कुठल्याही गोष्टीचा मोह नसणे आणि आपल्याजवळ जे म्हणून काही आहे, त्याचा त्याग करणे हीच खरी साधू वृत्ती. ती वासुदेवराव चोरघडे यांच्या नसानसांमध्ये भिनलेली होती. महत् कष्टाने प्राप्त केलेले ज्ञान आणि विद्वत्ता सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. ही विद्वत्ता त्यांनी वैराग्याप्रमाणे सर्वसामान्यांमध्ये वाटून टाकली. ती त्यांना जशी प्राप्त झाली तशीच वाटली नाही, तर ती आणखी सुलभ करून वाटली. सामान्य माणसांना संस्कृतमधील अवघड, बोजड वाटणारे ज्ञान त्यांनी साध्या आणि सोप्या मराठीत उपलब्ध करून दिले. ज्ञानाचा प्रसार करताना वैराग्यवृत्तीची जाणीव ठेवत कुठलाही अभिमान न बाळगण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते ‘ज्ञानसाधू’ या उपाधीस पात्र ठरले. एखाद्या व्यक्तीची पात्रता, त्याला काय काय येते यावरून ठरत असते. चोरघडे यांच्याबाबतीत मात्र त्यांना काय येत नाही हे शोधावे लागत असे. पोस्ट खात्यासारख्या रुक्ष ठिकाणी काम करणाऱ्या या व्यक्तीने आपली पदवी कला शाखेत प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. ते हिंदीतही रमले. वैदिक संस्कृत वाङ्मय आणि दर्शनशास्त्र त्यांनी सखोल अभ्यासले. वेद व उपनिषदांतील तत्त्वविचार, दर्शनशास्त्रातील मीमांसक तर्कसंगत भाष्य, संस्कृत साहित्यातील रसाळ समीक्षा ही त्यांची वैशिष्टे ठरली. दत्त संप्रदायाचे ते अंतरंग भाष्यकार होते. त्यांच्या नावावर सतरा पुस्तकांची नोंद आहे. त्यातील दोन पुस्तिकांचे कन्नड आणि गुजरातीत भाषांतर झाले. पुरस्कार आणि उपाधींचा त्यांच्यावर वर्षाव झाला. शेवाळकर प्रतिष्ठानने त्यांना ‘ज्ञानसाधू’ म्हणून गौरविले होते. संस्कृत विद्यापीठाने भाषाभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कार दिला. राज्य शासनाने संस्कृत साधना पुरस्काराने गौरविले. घटाटे स्मृती पुरस्कार, वासुदेवानंद सरस्वती वाङ्मय प्रबोधिनी पुरस्कार यासह असंख्य पुरस्कार त्यांच्या नावावर नोंदले आहेत. विद्वत्तता आणि पांडित्याचा मिलाफ असलेले वासुदेव चोरघडे लोकांमध्ये सहज मिसळत. त्यांना कुणीही कुठलीही शंका विचारू शकत असे आणि उत्तर प्राप्त करून समाधान करून घेऊ शकत असे. सामान्यांमध्ये असलेली संस्कृत भाषेविषयीची अडचण आणि धास्ती कमी करण्यासाठी त्यांनी अव्याहत प्रयत्न केले. त्यांच्या जाण्याने एक तत्त्वचिंतक हरपला आहे.
वासुदेवराव चोरघडे
कुठल्याही गोष्टीचा मोह नसणे आणि आपल्याजवळ जे म्हणून काही आहे, त्याचा त्याग करणे हीच खरी साधू वृत्ती. ती वासुदेवराव चोरघडे यांच्या नसानसांमध्ये भिनलेली होती. महत् कष्टाने प्राप्त केलेले ज्ञान आणि विद्वत्ता सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला.
महाराष्ट्र टाइम्स 10 Nov 2018, 10:09 am