आणि इतर कथा', 'दीपगृह आणि समुद्रपक्षी' ही त्यांची काही पुस्तके. मुलांना वाचनाची गोडी लागावी, शब्दसंग्रह वाढवा आणि लेखनाच्या क्षमता विकसित व्हाव्यात, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उत्तम चित्रे काढणाऱ्या आणि रसाळ गायन करणाऱ्या पाटील बाईंनी विद्यार्थी घडविले. पुस्तके वाचणाऱ्या असंख्य मुलांच्याही मनात कायमचे घर केले. 'श्रीनिवास पानसेचं अंगण'सारख्या कथा आजही मुला-मुलींना स्मरतात. कथा आणि एकांकिका दोन्ही ताकदीने लिहिणाऱ्या लेखिका दुर्मिळ, असे नरहर कुरुंदकर म्हणत. त्या अशा दुर्मीळांपैकी होत्या. नव्वद वर्षांच्या झाल्या, तरी उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या वसुधा पाटील या जुन्या मुंबईची उपनगरी संस्कृती ज्यांनी विकसित, संपन्न केली, अशा पिढीच्या प्रतिनिधी होत्या. त्यांना श्रद्धांजली!