अ‍ॅपशहर

मराठी शाळांना अवकळा

Maharashtra Times 21 Aug 2017, 1:51 am
मुंबई महापालिका प्राथमिक विभागाच्या मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची झपाट्याने कमी होणारी संख्या चिंताजनक असून ही घसरण रोखण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अर्थात, मराठी शाळांची ही अवस्था केवळ मुंबईतली नसून संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येऊ शकते की, ही स्थिती केवळ महाराष्ट्रातील नसून देशभरात प्रादेशिक भाषांच्या शाळांची पटसंख्या कमी होत असून इंग्रजी शाळांकडीन ओढ आणि ओघ वाढत आहे. देशभरात हीच परिस्थिती आहे, तर मुंबईतील स्थितीसंदर्भात कशाला चिंता करीत बसायचे, असाही युक्तिवाद यासंदर्भात केला जाऊ शकतो. तो रास्त असला तरीही या सगळ्या परिप्रेक्ष्यात मुंबईतील परिस्थितीचा वेगळा आणि गांभीर्याने विचार करणे क्रमप्राप्त आहे. मुंबईतील मराठी शाळांचे वर्ग ओस पडू लागले असून मुंबई महापालिका प्राथमिक विभागाच्या मराठी शाळांमध्ये आता फक्त ४७ हजार विद्यार्थी उरले आहेत. मराठी भाषेकडील विद्यार्थी इंग्रजी माध्यमांकडे जाताहेत एवढ्यापुरताच मर्यादित मुंबईतला प्रश्न नाही. तर एकीकडे उर्दू आणि हिंदी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे, आणि मराठीची मात्र कमी होत चालली आहे. भाषानिहाय विद्यार्थीसंख्येनुसार पाहिले तर उर्दू आणि हिंदी शाळांच्यानंतर मराठी शाळांचा क्रमांक येतो. उर्दू शाळांमध्ये ८३ हजार तर हिंदी शाळांमध्ये ८१ हजार विद्यार्थी आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम misadventure of marathi school
मराठी शाळांना अवकळा


इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या ६१ हजाराच्या घरात पोहोचली आहे. या तुलनेत मराठी शाळांचा ४७ हजार हा आकडा अगदीच नगण्य वाटतो. सगळ्याच भाषांच्या विद्यार्थ्यांचा ओघ इंग्रजी शाळांकडे आहे, हे खरे असले तरी मराठीचे विद्यार्थी वेगाने कमी होत आहेत, ही वस्तुस्थिती आहेत. मराठी पालकांचा महापालिकेच्या मराठी शाळांवर भरवसा राहिलेला नाही, हे याचे एक कारण आणि मराठी शाळांचा अपेक्षित दर्जा टिकवून पालकांचा विश्वास संपादन करण्यात महापालिकेच्या शाळा अपयशी ठरल्या आहेत, हे याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण. मराठीचे राजकारण करणा-या शिवसेनेची गेली पंचवीस वर्षे महापालिकेवर सत्ता आहे आणि त्यांच्याच काळात मराठी शाळांना ही अवकळा आली आहे, हे लक्षात घ्यावे लागते. करोडोंचे बजेट असलेल्या महापालिकेची सत्ता असूनही शिवसेनेला ना नागरी सुविधांच्या पातळीवर समाधानकारक काम करता आले, ना मुंबईच्या सुनियोजित विकासाकडे लक्ष देता आले. त्या पातळीवरील अडाणीपण एकवेळ समजून घेता येईल, परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठीच्या गोष्टीही नीट करता आल्या नाहीत. मराठी शाळांची दुरवस्था हे त्याचेच निदर्शक आहे. इंग्रजी शाळांकडे कल वाढतोय म्हणून मराठी टक्का घसरतोय, असे कारण देणे म्हणजे आपणच आपल्या नाकर्तेपणावर पांघऱून घालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. शाळांच्या पटसंख्येचे आज दिसणारे हेच चित्र मुंबईतील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये परिवर्तीत होताना दिसते आहे आणि भविष्यात ते मराठी माणसांसाठी अधिक वेदनादायी असेल. कदाचित आज चौथ्या क्रमांकावर असलेली मराठी काही काळाने पाचव्या क्रमांकावर जाईल कारण, तोपर्यंत उर्दू, हिंदीपाठोपाठ गुजराती भाषा वर सरकलेली असेल. ही परिस्थिती मराठी भाषा आणि मराठी शाळांसाठी गळे काढण्याची नसून ठोस पावले उचलण्याची आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज