ढोलकी फड हा तमाशाचा उपप्रकार आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीत झालेला तमाशा म्हणजेच केवळ तमाशा या प्रादेशिक समजातून बाहेर येण्याची गरज आहे. या समजातून सरकार आणि कलावंत बाहेर आले, तरच हा पुरस्कार खऱ्या लोककलावंताला दिला जाईल आणि त्या लोककलेचा सन्मान होईल.
अनुजा चवाथे
माशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला जीवनगौरव पुरस्कारावरून वाद सुरू झाला आहे. हा पुरस्कार त्या पुरस्काराच्या दर्जाचे काम केलेल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकाराला द्यावा असे मत व्यक्त करत या पुरस्कार समितीच्या सदस्या आणि विठाबाईंच्या कन्या मालती इनामदार यांनी समितीच्या इतर सदस्यांनी मंजुरी दिलेल्या नावाला ठाम विरोध केला आहे. या पुरस्काराच्या वादाचे इतर काही पैलूही या निमित्ताने समोर आले आहेत. पुरस्काराचे नाव लोककला जीवनगौरव पुरस्कार असल्याने हा पुरस्कार केवळ तमाशा कलावंतांनाच का द्यावा, इतर लोककलांना का नाही, तमाशा म्हणजे ढोलकी फडाचाच तमाशा का, या पैलूंवरही चर्चा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे समितीवरील सदस्यांना या क्षेत्रातील असलेले ज्ञान, त्यांचा अनुभव, राजकीय हस्तक्षेप, मंत्र्यांकडून, खासदारांकडून येणारी पत्रे, पुरस्कारासाठी होणारी
दलाली या मुद्द्यांसंदर्भातही बोलले जात आहे.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र देऊन तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकाराला गौरवण्यात येते. विलासराव देशमुख यांच्या काळात या पुरस्कारांना सुरुवात झाली. याचे नाव लोककलाकार जीवनगौरव पुरस्कार असले तरी तमाशा कलावंतांचे काम जगासमोर यावे यासाठी या पुरस्काराची निर्मिती झाल्याचे मालती इनामदार सांगतात. या पुरस्काराचे माजी समिती सदस्य, पुरस्कारासाठी आग्रह धरणारे आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनीही तमाशाला प्राधान्य मिळावे यासाठी या पुरस्काराचा आग्रह धरल्याचे सांगितले. मालती इनामदार यांनी गेल्या वर्षीही हा पुरस्कार अयोग्य माणसाला दिल्याचे सांगत यंदा हा पुरस्कार दिला नाही तरी चालेल मात्र तो अयोग्य माणसाला देता कामा नये, असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी चुकीच्या व्यक्तीला या श्रेष्ठ पुरस्काराने गौरवल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. गण, गवळण न येणाऱ्यांना हा पुरस्कार का द्यायचा असा प्रश्न त्यांनी यासंदर्भात उपस्थित केला आहे.
पुरस्कारासाठी नावनिश्चिती करण्याच्या वेळी मालती इनामदार उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समिती सदस्य असून मालती इनामदार बैठकीला नसल्याने याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांनी किती बैठकांना हजेरी लावली, याबद्दल विचारणा होत आहे. मात्र दिवाळीनंतर ही बैठक अचानक नियोजित करण्यात आली आणि त्यावेळी तमाशाचे कार्यक्रम सुरू झाले होते. हे कार्यक्रम रद्द करून बैठकीला येणे शक्य नसल्याने पुरस्काराच्या मानकऱ्याचे नाव ठरवण्याच्या वेळी येता आले नसल्याचे त्या सांगत आहेत. हीच बैठक पुरेसा वेळ घेऊन आणि पूर्वतयारीनिशी दिवाळीपूर्वी आयोजित करायला हवी होती, असा सूर इनामदार कुटुंबीयांचा आहे. या पुरस्कारासाठी कलाकाराची निवड होताना त्याचे निकष पूर्णत्वाने विचारात घेतले जात नाहीत, त्यासाठी अभ्यास होत नाही आणि त्यामध्ये काही वेळा ओळखीच्या कलाकारांची नावे घुसवली जातात असे आरोप इनामदार कुटुंबीयांनी केले आहेत. एका समिती सदस्याने पुरस्काराच्या
नाव मंजुरीसाठी दबाव येत असल्यासंदर्भात त्यांना माहिती दिल्याचेही इनामदार यांनी सांगितले. मात्र या कोणत्याही संदर्भात सरकारशी पत्रव्यवहार इनामदार यांनी केलेला नाही. त्यामुळे सरकारकडून या आरोपांची दखल घेतली जायला हवी तर या आक्षेपांचे पत्र सांस्कृतिक
कार्य संचालनालयाला देणे आवश्यक आहे.
या पुरस्कारांच्या अनुषंगाने लोककला अभ्यासक आपल्या हरकती नोंदवत आहेत. माजी समिती सदस्य खंडूराज गायकवाड यांनीही पूर्वी पुरस्कार समितीवर खरोखरच तज्ज्ञ मंडळी होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लोककलेची सखोल जाण नसलेल्या लोकांचा विविध पुरस्कार समित्यांवर भरणा झाल्याने लोककलाकारांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. काही समिती सदस्यांकडे लोककला सादर करण्याचा प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास नसल्याने त्यातील बारकावे त्यांना समजत नाहीत. तळागाळातील लोककलाकारांपर्यंत समिती पोहोचत नाही आणि मग कोणीतरी पुरस्कारासाठी सुचवलेल्या नावाला सहज मंजुरी मिळते. त्यावर चर्चा, वादविवाद होत नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले. काही वेळा खासदार, मंत्री पत्र लिहून सूचना करतात, काही वेळा पुरस्कार मिळवून देतो असे सांगून काही वरिष्ठ लोककलाकार दलालीही करतात असेही निरीक्षण समितीच्या काही माजी सदस्यांनी नोंदवले आहे. मात्र या आरोपांसाठी थेट पुरावे उपलब्ध न झाल्याने हा कारभार मागच्या पानावरून पुढे सुरूच राहतो, असे ते सांगतात. तळागाळातील लोककलाकारांपर्यंत समिती पोहोचत नसल्याने अशा पुरस्कारांचा उद्देश खरोखरच साध्य होतो का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोककला क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा लोककला जीवनगौरव पुरस्कार असल्याने याची व्याप्ती वाढणे आता गरजेचे आहे. इतर लोककलाकारांचा विचार या पुरस्कारासाठी का केला जात नाही, असा प्रश्न अशा वादाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हा पुरस्कार विठाबाई यांच्या नावाने दिला जात असला तरी तो केवळ त्यांच्याच वारसांमध्ये दिला जावा अशी अप्रत्यक्ष व्यक्त केली जाणारी अपेक्षाही चुकीची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विठाबाईंच्या वारसांव्यतिरिक्तही अनेक तमाशा कलावंत गरजू, हरहुन्नरी असल्याने इनामदार यांनी त्यांच्याच नात्यातील काही जणांना हा पुरस्कार मिळावा यासाठी जो आग्रह धरला आहे तो सोडून द्यावा असेही यासंदर्भात भाष्य केले जात आहे. खरोखरच योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळावा यासाठी निःपक्षपातीपणे काम झाले तर या पुरस्काराचा खरा सन्मान होईल असे मत हे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुरस्कारासंदर्भातील एकूणच राजकारण आणि समाजकारण या निमित्ताने ढवळले जात आहे. सरकारी समितीवरील सदस्यांकडून ज्या पद्धतीने योग्य व्यक्तीचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी अभ्यासू आणि निःपक्षपाती वृत्तीने निवड करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तसेच संबंधित
व्यक्तीच्या नातेवाईकांनी किंवा त्यांच्या नावाने सुरू केलेल्या ट्रस्टच्या विश्वस्तांनी कुटुंबीयांपैकीच कोणाला पुरस्कार मिळावा असा दुराग्रह धरू नये असेही सांगितले जात आहे. स्वतःला हव्या त्या व्यक्तीला पुरस्कार देण्याचा आग्रह असेल तर या पुरस्कारांसाठी सरकारी निधीचा वापर करू नये, असे थेट मत मांडले जात आहे.
तमाशा म्हणजे काय हे समाजासमोर अधिक विस्तृतपणे यावे, असे लोककला अभ्यासक सांगत आहेत. ठराविक झापडांपलीकडे पाहायला शिकण्याची अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. तमाशा म्हणजे केवळ ढोलकी-फड नाही तर खानदेशातील तखतराव म्हणजे तमाशा आहे. विदर्भातील खडी गंमत म्हणजे तमाशा आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ येथील संगीतबारी म्हणजेही तमाशाच आहे. ढोलकी फड हा तमाशाचा उपप्रकार असून हा केवळ पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीत झालेला हा तमाशा म्हणजेच केवळ तमाशा या प्रादेशिक समजातून बाहेर येण्याची गरज आहे. या समजातून सरकार आणि कलावंत बाहेर आले, तरच हा पुरस्कार खऱ्या लोककलावंताला दिला जाईल आणि त्या लोककलेचा सन्मान होईल, असे सांगितले जात आहे. तमाशामध्ये खानदेशी, वायदेशी, ठाकरी तमाशा, जुन्नरी तमाशा, मराठवाडी तमाशा असेदेखील वेगवेगळे प्रकार आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार करता तमाशासाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराच्या चौकटी विस्तारल्या जाणे आवश्यक आहे. हा पुरस्कार आदिवासी ठाकरांना का नको, पूर्ण महाराष्ट्रात संगीतबारीची केंद्र आहेत, तिथे हा पुरस्कार का पोहोचत नाही अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. या पुरस्काराच्या सीमारेषा वाढवण्यासाठी लोककलावंत आणि सरकारने साकल्याने करायला हवा आणि त्यानुसार सुधारणा करायला हवी नाही तर मोठ्या रकमेचा आणि जीवनगौरव या प्रतिष्ठेचा पुरस्कार असल्याने हा वाद यानंतरही असाच चिघळत राहणार आहे.