अ‍ॅपशहर

नवनिर्माणाची गुढी!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर घेतलेला मेळावा त्यांच्या स्वतःसह कार्यकर्त्यांनाही उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Maharashtra Times 11 Apr 2016, 1:22 am
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर घेतलेला मेळावा त्यांच्या स्वतःसह कार्यकर्त्यांनाही उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मनसेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर गुढी पाडवा मेळाव्याचा प्रारंभ केला आहे. दसरा मेळाव्याची जाहिरात करताना ‘चला विचारांचे सोने लुटायला’ अशी केली जाते. त्याच धर्तीवर ‘मराठीची गुढी उभारण्यासाठी’ राज ठाकरे यांनी पाडव्याची निवड केलेली दिसते. संक्रांतीसारख्या मराठमोळ्या सणाचा आणखी एक मुहूर्त होता, परंतु तो दिवस गोड बोलण्याचा असल्याने राज ठाकरे यांच्या एकूण प्रकृतीला मानवला नसता. याआधीच्या ‘रिक्षा जाळण्याच्या’ आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्कंठा होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray gudhi padwa rally
नवनिर्माणाची गुढी!


लोकसभा, विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर मनसेचे महाराष्ट्राच्या राजकारणातले अस्तित्व दखलपात्र उरलेले नाही. पक्षात सर्वच पातळीवर मरगळ आहे. त्यामुळेच गुढी पाडवा मेळाव्याद्वारे पक्षसंघटनेत प्राण फुंकण्यात राज ठाकरे कितपत यशस्वी होतात, याचेही कुतूहल होते. राज ठाकरे यांच्या भाषणात नवीन मुद्दे नसले तरी प्रगल्भतेकडे निघालेल्या राजकीय नेत्याचे दर्शन या भाषणाने घडवले. भाषण म्हणजे भरपूर मनोरंजन आणि हशा, टाळ्यांचा जल्लोष हा पारंपरिक समजही त्यांनी खोटा ठरवला. काही ठाकरी ठोसे होते, परंतु भाषेचा स्तर त्यांनी घसरू दिला नाही. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि जनतेमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. या असंतोषाला राज यांनी वाट करून दिली. संघपरिवाराला लक्ष्य करताना ओवेसी बंधूंशी त्यांचे लागेबांधे असल्याचा थेट आरोप करून जाती-धर्माच्या आधारावर समाजाचे ध्रुवीकरण करण्याच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले. स्वतंत्र विदर्भ, मराठवाड्यासाठी स्वतंत्र राज्याचा विषय किंवा महाराष्ट्राचे चार राज्यांमध्ये विभाजन, या सर्व मुद्द्यांचा परामर्ष घेताना त्यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका जोरकस मांडली. ‘भारत माता की जय’वरून चाललेल्या राजकारणाचा परखड समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनाही खडे बोल सुनावले. आत्महत्या केलेल्या माधव कदम या शेतकऱ्याच्या पत्राचा दाखला देत मराठीचा आणि परप्रांतियांचा पारंपरिक मुद्दा आपण सोडला नसल्याचे संकेतही दिले. शिवसेनाप्रमुखांची मुस्लिमांसंदर्भातील भूमिका पुढे चालवताना आपल्या पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग एपीजे अब्दुल कलाम, ए. आर. रेहमान यांच्यासाठी असल्याचे सांगितले. परंतु बेहरामपाडा, भेंडीबाजार, भिवंडीचा उल्लेख करून मुस्लिमविरोधी पारंपरिक मानसिकतेलाही चुचकारले. शिवसेनेला जाता-जाता काही टपल्या मारल्या असल्या तरी तुलनेने शिवसेनेवर ते फारसे बोलले नाहीत. शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेने लावलेले झेंडे हा शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद असल्याचे सांगून त्यांच्याप्रती जिव्हाळाही व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पूर्ण निष्प्रभ झाले असताना महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षासाठी अवकाश निर्माण झाला आहे. तो व्यापण्याचा राज यांचा प्रयत्न दिसतो. परंतु एखाद्या सभेने अशी पोकळी भरता येत नाही. त्यासाठी सतत खडतर परिश्रम करावे लागतात. तशी त्यांची तयारी असेल तर त्यांच्या पक्षाचे नवनिर्माण होणे अवघड नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज