९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी उद्गार झाला. उद्गार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण आणि धर्माचा वाढता आवाका याविरोधात. नाट्य संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार आणि संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे दोघेही पुरेशा जबाबदारीतून स्पष्टपणे व्यक्त झालेत. 'नाटका'चा अवकाशआवाका खाचाखोचांसह वापरणाऱ्या या दोघांचे व्यक्त होणे हे विंगेतले बोलणे नव्हते. या दोन्ही लेखक-नाटककारांच्या लेखनजाणिवेचा केंद्रबिंदू माणूस राहिला आहे. नाट्य संमेलनाचा उद्देश नाट्यरसिकांचे केवळ मनोरंजन हा नाही. नाट्यविश्वातील विविध प्रवाह, गटतट आणि रसिकांमध्ये संवाद घडवून आणण्यासही ते निमित्त ठरायला हवे. रंगमंचावरील चुकांवर समयसूचकतेने मात करण्याचे कसब नटांना साधावे लागते. विंगेच्या आत जे जे काही चालू असते ते ते प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाही. किंबहुना ते येणार नाही, याचे भान नटांना; नाटकाशी संबंधित सर्व घटकांना ठेवावे लागते. रंगमंचाच्या अवकाशात जे काही सादर केले जाते, त्यात पुरेसे गांभीर्य असते. या गांभीर्याची पुरती जाणीव असलेले एलकुंचवार आणि गज्वी बोलले. ठराविक स्वार्थ साध्य करण्यासाठी माणसांचा वापर केला जात असेल, माणसांना वेदना दिल्या जात असतील तर बोलायलाच हवे! काय बोलले ते? गज्वी म्हणाले, आज सतत भय पेरले जात आहे. शहरी नक्षलवाद हे नवेच भय आलेय. जिथे विचारांची निर्मिती मरते तो समाज मरतो. ते राष्ट्रही मरते. विरोधी विचार म्हणजे आपल्या प्रजेच्या सुखासाठीचे मार्गदर्शन असते. हे मार्गदर्शन सतत होत राहिले पाहिजे. माणूस विभाजित करणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला नष्ट करावी लागेल. त्यासाठी जाणीवपूर्वक कृतिशील व्हावे लागेल. नाटकातील 'पॉज'ही अर्थपूर्ण करणारे महेश एलकुंचवार म्हणाले, आज काही शब्दांना धार आली आहे. ते शब्द ऐकले की लोक दचकतात. धर्माची नव्याने व्याख्या केली जात आहे. त्यातील कल्पना न स्वीकारणारे धर्मद्रोही आणि देशद्रोही ठरवले जात आहेत. मी म्हणेन तो धर्म मान्य न केल्यास भोसकण्याची वृत्ती बळावली आहे.
दुसऱ्याला दु:ख न देणे हा धर्माचा अर्थ आहे. मात्र तो कळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला हे जात-धर्माचे विवेचन का यावे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ते का येऊ नये? नाटक व्यावसायिक असो वा प्रायोगिक वा तमाशा-दंडार-दशावतार प्रकारातील, ते शेवटी माणसांशीच 'कनेक्ट' होत असते. नाटकांचा मूळ हेतू माणसांचे मनोरंजन हाच असतो आणि मनोरंजनातून प्रबोधन ही पुरोगामी महाराष्ट्राची आदर्श परंपरा आहे. नागपुरात तब्बल ३५ वर्षांनंतर आयोजित या नाट्य संमेलनात काही वेगळे होत आहे. पूर्व विदर्भाचे सांस्कृतिक संचित असलेली झाडीपट्टीची नाटके येथे होत आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागांतील एकांकिका-नाटकांना यात स्थान आहे. या सर्व प्रकारच्या नाट्यविधा; नाट्यकर्मी कमी-अधिक प्रमाणात माणसाचेच म्हणणे सांगत आहेत. फार्सिकल नाटकांनी वेदनेची किनार हळुवार पकडल्याची आणि कमालीच्या व्यावसायिक नाटकाने माणसाच्या जगण्यातले दोष दाखविल्याची उदाहरणे कमी नाहीत. हौशी, प्रायोगिक नाटकांचे जगणे कठीण झाले असले तरी त्यांनी माणसाचा विवेक शाबूत ठेवण्याचा मूळ पिंड सोडलेला नाही. नाट्यलेखक तशा जागा पेरत असतो. नाटकाचा दिग्दर्शक तशा जागा शोधत असतो आणि नट त्या जागांचे अर्थ रसिकांपर्यंत पोहोचवत असतो. नाटकांतून माणसाच्या अंतरीचे हे असे सांगणे आजचे नाही. मात्र आज अतिशय चुकार कारणे देत या हे सांगणे दडपले जात आहे. रंगमंचीय आविष्कारांवर अंकुश आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. व्यक्त होण्याचे मार्ग नानाविध पद्धतीने अवरुद्ध केले जात आहेत. गज्वी सांगतात तसे वेठीस धरून, धमकी देऊन, तोंडाला काळे फासून, मारण्याची धमकी देऊन वा ठार मारून! तेव्हा नाट्यविधांच्या सर्वांत मोठ्या उत्सवात; नाट्य संमेलनात उद्घाटक आणि अध्यक्ष हे माणसाच्या जगण्या-मरण्याच्या आणि विचार करण्याच्या स्वातंत्र्यावर बोट ठेवत असतील तर त्यामागची कळकळ समजून घेतली पाहिजे. झिरपविली पाहिजे. जितकी नाट्यकर्मींनी आणि शासनकर्त्यांनी, तितकीच ती नाट्यरसिकांनीही. साऱ्या घटकांतील नाट्यरसिकांनी. एकारलेपण घालवून समग्रतेचे भान देणारे नाटक सिद्ध करण्याची गरज संमेलनाध्यक्ष गज्वी सांगतात. तीही समजून घेतली पाहिजे.
दुसऱ्याला दु:ख न देणे हा धर्माचा अर्थ आहे. मात्र तो कळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला हे जात-धर्माचे विवेचन का यावे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ते का येऊ नये? नाटक व्यावसायिक असो वा प्रायोगिक वा तमाशा-दंडार-दशावतार प्रकारातील, ते शेवटी माणसांशीच 'कनेक्ट' होत असते. नाटकांचा मूळ हेतू माणसांचे मनोरंजन हाच असतो आणि मनोरंजनातून प्रबोधन ही पुरोगामी महाराष्ट्राची आदर्श परंपरा आहे. नागपुरात तब्बल ३५ वर्षांनंतर आयोजित या नाट्य संमेलनात काही वेगळे होत आहे. पूर्व विदर्भाचे सांस्कृतिक संचित असलेली झाडीपट्टीची नाटके येथे होत आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागांतील एकांकिका-नाटकांना यात स्थान आहे. या सर्व प्रकारच्या नाट्यविधा; नाट्यकर्मी कमी-अधिक प्रमाणात माणसाचेच म्हणणे सांगत आहेत. फार्सिकल नाटकांनी वेदनेची किनार हळुवार पकडल्याची आणि कमालीच्या व्यावसायिक नाटकाने माणसाच्या जगण्यातले दोष दाखविल्याची उदाहरणे कमी नाहीत. हौशी, प्रायोगिक नाटकांचे जगणे कठीण झाले असले तरी त्यांनी माणसाचा विवेक शाबूत ठेवण्याचा मूळ पिंड सोडलेला नाही. नाट्यलेखक तशा जागा पेरत असतो. नाटकाचा दिग्दर्शक तशा जागा शोधत असतो आणि नट त्या जागांचे अर्थ रसिकांपर्यंत पोहोचवत असतो. नाटकांतून माणसाच्या अंतरीचे हे असे सांगणे आजचे नाही. मात्र आज अतिशय चुकार कारणे देत या हे सांगणे दडपले जात आहे. रंगमंचीय आविष्कारांवर अंकुश आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. व्यक्त होण्याचे मार्ग नानाविध पद्धतीने अवरुद्ध केले जात आहेत. गज्वी सांगतात तसे वेठीस धरून, धमकी देऊन, तोंडाला काळे फासून, मारण्याची धमकी देऊन वा ठार मारून! तेव्हा नाट्यविधांच्या सर्वांत मोठ्या उत्सवात; नाट्य संमेलनात उद्घाटक आणि अध्यक्ष हे माणसाच्या जगण्या-मरण्याच्या आणि विचार करण्याच्या स्वातंत्र्यावर बोट ठेवत असतील तर त्यामागची कळकळ समजून घेतली पाहिजे. झिरपविली पाहिजे. जितकी नाट्यकर्मींनी आणि शासनकर्त्यांनी, तितकीच ती नाट्यरसिकांनीही. साऱ्या घटकांतील नाट्यरसिकांनी. एकारलेपण घालवून समग्रतेचे भान देणारे नाटक सिद्ध करण्याची गरज संमेलनाध्यक्ष गज्वी सांगतात. तीही समजून घेतली पाहिजे.