मान्सूनसाठी आवश्यक असलेले सर्व घटक पूरक असल्याने यंदा दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवून हवामान खात्याने देशवासीयांना दिलासा दिला आहे. ईशान्येपासून उत्तरेपर्यंतच्या हिमाच्छादित पर्वतरांगा आणि दक्षिणेकडील द्वीपकल्प अशा विशिष्ट भूगोलामुळे भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत हमखास पाऊस पडतो. त्याचे प्रमाण कमी-अधिक होत असले, तरी हंगामात तो अजिबातच येत नाही, असे सहसा घडत नाही. अगदी भीषण दुष्काळांच्या वर्षांतही सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाल्याचा अनुभव आहे. मान्सून ही भारताला मिळालेली देणगी असल्याचे म्हणूनच म्हटले जाते. आर्थिक महासत्ता होऊ इच्छिण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भारताने अनेक बाबतीत प्रगती केली असली, तरी अजूनही शेती हाच अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ही शेती मूलतः पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच त्याचा अधिकाधिक अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न केला जातो. पाऊस ही हवामानशास्त्रीय प्रक्रिया असून, ऊन, वारा, त्याचा वेग, हवेचा दाब, सागरी पृष्ठभागावरील तापमान आणि तेथील दाब आदी घटकांवर तो अवलंबून असतो. जून ते सप्टेंबर या काळात मान्सून भारतावर बरसत असला, तरी अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर या समुद्रांवरील डिसेंबर ते मे या महिन्यांतील तापमान आणि दाब यांवर तो अवलंबून असतो. त्यामुळे या काळातील या सर्व घटकांच्या योग्य त्या नोंदी करून संख्याशास्त्रीय आकडेमोड करून मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठीचे प्रतिमान (मॉडेल) आपल्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून एप्रिल आणि जून या महिन्यांत दोन टप्प्यांत अंदाज वर्तविला जातो. एप्रिलमधील अंदाज प्राथमिक स्वरूपात असतो, तर जूनमध्ये वर्तविण्यात येणारा अंदाज अधिक नेमका असतो. ईशान्य प्रशांत महासागरापासून आग्नेय हिंदी महासागरापर्यंत आणि अटलांटिक महासागरापर्यंतच्या विविध सागरी पृष्ठभागावरील तापमान आणि दाब यांच्यावर आधारित सहा घटकांचा विचार या अंदाजासाठी केला जातो. यंदा हे सर्व घटक अनुकूल असल्याने आणि मान्सूनवरील विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक यंदा क्षीण राहणार असल्याने चांगला पाऊस पडेल, असा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. संख्याशास्त्रीय आणि संगणकीय प्रतिमानांमुळे देशाच्या विविध विभागांतील पावसाचा अंदाज वर्तविणेही शक्य झाले आहे. १९५० ते १९७९ या कालावधीत देशात पडलेल्या पावसाची सरासरी ८९० मिलिमीटर असून, त्यालाच दीर्घकालीन सरासरी (एलपीए) म्हटले जाते. या सरासरीच्या तुलनेत अंदाज वर्तविला जातो. यंदा या सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये चार टक्क्यांची त्रुटी गृहित धरण्यात आली आहे. वायव्य आणि ईशान्य भागात ९६ टक्के, मध्य भागात १०० टक्के, दक्षिण द्वीपकल्पात ९९ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत अनुक्रमे ९६ आणि ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. या अंदाजाद्वारे शेतीपासून उद्योग क्षेत्रांतील सर्वांवर एक प्रकारे दिलाशाच्या सरी बरसल्या आहेत. या अंदाजाला खोटे न ठरवत पुढील चार महिने चांगला पाऊस पडावा, हीच अपेक्षा.
दिलाशाच्या सरी
मान्सूनसाठी आवश्यक असलेले सर्व घटक पूरक असल्याने यंदा दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवून हवामान खात्याने देशवासीयांना दिलासा दिला आहे. ईशान्येपासून उत्तरेपर्यंतच्या हिमाच्छादित पर्वतरांगा आणि दक्षिणेकडील द्वीपकल्प अशा विशिष्ट भूगोलामुळे भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत हमखास पाऊस पडतो.
Maharashtra Times 8 Jun 2017, 12:00 am