अ‍ॅपशहर

मराठीच्या भवितव्यासाठी…

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करताना उत्सवी मराठी मनांचे दर्शन घडत असते. कोणत्याही प्रसंगाला उत्सवी स्वरूप देण्यात मराठी जनांची बरोबरी कुणी करू शकणार नाही. गणपतीपासून गुढीपाडव्यापर्यंत अनेक सण आधीपासून साजरे होत आहेतच, अलीकडे त्यात मराठी राजभाषा दिनासारख्या सोहळ्यांची भर पडली आहे.

Maharashtra Times 27 Feb 2017, 2:08 am
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करताना उत्सवी मराठी मनांचे दर्शन घडत असते. कोणत्याही प्रसंगाला उत्सवी स्वरूप देण्यात मराठी जनांची बरोबरी कुणी करू शकणार नाही. गणपतीपासून गुढीपाडव्यापर्यंत अनेक सण आधीपासून साजरे होत आहेतच, अलीकडे त्यात मराठी राजभाषा दिनासारख्या सोहळ्यांची भर पडली आहे. अर्थात, भाषेचा उत्सव साजरा करणे ही आनंदाची गोष्ट असली तरी आपण त्या दिनाचा आशय किती लक्षात घेतला आहे आणि त्याचा उत्सव किती केला आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे मराठी शाळा धडाधड बंद करायच्या आणि खिरापत वाटल्यासारख्या इंग्रजी शाळांच्या परवाने वाटायचे, साहित्य संमेलनांकडे पाठ फिरवून खाद्य महोत्सवांना गर्दी करायची आणि दुसरीकडे मराठीच्या नावाने गळे काढायचे. जे लोक मराठीची गळचेपी करण्यात आघाडीवर, तेच मराठीचा उत्सव साजरा करण्यात पुढे असतात. त्यात सरकारपासून शिक्षणसंस्थांपर्यंत अनेक घटक येतात. मराठी भाषा आणि तिची आजची अवस्था यासंदर्भात चर्चा आणि चिंता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही मराठी राजभाषा दिनाकडे पाहिले जाते. हे सगळे होत असताना मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वल असावे, यासाठी नेमके काय करायला पाहिजे, यासंदर्भात ठोस काहीच हाती लागत नाही. मंत्रालयाच्या दारात मराठी हातात कटोरा घेऊन उभी आहे, हे तीस वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी केलेले विधान मध्यवर्ती ठेवूनच आजही मराठीसंदर्भात चर्चा केली जाते. दहा कोटींहून अधिक लोकांची भाषा असलेली मराठी मरणपंथाला लागण्याचे कारण सांगताना मराठी शाळांचे कमी होत जाणे आणि इंग्रजी शाळा वाढत जाणे, हे सांगितले जाते. परंतु, ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा यामध्ये गल्लत करून भाषेसंदर्भातील पूर्वग्रह मांडले जातात. जगाच्या बाजारपेठेत ताठ मानेने उभे राहण्यासाठी इंग्रजी महत्त्वाची असली तरी त्यासाठी मराठीचा बळी देण्याचे कारण नाही. किंबहुना, किमान महाराष्ट्राच्या बाजारपेठेत तरी मराठी ही ताठ मानेने जगण्याची भाषा बनावी, यासाठी सरकारने खास काही केलेले दिसत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi bhasha din
मराठीच्या भवितव्यासाठी…


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दीर्घकाळ प्रयत्न सुरू आहेत, परंतु सरकारचा त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा उत्साह मावळलेला दिसतो. मराठी भाषा टिकायची आणि वाढायची असेल तर नव्या माध्यमांमध्ये तिचा सहजसुलभ वापर करता यायला हवा. परंतु त्यासाठी मोबाइलपासून संगणकापर्यंतच्या सर्व साधनांमध्ये सोपेपणा हवा. परंतु, त्या दृष्टीने अद्याप आपण नीट काम करू शकलेलो नाही. त्यामुळे एका ठिकाणी तयार झालेला मजकूर दुसऱ्या ठिकाणी वाचता येत नाही. ग्रंथव्यवहारात गेल्या काही वर्षांमध्ये संख्यात्मक वाढ खूप होते आहे. परंतु, नव्या वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन किती साहित्यनिर्मिती होते, याचाही विचार करावयास हवा. लोकप्रिय साहित्याकडे तुच्छतेने पाहण्याचा एक काळ होता. आताही सोशल मीडियावरील लेखनाकडे तसेच पाहिले जाते. परंतु, त्यातले सुमार ते मागे पडून काही नवे हाती लागू शकेल आणि तेच नव्या वाचकांना मराठीशी जोडून ठेवेल. भाषा टिकवायची, वाढवायची तर अशा अनेक पर्यायांकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज