प्रत्येकच गायकाला आपल्या संगीत घराण्याबद्दल प्रेम आणि आपुलकी असते. परंतु जे कुणी सुहासिनी कोरटकर यांना भेटले असतील, ओळखत असतील, ते खात्रीने म्हणतील की - त्यांच्यासारखी घराण्याप्रति समर्पणाची भावना आजवर पाहिलेली नाही. विविध संगीत घराण्यांचे गायक आपल्या गाण्याने आपल्या घराण्याला मोठं करतात. परंतु सुहासिनी कोरटकर यांनी गाण्याबरोबरच अभ्यासानेदेखील आपल्या घराण्याला मोठं केलं. जयपूर-अत्रौली किंवा किराना, ग्वाल्हेर या घराण्यांच्या तुलनेत त्यांचं भेंडीबाजार घराणं काहीसं अलक्षित राहिलेलं.
खरं तर अंजनीबाई मालपेकरांपासून ते कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक घरंदाज गायकांनी याच भेंडीबाजार घराण्याची तालीम घेतलेली. परंतु नेपाळ ते त्रिवेंद्रम असं नाव गाजत असताना अंजनीबाईंनी ऐन तारुण्यात गायनाला राम राम ठोकला आणि इतरांनी काटेकोरपणे भेंडीबाजार शैलीचं गाणं न गाता, आपल्या आवाजाला साजेसा घराण्यातला बाज केवळ निवडला. त्यामुळे गुणवत्ता असूनही या घराण्याचं फार नाव झालं नाही. तीच रुखरुख सुहासिनी कोरटकर यांच्या मनात सतत होती आणि ते मिळवून देण्यासाठीच गेली काही वर्षं त्यांनी स्वतःला घराण्यासाठी वाहून घेतलं होतं. त्यांचं स्वतःचं भेंडीबाजार घराण्याच्या गायकीचं शिक्षण प्रसिद्ध गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे झालं. जवारीदार ताना आणि मेरुखंड अंगाने केलेली गाण्याची बढत, हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं. प्रसिद्ध ठुमरी गायिका नयनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचं खास नजाकतीचं अंगही शिकून घेतलं होतं. परंतु उमेदीच्या काळात आजारपणामुळे त्या फार गाऊ शकल्या नाहीत. तर नंतरच्या काळात आकाशवाणीवर म्युझिक विभागाच्या अधिकारी म्हणून लागलेल्या नोकरीमुळे त्या कामात व्यस्त राहिल्या. यामुळे इच्छा असतानाही त्या केवळ गाणं एके गाणं करू शकल्या नाहीत.
निवृत्तीनंतर मात्र ही सारी उणीव त्यांनी भरून काढली. साठीनंतर आपलं आयुष्य जणू त्यांनी आपल्या घराण्यासाठीच अर्पण केलं. मध्यंतरी भेंडीबाजार घराण्याला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी मुंबईत एका फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात त्यांचा प्रामुख्याने पुढाकार होता. तसंच आता सत्तरीतही त्यांनी आपल्या घराण्याचाच ध्यास घेतला होता. त्याच ध्यासाचं प्रत्यक्ष रूप म्हणजे त्यांनी पुस्तकरूपाने आकाराला आणलेला घराण्यासंबंधीचा बृहत् प्रकल्प. भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, त्याची शैली, या घराण्यातील थोर गायक... असा मोठा घाट त्यांनी घातला होता. अत्यंत मेहनतीने आकाराला आलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन येत्या २३ नोव्हेंबरला होणार होतं. परंतु तत्पूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र हे पुस्तक सुहासिनी कोरटकर यांच्या घराण्याबद्दलच्या समर्पणभावाचं प्रतीक ठरेल एवढं नक्की!
खरं तर अंजनीबाई मालपेकरांपासून ते कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक घरंदाज गायकांनी याच भेंडीबाजार घराण्याची तालीम घेतलेली. परंतु नेपाळ ते त्रिवेंद्रम असं नाव गाजत असताना अंजनीबाईंनी ऐन तारुण्यात गायनाला राम राम ठोकला आणि इतरांनी काटेकोरपणे भेंडीबाजार शैलीचं गाणं न गाता, आपल्या आवाजाला साजेसा घराण्यातला बाज केवळ निवडला. त्यामुळे गुणवत्ता असूनही या घराण्याचं फार नाव झालं नाही. तीच रुखरुख सुहासिनी कोरटकर यांच्या मनात सतत होती आणि ते मिळवून देण्यासाठीच गेली काही वर्षं त्यांनी स्वतःला घराण्यासाठी वाहून घेतलं होतं. त्यांचं स्वतःचं भेंडीबाजार घराण्याच्या गायकीचं शिक्षण प्रसिद्ध गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे झालं. जवारीदार ताना आणि मेरुखंड अंगाने केलेली गाण्याची बढत, हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं. प्रसिद्ध ठुमरी गायिका नयनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचं खास नजाकतीचं अंगही शिकून घेतलं होतं. परंतु उमेदीच्या काळात आजारपणामुळे त्या फार गाऊ शकल्या नाहीत. तर नंतरच्या काळात आकाशवाणीवर म्युझिक विभागाच्या अधिकारी म्हणून लागलेल्या नोकरीमुळे त्या कामात व्यस्त राहिल्या. यामुळे इच्छा असतानाही त्या केवळ गाणं एके गाणं करू शकल्या नाहीत.
निवृत्तीनंतर मात्र ही सारी उणीव त्यांनी भरून काढली. साठीनंतर आपलं आयुष्य जणू त्यांनी आपल्या घराण्यासाठीच अर्पण केलं. मध्यंतरी भेंडीबाजार घराण्याला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी मुंबईत एका फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात त्यांचा प्रामुख्याने पुढाकार होता. तसंच आता सत्तरीतही त्यांनी आपल्या घराण्याचाच ध्यास घेतला होता. त्याच ध्यासाचं प्रत्यक्ष रूप म्हणजे त्यांनी पुस्तकरूपाने आकाराला आणलेला घराण्यासंबंधीचा बृहत् प्रकल्प. भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, त्याची शैली, या घराण्यातील थोर गायक... असा मोठा घाट त्यांनी घातला होता. अत्यंत मेहनतीने आकाराला आलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन येत्या २३ नोव्हेंबरला होणार होतं. परंतु तत्पूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र हे पुस्तक सुहासिनी कोरटकर यांच्या घराण्याबद्दलच्या समर्पणभावाचं प्रतीक ठरेल एवढं नक्की!