पोलिस खात्याची नोकरी करताना खाकी वर्दीच्या रूबाबात आणि पोलिस डायरीच्या माहोलात राहताना मूळची संवेदना जपणे, ती जाणीवपूर्वक फुलवणे आणि तिला प्रतिभेचे धुमारे फुटू देण्यासाठी तितकेच मोकळे अवकाश मिळवून देणे, या साऱ्याच गोष्टी असाध्य वाटाव्यात अशाच; पण विलास मोहिते त्याला अपवाद ठरले. हा अपवाद त्यांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक घडवला असावा, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून जाणवते. त्याहीपेक्षा त्यांच्या निवडक पण कसदार लेखनातून हा धागा अधिक स्पष्टपणे उलगडतो. निवृत्त पोलिस अधीक्षक विलास मोहिते यांच्या निधनाने साहित्याच्या प्रांगणात लीलया मुशाफिरी करणारा एक अधिकारी अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. मराठी साहित्यात पन्नास वर्षांपूर्वी सत्यकथा मासिक हा गुणवत्तेचा मानदंड मानला जायचा. विलास मोहिते यांच्या अनेक कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाल्या आहेत, यावरून त्यांच्या साहित्याची गुणवत्ता लक्षात यावी. एखादा माणूस अनेकांच्या मनावर ठसतो तरी कसा? याचे उत्तर शोधायचे तर विलास मोहिते नावाचा हा माणूस समजून घ्यावा लागेल. पोलिस खात्यात नोकरी करताना त्यांनी सेवाभाव प्रयत्नपूर्वक जपलाच; पण साहित्याच्या क्षेत्रातही माणसांच्या विश्वात रमणारा अधिकारी अशीच प्रतिमा त्यांनी राखली. वृत्तपत्रांमधून, दिवाळी अंकांतून त्यांनी मोजके पण दर्जेदार लेखन केले. महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण-निर्गुण सदरात त्यांनी केलेले लेखन विशेष उल्लेखनीय होते. ‘फुलांचे गाव’ हा त्यांचा एकच कथासंग्रह प्रसिद्ध आहे. या संग्रहासाठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणा-या दमाणी साहित्य पुरस्काराने १९९३ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. पोलिस खात्यातील अनुभवांचा अस्सलपणा सोबतीला असतानाही त्यांनी कधी पोलिसकथा लिहिल्या नाहीत, हे विशेष. माणसाच्या अंतरंगाचे धागेदोरे शोधण्यात त्यांना आनंद वाटायचा. स्त्री-पुरुष नातेसंबंध, त्यातले प्रेमाचे, परस्परांच्या ओढीचे हळुवार चित्रण त्यांच्या कथांमधून घडते. ते फौजदार झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती पुण्यात झाली. त्याच सुमारास पानशेत धरण दुर्घटना घडली. या दुर्घटनेवेळी त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल पोलिस दलानेही त्यांचा विशेष सन्मान केला. पानशेत दुर्घटनेच्या अनुभवावर आधारित ‘पुण्यातले दिवस’ ही त्यांची कथा मराठी कथासाहित्यातली महत्त्वाची कथा ठरावी. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सधन कृष्णाकाठचे भवानीनगर हे त्यांचे जन्मगाव. निवृत्तीनंतर लेखन-वाचनाबरोबरच त्यांनी शेतीतही काही प्रयोग केले. शेतीसुद्धा साहित्याप्रमाणे सृजनाचा अनुभव देते अशी त्यांची धारणा होती. त्यांचे वडिल औंध संस्थानात फौजदार असल्यामुळे शाळकरी वयात औंधच्या सुसंस्कृत राजवटीत त्यांची जडणघडण झाली, त्यातूनच त्यांचे समृद्ध व्यक्तिमत्त्व घडले. या दोन्ही गावांच्या संस्कारातून विलास मोहिते यांचे सुसंस्कृत, सृजनशील व्यक्तिमत्त्व घडले होते.
विलास मोहिते
पोलिस खात्याची नोकरी करताना खाकी वर्दीच्या रूबाबात आणि पोलिस डायरीच्या माहोलात राहताना मूळची संवेदना जपणे, ती जाणीवपूर्वक फुलवणे आणि तिला प्रतिभेचे धुमारे फुटू देण्यासाठी तितकेच मोकळे अवकाश मिळवून देणे, या साऱ्याच गोष्टी असाध्य वाटाव्यात अशाच; पण विलास मोहिते त्याला अपवाद ठरले.
Maharashtra Times 29 Jul 2017, 4:00 am