अवयवांनी शरीरांची साथ सोडली, की मनाला पांगळेपण येणारच. अशा खंगल्या मनांमध्ये उमेदीचे झरे निर्माण करणारी वसाहत म्हणजे आनंदवन. याच आनंदवनात सध्या मूक रुदन सुरू आहे. बाबा आमटे या सेवाव्रतीची नात, शीतलने सेवाभूमीत आत्मघात ओढवून घेतल्याने, समाजमन सुन्न झाले. पिढीजात रटाळपणावर नव्हे, तर नवतेच्या शुभारंभावर विश्वास असणाऱ्या, एकाच वेळी दहा कामे हातावेगळी करण्याची उमेद जोपासणाऱ्या आणि सेवेचा वारसा भक्कम समृद्धीत परावर्तित करण्यासाठी वेगाने धडपणाऱ्या त्या युवा समाजसेवक होत्या. डॉ. विकास आणि भारती आमटे यांच्या या कन्येकडून समाजाला मोठ्या अपेक्षा होत्या. महारोगी सेवा समितीचे प्रमुखपद आल्यापासून या अपेक्षांमध्ये वाढ झाली होती. ‘श्रमही श्रीराम है’ ही घोषणा बाबा आमटेंनी दिली होती. शीतल यांचा कायम कल स्मार्ट परिश्रमाकडे होता. त्यांना उत्तुंग झेप घ्यायची होती; मात्र वेगाचेही विलक्षण आकर्षण होते. या झपाट्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविला. पती गौतम करजगी यांच्या समर्थ सोबतीतून आनंदवनाला नवा चेहरा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही जण दुखावले गेले. कौटुंबिक कलहाची ठिणगी पडली. त्यातून नैराश्य वाट्याला आले. ‘मी मृत्युशय्येवर असताना दहा लाख झाडे लावलेली असतील. सामाजिक तळमळीचा कौटुंबिक वारसा मी नेटाने निभावेन,…’ या दृढसंकल्पांचा परवा आनंदवनात अपमृत्यू झाला. शीतल यांनी अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठातून नेतृत्वगुणांचे शिक्षण घेतले होते. अनेक पुरस्कार मिळविले होते. कठोर वास्तवात शीतलता लोप पावली. आनंदवनातील दुभंगही लवकर संपायला हवा. शीतल आमटे-करजगी यांना श्रद्धांजली!
वेगवान : शीतल आमटे-करजगी
अवयवांनी शरीरांची साथ सोडली, की मनाला पांगळेपण येणारच. अशा खंगल्या मनांमध्ये उमेदीचे झरे निर्माण करणारी वसाहत म्हणजे आनंदवन. याच आनंदवनात सध्या मूक रुदन सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स 2 Dec 2020, 11:17 am