अ‍ॅपशहर

आत्मघाताचे राजकारण !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने शरद पवार यांनी उभे केलेले आंदोलन टिपेला पोहोचले असताना अजित पवार यांच्या राजीनाम्याने सगळा खेळ बिघडून टाकला.

Maharashtra Times 30 Sep 2019, 4:00 am
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने शरद पवार यांनी उभे केलेले आंदोलन टिपेला पोहोचले असताना अजित पवार यांच्या राजीनाम्याने सगळा खेळ बिघडून टाकला. सुमारे वीस तासाहून अधिक काळ घोंघावत राहिलेले राजीनाम्याचे वादळ अखेर अजित पवार यांच्या अश्रूंच्या पुरात शांत झाले. राजकीय सावत्रपणा, कौटुंबिक कलह, सत्तासंघर्ष अशा अनेक विशेषणांनी चर्चेत राहिलेल्या प्रकरणाची अजित पवार यांनी एका भावनिक उंचीवर नेऊन सांगता केली असली तरी मधल्या काळात पक्षाची जी शोभा व्हायची ती होऊन गेली. ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द करून शऱद पवार शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पुण्याला रवाना झाले. देशभरातील प्रसारमाध्यमांतून या आंदोलनाची आणि पवारांनी भाजपच्या राजकारणावर मात केल्याची चर्चा सुरू असतानाच सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी आली. अजित पवार यांचा राजीनामा ही खरेतर आजच्या राजकीय परिस्थितीमधली भाकड कृती होती. कारण विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, अशा काळातील आमदारकीच्या राजीनाम्याला तसा काडीचाही अर्थ नव्हता. परंतु बेजबाबदारपणे केलेली एखादी भाकड कृतीही पक्षासाठी किती मारक ठरू शकते, हे अजित पवार यांच्या राजीनाम्याने दाखवून दिले. चार दिवस केवळ शरद पवार यांच्याभोवती असलेला फोकस अजित पवार यांनी आपल्याभोवती घेतला. उद्विग्नता, सात्त्विक संताप अशी कितीही विशेषणे त्याला लावली तरी त्यातून पक्षाच्या नुकसानीव्यतिरिक्त फारसे काही हाती लागत नाही. अजित पवार यांच्या राजीनाम्यासंदर्भाने शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत जे सांगितले, शब्दश: तेच अजित पवार यांनी शनिवारी दुपारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. यावरून पक्षात शरद पवार यांचाच शब्द अंतिम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit-pawar


अजित पवार यांची राजीनामा देऊन गायब होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २००९मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असताना ते असेच गायब झाले होते. नंतर सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अचानक राजीनामा देऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाजूला झाले होते. अलीकडेही वेळोवेळी त्यांच्याविरोधातील प्रकरणाची फाईल तपास यंत्रणेने वर काढली की ते बॅकफुटवर जाताना दिसत होते. हे लढवय्या आणि प्रगल्भ नेत्याचे लक्षण नव्हे. नेत्याने संकटांना सामोरे जाण्यातूनच कार्यकर्त्यांना बळ मिळत असते, परंतु अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षांत ते अपवादानेच दाखवले, त्यामुळेच चेहरा म्हणून वेगवेगळ्या नेत्यांना पुढे आणून पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अजित पवार यांची कार्यक्षमता, त्यांची प्रशासनावरील पकड, सार्वजनिक हिताच्या कामात लक्ष घालून ते नेटकेपणाने करून घेण्याची वृत्ती, कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी धावून जाण्याचा स्वभाव अशा आजच्या काळात दुर्मीळ ठरणाऱ्या अनेक जमेच्या बाजू आहेत. परंतु राजकारण एवढे गुंतागुंतीचे बनले आहे की, तेवढ्यावर चालत नाही. विरोधात काम करताना सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्षात जे सातत्य दाखवायला हवे ते त्यांना दाखवता आले नाही. विविध राजकीय पक्षांचे नेते प्रतिमानिर्मितीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब आणि सर्व प्रकारच्या माध्यमांचा कौशल्याने वापर करून घेत असताना अजित पवार मात्र सातत्याने माध्यमांशी फटकून राहिले. कर्तृत्ववान नेत्याला माध्यमांचा अनुनय करण्याची आवश्यकता नसली तरी संवादासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी उपलब्ध तरी असायला हवे, परंतु तीन दशके राजकारणात असलेल्या अजित पवार यांना तेही जमलेले नाही. म्हणूनच त्यांच्या कृतीमुळे बिघडलेली परिस्थिती दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा शरद पवार यांना पुढे यावे लागल्याची उदाहरणे आहेत. राजकारण करण्याचा अर्थ काळाबरोबर राहणे असाही असतो, परंतु दुर्दैवाने शरद पवार वगळता राष्ट्रवादीचे अन्य नेते सरंजामी मानसिकतेतून आणि पाच वर्षांपूर्वी खालसा झालेल्या सत्तेच्या अहंकारातून अद्याप बाहेर आलेले नाहीत. अजित पवार हे खऱ्या अर्थाने अशा सर्वांचे नेते आहेत. काही तासांत अज्ञावासातून बाहेर येऊन त्यांनी प्रकरण ताणले नाही, हे त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ऋणच म्हणायला हवेत. घडलेल्या घटनेबद्दल पक्षसहकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची माफी मागून त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे. पुन्हा पुन्हा रागावणे, रुसून बसणे हे संवेदनशीलतेचे लक्षण असले तरी वर्तमान राजकारणात त्याला कवडीचीही किंमत नाही!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज