पं. राजन आणि पं. राजन मिश्र मैफलीत गायले बसले, की त्यांच्या शुभ्र पोशाखाचा, त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक भावाचा आणि गायनातील अद्वैतपणाचा असा काही प्रभाव समोरच्या श्रोतृवृंदावर पडे, की आपण प्रात:समयी एखाद्या शुभकार्यासाठी शुचिर्भूत होऊन बसलो आहोत व त्या वातावरणातला मंगलध्वनी रोमारोमांत भिनून एका आगळ्या आध्यामिक आनंदाचा प्रत्यय येतो आहे, असे वाटे. त्यात प्रत्यक्ष त्यांचे गायन सुरू झाल्यावर तर त्यांच्या बनारस घराण्याच्या लखलखत्या, ओजस्वी सुरांनी रंगणारा ख्याल म्हणजे केवळ स्वर्गीय अनुभूतीच! शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात आपल्याला एकल गायन ऐकण्याची सवय अधिक; मात्र राजन व साजन मिश्र यांनी कायमच सहगायन केले. वाद्यवादनात बहुतांश जुगलबंदी चालते, तसे हे गायन नव्हते. दोन देह; मात्र एकरूप झालेला स्वररूपी आत्मा, असे हे थक्क करणारे वेगळेच रूप होते. आता हे अद्भुत गायन पुन्हा ऐकायला मिळणार नाही, हे आपले दुर्दैव! गंगेकाठी वसलेल्या बनारस या प्राचीन नगरीत जी कलासंस्कृती बहरली, त्यात संगीतकलाही होती. याच बनारसमधील संगीतप्रेमी मिश्र घराण्यात १९५१ मध्ये राजन यांचा जन्म झाला. आजोबांचे भाऊ बडे रामदास मिश्र आणि वडील हनुमानप्रसाद मिश्र यांच्याकडून अगदी लहान वयातच त्यांना गायकीचे धडे मिळाले. त्यांचे काका गोपालप्रसाद मिश्र प्रसिद्ध सारंगीवादक होते. त्यांच्याकडूनही त्यांना संगीताचे धडे मिळाले. राजन व साजन हे दोन्ही बंधू नंतर दिल्लीला स्थायिक झाले. सुमारे ४० वर्षांहून अधिक काळ त्यांचे नाव हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात दुमदुमत राहिले. त्यांनी देश-परदेशांत अनेक मैफली गाजविल्या. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात जवळपास दर वर्षाआड त्यांची हजेरी असायची. त्यांच्या सुरेल गायनाने हजारोंचा श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होत असे. 'पद्मभूषण', संगीत नाटक अकादमीसारखे अनेक पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. अशा या मोठ्या गायकाचा देहान्त रविवारी ज्या दुर्दैवी परिस्थितीत झाला, ती कटू आठवण रसिकांच्या मनातून कधीच जाणार नाही. पं. राजन यांना श्रद्धांजली!