अ‍ॅपशहर

वादे वादे जायते तत्त्वबोधो

इतिहासातील गोष्टींचा सोयीस्कर अर्थ काढून त्याद्वारे आपल्या म्हणण्याचे समर्थन करणे ही केवळ इतिहासाशी नव्हे, तर सत्याशीही केलेली प्रतारणा असते. राज्यकर्त्यांकडून अनेकदा अशा प्रकारची प्रतारणा होत असते. जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनावर मुद्रा उमटविण्यासाठी आणि आपल्याला हवी तशी पिढी घडविण्यासाठी सत्ताधारी इतिहासाचे पुनर्लेखन करीत असतात.

Maharashtra Times 31 Dec 2016, 4:04 am
इतिहासातील गोष्टींचा सोयीस्कर अर्थ काढून त्याद्वारे आपल्या म्हणण्याचे समर्थन करणे ही केवळ इतिहासाशी नव्हे, तर सत्याशीही केलेली प्रतारणा असते. राज्यकर्त्यांकडून अनेकदा अशा प्रकारची प्रतारणा होत असते. जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनावर मुद्रा उमटविण्यासाठी आणि आपल्याला हवी तशी पिढी घडविण्यासाठी सत्ताधारी इतिहासाचे पुनर्लेखन करीत असतात. जगभर हे घडत आले आहे. भारतही त्याला अर्थातच अपवाद नाही. सत्ताधाऱ्यांनी - मग ते काँग्रेसचे असोत वा भारतीय जनता पक्षाचे - आपल्या सोयीने शिक्षणात, विशेषतः इतिहास लेखनात हस्तक्षेप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आधी डाव्यांनी आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही इतिहासाचा सोयीने अर्थ काढला आहे. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून इतिहासाच्या पुनर्लेखनाची मागणी हिंदुत्ववादी वर्तुळाकडून होत आहे. त्याचबरोबर देशप्रेमाची आणि राष्ट्रनिष्ठेची नवी परिमाणे आणि प्रतीके तयार केली जात आहेत. त्यावरून वादविवाद झडत आहेत. आपण म्हणतो तेच खरे आणि आपण सांगतो तीच देशभक्ती असे म्हणणाऱ्यांचा आवाज वाढतो आहे, असहिष्णुता वाढते आहे. या साऱ्याचे पडसाद भारतीय इतिहास परिषदेच्या अधिवेशनात उमटणे स्वाभाविक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम president pranav mukhrji tolerance thiruanantpuram
वादे वादे जायते तत्त्वबोधो


तिरुअनंतपूरम येथे भरलेल्या या अधिवेशनाचे उद़्घाटन करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याबाबत केलेले भाष्य सूचक आहे. असहमतीचे, प्रश्न विचारण्याचे आणि वादविवादाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची गरज व्यक्त करतानाच त्यांनी सहिष्णुता राखण्याचा संदेश दिला आहे. धर्म, भाषा, वर्ण, वंश, संस्कृती या सर्वांमधील विविधता जपत त्यातून एकता प्रस्थापित करणारी भारतीय परंपरा मुळात सहिणू आहे; या विविधतेकडे पाठ फिरवून इतिहासाचा आपणच काढलेला अर्थ बरोबर आहे, असे म्हणणे असहिष्णूतेचे आहे, हे राष्ट्रपतींचे वक्तव्य खूप मोलाचे आहे. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधो’ असे म्हणण्याची परंपरा आपल्याकडे आहे. वादांतून होणाऱ्या तत्त्वबोधाकडे पाठ फिरवून एकमितीय अर्थ काढणे म्हणजे स्वतःला झापडबंद करण्यासारखे आहे. स्वतःची प्रतिमा उजळवत ठेवून पंथ निर्माण करणाऱ्यांना असे झापडबंद अनुयायी हवेच असतात. असे अनुयायी प्रश्न विचारत नाहीत वा विचारू देत नाहीत. आपण सांगू तोच इतिहास, आपण म्हणू तेच सत्य आणि आपण ठरवतो तोच देशभक्तीचा निकष, असा प्रकार त्यामुळे सुरू होतो. असे नेते आणि अनुयायी ना जगाला नवीन आहेत, ना भारताला. आणीबाणीच्या काळात भारताने याचा अनुभव घेतला होता. आताही त्याची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती आहे. तिला रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्र यायला हवे. विशेषतः इतिहासाच्या अभ्यासकांनी, जाणकारांनी, बुद्धिमंतांनी पुढे यायला हवेत.

वेगवेगळी स्थित्यंतरे अनुभवलेला हा देश वैविध्यांनी ओतःप्रोत भरलेला आहे. हे वैविध्य टिकवतच त्याने आजवरची वाटचाल केली आहे. वैविध्य नाकारून धर्म वा भाषेच्या आधारावर स्थापन झालेल्या देशांची अवस्था काय होऊ शकते हे पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते. बहुसांस्कृतिक वारसा जपत, आधुनिकतेची कास धरण्यातच भारताचे हित आहे. इतिहासाचा सोयीस्कर अर्थ काढण्याऐवजी त्यापासून बोध घेतला आणि ‘वादे वादे जायते तत्त्वबोधो’चा अर्थ समजून घेतला, तरच देशाची सांस्कृतिक वीण घट्ट राहील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज