अ‍ॅपशहर

उर्मिला आपटे

महाराष्ट्रात एकमेकांच्या साथीने आयुष्यभर अजोड सामाजिक काम करणारी जी विलक्षण दांपत्ये झाली आहेत, त्यात उर्मिला आणि दिवंगत बाळ आपटे यांचे नाव अग्रभागी आहे.

Maharashtra Times 10 Mar 2018, 12:17 am
महाराष्ट्रात एकमेकांच्या साथीने आयुष्यभर अजोड सामाजिक काम करणारी जी विलक्षण दांपत्ये झाली आहेत, त्यात उर्मिला आणि दिवंगत बाळ आपटे यांचे नाव अग्रभागी आहे. उर्मिलाताईंनी गेली पाचहून अधिक दशके वेगवेगळ्या भूमिकांमधून जे सामाजिक काम केले त्याचा उचित गौरव त्यांना मिळालेल्या 'नारी शक्ती सन्माना'ने झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम urmila apte
उर्मिला आपटे


आंतरराष्ट्रीय महिलादिनी राष्ट्रपतींनी त्यांचा आणि सिंधुताई सपकाळ यांचा या पुरस्काराने सन्मान केला. उर्मिलाताई अनेक दशके आणि गेली तीनहून अधिक दशके विशेषकरून महिलांसाठी सातत्याने कार्य करीत असल्या तरी त्या आणि त्यांनी उभी केलेली 'भारतीय स्त्री शक्ती' ही देशव्यापी संघटना प्रसिद्धीच्या झोतापासून सदैव दूर राहिली. आज दहा राज्यांमध्ये स्त्री शक्तीचे काम उभे राहिले असून लक्षावधी महिला या कामाशी जोडल्या गेल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या परिवारामध्ये महिलांचे सबळीकरण, त्यांचे मूलभूत अधिकार, त्यांचे सामाजिक स्थान आणि महिलांना मिळणाऱ्या विकासाच्या संधी याविषयी फारशी आस्था नाही, असा एक समज आहे. उर्मिलाताईंनी आपल्या सहकाऱ्यांसहित उभे केलेले काम म्हणजे या गैरसमजाला दिलेले विश्वासार्ह उत्तर आहे.

एकतर उर्मिला (धारप) ही प्रखर बुद्धिमान विद्यार्थिनी आपले भाऊ आणि त्यांच्या मित्रांसमवेत बरोबरीच्या नात्याने वाढली. सर्वांसमवेत विद्यार्थी परिषद व इतर संघटनांचे काम केले. पुढे बाळ आपटे यांच्याशी विवाह झाल्यानंतर या दोघांचे माहीमचे घर म्हणजे तरुण मुला-मुलींना प्रेम, आधार आणि विश्वास मिळणारे हक्काचे ठिकाण झाले. स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेचा उर्मिलाताईंवरचा संस्कार त्यांनी 'भारतीय स्त्री शक्ती' उभी केल्यावर संघटनेच्या कामातून साऱ्यांना दिसला. महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, समानता आणि आत्मसन्मान ही संघटनेची पंचसूत्री संघटनेचा विचार सांगण्यास पुरेशी आहे. ही तत्त्वे वापरून 'स्त्री शक्ती'ने वनवासी, ग्रामीण, शेतकरी ते शहरी, उद्योजक अशा सर्व प्रकारच्या महिलांमध्ये काम उभे केले आहे. स्त्रीहिताचे अनेक कायदे होण्यासाठी अथक प्रयत्न केले. कुटुंबव्यवस्थेतील विधायक ते जपून स्त्रियांचा अवकाश मात्र व्यापक करत न्यायचा, ही अवघड कामगिरी 'स्त्री शक्ती' करीत आहे. या शक्तीला पहिली समर्थ हाक घालणाऱ्या उर्मिलाताई यांचे अभिनंदन व पुढील कामासाठी सदिच्छा!
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज