अ‍ॅपशहर

दुर्दैवी आणि संतापजनक

भिवंडी बस आगारात झालेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एस. टी. बस आगारांमध्ये चालक तसेच वाहकांमध्ये जो संताप उसळला आहे, तो स्वाभाविकच म्हणावा लागेल. मात्र, आता सामान्य प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता एस. टी. कर्मचाऱ्यांनी राज्यभरातल्या सेवा पूर्ववत होतील..

Maharashtra Times 13 Feb 2017, 12:00 am
भिवंडी बस आगारात झालेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एस. टी. बस आगारांमध्ये चालक तसेच वाहकांमध्ये जो संताप उसळला आहे, तो स्वाभाविकच म्हणावा लागेल. मात्र, आता सामान्य प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता एस. टी. कर्मचाऱ्यांनी राज्यभरातल्या सेवा पूर्ववत होतील, हे पाहायला हवे. भिवंडी बस आगारात ठाणे-भिवंडी हे शेवटची फेरी करून प्रभाकर गायकवाड हे बसचालक आगारात आणत असताना वाटेत उभ्या असलेल्या रिक्षामुळे त्यांना बस आणता येईना. त्यातून वाद झाला. यातून शेवटी गायकवाड यांना प्राणास मुकावे लागले. त्यांच्या शवविच्छेदनात त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ अथवा खुणा सापडलेल्या नाहीत, असे आता वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा खुलासा समजा योग्य मानला तरी जी तणावाची असाधारण परिस्थिती भिवंडी आगारात ​निर्माण झाली,​ तिचे पर्यवसान शेवटी गायकवाड यांना हृदविकाराचा तीव्र झटका येण्यात झाले, हे उघड आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम msrtc st bus driver death bhivandi thane maharashtra transport
दुर्दैवी आणि संतापजनक


साऱ्या महाराष्ट्रभर अवैध खासगी वाहतुकीने सध्या नंगानाच चालविला आहे. त्यामुळे, दिवंगत गायकवाड यांच्यासारखे हजारो एस. टी. चालक व वाहक दररोज मानसिक ताणाचे शिकार ठरत आहेत. नियमानुसार, एस. टी. आगारापासून दोनशे मीटर अंतरापर्यंत खासगी वाहने लावण्यास बंदी असते. महाराष्ट्रात कुठे हा नियम पाळला जातो? अगदी एस. टी. बसच्या समोर आपले खासगी वाहन नेऊन उभे करणारे महाभाग जागोजागी आहेत. एस. टी.ने गेल्या काही वर्षांत जवळच्या अंतरांसाठी शटलसेवा सुरू केल्या. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. या सेवा म्हणजे अवैध रिक्षा, जीप किंवा मेटॅडोरना चांगले उत्तर आहे. मात्र, बसआगारांना गराडा घालायचा, प्रवाशांना दा​दागिरी करायची, मनात येईल ते भाडे सांगायचे आणि वाहतुकीची कोणतीही शिस्त पाळायची नाही असा बहुतेक ठिकाणी खासगी वाहनचालकांचा खाक्या असतो. त्याचा स्वाभाविक त्रास एस. टी. चालकांना तसेच प्रवाशांना होतो.

एस. टी. ही गरिबांना परवडणारी, सुरक्षेची हमी देणारी समाजाच्या मालकीची सेवा आहे. ती जमेल तितकी आतून-बाहेरून पोखरायची आणि खासगी वाहनांना मोकाट रान द्यायचे, हे कारस्थान महाराष्ट्रात अनेक वर्षे चालू आहे. त्यात गुंडप्रवृत्तीचे नेते, भ्रष्ट नोकरशहा तसेच डोळेझाक करणारे पोलिस व आरटीओ अधिकारी असे सारे सामील आहेत. यातून जी बेबंदशाही माजली आहे, त्यातून जागोजागी असंख्य कलह होत आहेत. भिवंडीतील भांडण हे अशाच परिस्थितीत झाले.

ही अवैध वाहतूक आणि आगाराभोवतीचा व रस्त्यांवरचा वाहनांचा सुळसुळाट कमी झाला तर बसचालकांच्या मनावरचा ताण आपोआप कमी होईल. संघर्षाचे प्रसंग टळतील. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी हिंमत करून राज्यातल्या आगारांना पडलेला अवैध वाहतुकीचा विळखा सोडवून दाखवावा. प्रसंगी, गृहखात्याशी संघर्ष करावा. रोजगार सर्वांनाच हवेत. मात्र, अवैध रोजगार निर्माण करताना इतके दिवस एस. टी.ची सेवा मारण्याची क्लृप्ती लढवली जात होती. आता ही मस्ती प्रत्यक्ष एस. टी. कर्मचाऱ्यांना मारण्यापर्यंत चढलेली दिसते. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असेल तर अवैध वाहतूकदारांची मस्ती उतरविण्याचे आव्हान राज्य सरकारने पेलून दाखवावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज