उजव्या विचारसरणीकडे साहित्यिक, कलावंतांची वाणवा असल्याचा आक्षेप घेणारांसाठी रमेश पोखरियाल उर्फ कवी निशंक हे आजच्या काळातील सणसणीत उत्तर आहे. एवढा गाढा व्यासंग, संशोधक वृत्ती आणि जे गवसले ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मांडण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. ज्योतिष्य विद्येसमोर विज्ञान खुजे आहे आणि ज्योतिष हेच मोठे विज्ञान आहे, असे क्रांतिकारी विचार भारतीय संसदेत मांडणारे रमेश पोखरियाल यांच्या कर्तृत्वाची पारख नरेंद्र मोदी यांनी केली आणि आपल्या सरकारच्या दुसऱ्या पर्वात त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. गेल्यावेळी डार्विनच्या सिद्धांताला आव्हाने देणारे डॉ. सत्यपाल सिंह या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्या अनेक पावले पुढे असलेल्या पोखरियाल यांच्याकडे देशातल्या संपूर्ण शिक्षणाचीच धुरा सोपवली आहे. त्याचमुळे मुंबई आयआयटीच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये येऊन ते ऋषिमुनींनी अंतराळाबाबत संशोधन केल्याचे आणि अणू-परमाणूचा शोध चरक ऋषिंनी लावल्याचे छातीठोकपणे सांगतात, तेव्हा कौतुक वाटल्यावाचून राहात नाही. १९९१ पासून सक्रीय राजकारणात असलेले पोखरियाल उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही होते. राजकारणात व्यस्तता असली तरी कादंबरी, कथा, कवितासंग्रह अशी तब्बल ४४ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. देश हम जलने न देंगे, मातृभूमी के लिए, ऐ वतन तेरे लिए, संघर्ष जारी है या कवितासंग्रहांच्या नावावरून त्यांच्या साहित्याची जातकुळी लक्षात येऊ शकते. नरेंद्र मोदी, स्मृती इराणी यांच्याप्रमाणे पोखरियाल यांच्या पदव्यांबाबतही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कोलंबोच्या (श्रीलंका) ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने एकदा साहित्यासाठी आणि दुसऱ्यांदा विज्ञानातील योगदानासाठी त्यांना डी. लिट्. देऊन सन्मानित केले. अर्थात ही बोगस युनिव्हर्सिटी असली तरी पोखरियाल यांचा गौरव सार्थच ठरतो. ज्याला कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती नसते, त्याला निशंक म्हणतात. त्याअर्थाने पोखरियाल हे ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील ‘निशंक’ व्यक्तिमत्त्व आहे.
निशंक
उजव्या विचारसरणीकडे साहित्यिक, कलावंतांची वाणवा असल्याचा आक्षेप घेणारांसाठी रमेश पोखरियाल उर्फ कवी निशंक हे आजच्या काळातील सणसणीत उत्तर आहे. एवढा गाढा व्यासंग, संशोधक वृत्ती आणि जे गवसले ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मांडण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे.
महाराष्ट्र टाइम्स 12 Aug 2019, 10:22 am