कोणत्या विचाराकडे आकर्षित व्हावे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते, पण एकदा त्या विचाराने स्वत:ला बांधून घेतले की तहहयात त्याच्याशी एकनिष्ठ राहून नि:स्वार्थपणे कार्य करीत राहणारे विरळेच. सुरेशराव केतकर हे त्यापैकी एक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत सक्रिय राहिलेले केतकर मूळचे पुण्याचे. बी.एस्सी., बी.एड. झाल्यानंतर शिक्षक म्हणून त्यांना सहज नोकरी मिळाली, पण त्यात त्यांचे मन रमले नाही. नोकरी सोडून त्यांनी संघाचे पूर्णवेळ काम हाती घेतले. त्यासाठी अविवाहित राहण्याचा मार्ग पत्करला. सांगली जिल्ह्यात या कामाला त्यांनी सुरुवात केली. १९६०च्या सुमारास लातूरमध्ये जाऊन त्यांनी तेथील परिस्थिती पाहिली आणि याच मागास भागात काम करण्यास मोठा वाव आहे, हे लक्षात आल्यामुळे तेथे कामाला सुरुवात केली. संघाच्या लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या विभागाचे ते मुख्य प्रचारक होते. लातूरमध्ये त्या काळात पुरेशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या. विशेषत: ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची परवड होत असे. त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी रुग्णसेवा करावी, यासाठी केतकरांनी प्रेरणा दिली. त्यांच्या आग्रहातूनच पुण्यातील डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. गोपीकिशन भराडिया आणि डॉ. आलुरकर यांनी विवेकानंद रुग्णालय सुरू केले. या कार्याचे श्रेय केतकरांनाच द्यावे लागेल. आरोग्य क्षेत्राशिवाय त्यांनी क्रीडा भारती, अ.भा. किसान संघ, संस्कार भारती अशा विविध शाखांमध्ये काम केले. शिक्षणावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. शिक्षकांनी विद्यार्थी घडविताना त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करावे, आपल्या विषयात अध्यापकाने पारंगत असावे आणि आपण जे विद्यार्थ्याना सांगू ते आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. सुंदर, वळणदार अक्षर, नीटनेटकेपणा, वागण्या-बोलण्यातील, राहणीमानातील शिस्त, वक्तशीरपणा ही त्यांची वैशिष्ट्ये, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कायम लक्षात राहात असत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. संघाची सायंकालीन प्रार्थना घेण्याविषयी ते इतके आग्रही होते की, हेदेखील त्यांचे एक स्वभाववैशिष्ट्य ठरले. हल्ली समाजसेवेला एक ग्लॅमर आले आहे. एखाद्या किरकोळ कामाला मोठी प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा असते, पण साध्या राहणीतून किती लोकसंग्रह उभा राहू शकतो, किती मोठे काम उभे राहू शकते हे केतकरांनी नम्रपणे दाखवून दिले. ज्या भागात ते काम करीत होते तो कॉंग्रेसचा बालेकिल्ला, परंतु त्यांनी वादाला कायम दूर ठेवले. संयमी, विनम्र आणि मितभाषी स्वभावाच्या केतकरांनी समाजातील दुर्बलांना मदत करण्यासाठी आयुष्य वेचले. कधी प्रकाशझोतात येण्याची धडपड नाही, प्रसिद्धीचा हव्यास नाही, की मोठ्या पदाची अपेक्षा. त्यामुळे ते संघपरिवारातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व ठरले.
सुरेशराव केतकर
नोकरी सोडून त्यांनी संघाचे पूर्णवेळ काम हाती घेतले.
Maharashtra Times 23 Jul 2016, 12:00 am