अ‍ॅपशहर

मोदींची कला

लोकभावना तशा अनेकांना कळतात. भावनांच्या लाटेवर स्वार होणे, मात्र फार थोड्यांना जमते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यातलेच एक आहेत. लोकमने वाचण्याची आणि त्याचा व्यवहाराशी संबंध जोडण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. अलीकडील नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे हे कसब प्रकर्षाने जाणवले. या पूर्वी मोदींनी भाजप विचारधारेच्या चार हात दुरून वाहणाऱ्या गांधी विचारधारेला अलगद स्पर्श केला होता.

Maharashtra Times 17 Apr 2017, 1:14 am
लोकभावना तशा अनेकांना कळतात. भावनांच्या लाटेवर स्वार होणे, मात्र फार थोड्यांना जमते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यातलेच एक आहेत. लोकमने वाचण्याची आणि त्याचा व्यवहाराशी संबंध जोडण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. अलीकडील नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे हे कसब प्रकर्षाने जाणवले. या पूर्वी मोदींनी भाजप विचारधारेच्या चार हात दुरून वाहणाऱ्या गांधी विचारधारेला अलगद स्पर्श केला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modis art
मोदींची कला


गांधीजींचे माहात्म्य जाणणारा मोठा समुदाय देशात आणि जगात आहे, हे ओळखून त्यांनी गांधीजींचा स्वच्छतेचा नारा उचलून धरला. अवघ्या देशाला हातात झाडू घ्यायला लावला. आता त्यांनी आर्थिक स्वच्छतेचा नारा दिला आहे. नोटाबंदीचा कचरा साफ करण्यासाठी जो कॅशलेस नावाचा झाडू ते वापरत आहेत, त्याच्याशी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा संबंध जोडला. ‘प्रॉब्लेम्स ऑफ रूपी’ लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने कॅशलेश व्यवहारासाठी तयार केलेल्या ‘भीम आधार अॅप’चे जोरदार मार्केटिंग मोदींनी सुरू केले आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचे निमित्त साधून ते नागपुरात होते. पंतप्रधान दीक्षाभूमीतही गेले. कॅशलेस मार्ग स्वीकारणाऱ्यांचा त्यांनी सत्कार केला. त्यांना बक्षिसे वाटली. तरुणांनी ‘भीम अॅप’चा प्रसार-प्रचार करून अर्थाजन करावे, असा मंत्रही दिला. मोदींच्या या दौऱ्यावरून, त्यांच्या भाषणावरून आता चर्चा झडू लागल्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिमेभोवती ते घालत असलेल्या प्रदक्षिणेला काही लोकांनी राजकीय रंग दिला. खरेतर एखादा निर्णय घेणे, त्यावर ठाम राहणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे चांगल्या सत्ताधीशाचे लक्षण मानले जाते. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे लोकांच्या मनावर गारूड आहे. मात्र, कॅशलेस व्यवहारांची तत्परता नागरिकांनी दाखविली नाही. मोदींना ती हवी आहे. कुठल्याही निर्णयाला समर्थक आणि विरोधक असतातच. एखाद्या निर्णयाबाबत सहमती बनवायची असेल तर मोठ्या संख्येने पाठिंबा आवश्यक असतो. देशात बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. तो वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेला आहे. समाजातील तो एक मोठा वर्ग या क्रांतीपासून वेगळा असू नये, तो विरोधात असू नये, याची काळजी मोदी घेत आहेत. त्यातूनच १४ एप्रिलचा मुहूर्त त्यांनी साधला असावा.

देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात दीक्षाभूमी आणि संघभूमीतून दोन वेगवेगळ्या विचारांचे वारे वाहतात. या वाऱ्यांचे ढग एकमेकांवर आदळून विजा कडाडण्यापेक्षा संघर्षाच्या कडा बोथट व्हाव्यात, हा कदाचित मोदींचा उद्देश असू शकतो. मोदींचा परवलीचा शब्द असलेले ‘देशातील सव्वाशे कोटी भारतीय अंगठे’ धावून आले तर पेपरलेस बँकिंग यशस्वी होईल. पंतप्रधान संघस्थानावर गेले नसले आणि शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख त्यांना टाळला असला तरीही देशाचे राजकारण नागपूरकेंद्री होत असल्याचे संकेत मोदींच्या दौऱ्याने दिले. कोराडी वीज केंद्राताल तीन युनिटचे लोकार्पण करतानाच आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी तसेच पंतप्रधान घरकुल योजनांचे भूमिपूजन करून नागपूरला त्यांनी संरक्षक कवच दिले. दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटांचे प्रकाशनही केले. नागपुरातील प्रवाहांशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुढच्या एखाद्या दौऱ्यात ते सेवाग्राममध्येही दिसतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज