अ‍ॅपशहर

आला पाऊस!

जूननंतर पावसाने देशात अनेक भौगोलिक पट्ट्यांमध्ये जी दडी मारली ती थेट काल-परवापर्यंत. यंदाही थोडा विलंबाने सुरू झालेला मोसमी पाऊस एव्हाना महाराष्ट्रभर पसरला असून लातूर, उस्मानाबाद, नांदेड या विशेष दुष्काळी जिल्ह्यांमध्ये तर त्याने या काळातील सरासरीही ओलांडली.

Maharashtra Times 29 Jun 2016, 1:00 am
गेल्या वर्षी जून महिन्यात देशाच्या पुष्कळशा भागांमध्ये या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यात मराठवाड्यातील काही क्षेत्रांचाही समावेश होता. त्या पावसाने आधीच्या म्हणजे २०१४मधील दुष्काळाच्या झळा सौम्य होतील, अशी आशा वाटत होती. मात्र, जूननंतर पावसाने देशात अनेक भौगोलिक पट्ट्यांमध्ये जी दडी मारली ती थेट काल-परवापर्यंत. यंदाही थोडा विलंबाने सुरू झालेला मोसमी पाऊस एव्हाना महाराष्ट्रभर पसरला असून लातूर, उस्मानाबाद, नांदेड या विशेष दुष्काळी जिल्ह्यांमध्ये तर त्याने या काळातील सरासरीही ओलांडली. खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागल्या. मात्र, या पावसाने दिलासा दिला असला तरी आत्ताच हुरळून जाण्यात अर्थ नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon rains maharashtra
आला पाऊस!


यंदा हवामानखाते व खासगी प्रयोगशाळा उत्तम पावसाचे भाकीत करीत आहेत. मात्र, गेल्या वर्षी इतका व्यापक दुष्काळ पडेल, असे नेमके भाकीत कुणी केले होते? जूनमधील पावसाने टँकरची वाट पाहणाऱ्या, चाराछावण्यांमध्ये गुरे ठेवून आसपास राहणाऱ्या, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या आणि पाण्याच्या ट्रेनची वाट पाहणाऱ्या अशा सर्वांना आत्ता मात्र समाधानी केले आहे. जवळपास पाच हजार गावे आणि आठ हजार वाड्या टँकरची वाट पाहात होत्या. ही संख्या या आठवड्यात झपाट्याने घटली आहे. चार हजार टँकर कालपरवा धावत होते. तेही मोजके उरले आहेत. जवळपास चारशे चाराछावण्या सुरू होत्या. त्यातल्या ३६० बंद झाल्या आहेत. गुरांना हिरवा चारा मिळू लागला आहे. रोजगार हमीवर सात लाख मजूर असले तरी एकदा पेरण्या भरात आल्या की हे मजूरही शेतांकडे वळतील. लागोपाठ दोन वर्षे पावसाने जबर तडाखा दिल्यानंतर यंदा विशेषतः मराठवाड्यात आणि इतरत्रही एक गोष्ट चांगली झाली. ‘जलयुक्त शिवार’ योजनेत असंख्य कामे सुरू झाली. मुख्य म्हणजे, केवळ सरकारी कंत्राटांतून कामे न होता अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या गटांनी पुढाकार घेतला. चार-दोन पावसांत मराठवाड्यात खोल व रूंद पात्रे झालेल्या नद्या आणि ओढ्यांमध्ये जे पाणी साठते आहे, ते डोळे निववणारे आहे. समाजशक्ती जागी झाली तर किती मोठी कामे होतात, हे दाखविणारे हे चित्र आहे. अर्थात, यंदा थांबून चालणार नाही. दुष्काळी आहेत पण सरकारी योजना, समाजाचा पुढाकार जेथवर पोहोचला नाही अशी काही हजार गावे महाराष्ट्रात अजून शिल्लक आहेत.

सध्याच्या पावसाचा खरा लाभ घ्यायचा असेल तर या साऱ्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे होण्याची गरज आहे. या पावसाने जसा बळीराजा सुखावेल तशीच अपवाद वगळता बहुतेक शहरेही सुटकेचा निश्वास टाकत असतील. पण या शहरांनीही जपून पाणी वापरण्याचा आणि पाण्याचा पुनर्वापर करण्याचा वसा घ्यायला हवा. गेली दोन वर्षे महाराष्ट्राने पुरेशा पावसाअभावी फार हालात काढली. यंदा सुदैवाने सुचिह्ने दिसत आहेत. या पावसाने दुष्काळाची छाया महाराष्ट्रावर यंदा पडणार नाही, असे दिसते. मात्र, टँकर, छावण्या, स्थलांतरे, गुरांचे पडते बाजार, वाढत्या आत्महत्या आणि विद्यार्थ्यांचे अपार हाल हे सारेच कायमचे थांबवायचे असेल तर पाण्याचा हा प्रसाद राखायला शिकायलाच हवे. सर्वदूर पडणाऱ्या पावसाचा हाच संदेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज