एका गोष्टीत दुमत नसावे, की इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि येथेच भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला) करू नका आणि डॉक्टर जर का देव नसेल, तर त्याच्या मर्यादा ओळखा. हे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टर, हॉस्पिटल यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
अॅड. रोहित एरंडे
स्वाइन फ्लूमुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत हैदराबाद येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रचंड गोंधळ करून, तोडफोड करून, डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला. तेलंगणामध्ये बायकोशी जास्त चर्चा केली आणि नवऱ्याकडे दुर्लक्ष केले, म्हणून नंतर परत येऊन नवऱ्याने एका ज्येष्ठ पेडिएट्रिशिअनला प्राणांतिक मारहाण केली. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली होती. भारतामधील फार थोडी हॉस्पिटल अशी असतील, जिथे असे दुर्दैवी प्रकार घडले नसतील. अशा सतत होणाऱ्या प्रकारांमुळे एम.बी.बी.एस.मधील 'एम. बी.' म्हणजे 'मसल बाउंड' होण्याची वेळ आता डॉक्टरांवर आली आहे, असे म्हणल्यास गैर ठरू नये. हल्ल्यांचे गैर प्रकार वेळीच रोखले नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते समाजालाच भोगावे लागतील.
वैद्यक : एक अपूर्ण शास्त्र
वैद्यक शास्त्रामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागत असतात. त्याची व्याप्ती प्रचंड आहे; त्यामुळेच वैद्यकशास्त्र हे सतत विकसित होत असलेले शास्त्र आहे. 'दैव जाणिले कोणी' हे उपचारांबाबतीत नक्की लागू पडते. आपले मानवी शरीर हे एक अजब गुंतागुंतीचे यंत्र आहे. त्याची पूर्ण ओळख अजूनही झालेली नाही, हे अनेक डॉक्टर देखील मान्य करतात. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त आणि वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात. त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारांस यश आले नाही, तर त्याचा दोष डॉक्टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. आपला पेशंट मरावा, असे कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही. त्यामुळे या अपूर्णतेची कल्पना आपल्या सगळ्यांना असणे आवश्यक आहे.
पेशंटचीही जबाबदारी
एकीकडे बेफाम पणे गाडी चालवायची आणि जबर जखमी होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली, किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले, तरी खूप प्यायची आणि मग किडन्या - लिव्हर निकामी झाली, की त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे किंवा रिपोर्टमध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त दोन दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून ओरडायचे, इंटरनेटवरून माहिती घेऊन स्वतःचे स्वतःच उपचार करायचे आणि या सर्व प्रकारात गुण आला नाही, आजार बारा झाला नाही म्हणून दोष डॉक्टरांवर थापायचा. शेवटी डॉक्टरांनाच मारायचे, असे काहीसे प्रकार घडत असतात. आपण देखील 'प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर' या तत्वाचा वापर करणे उत्तम. एखाद्या रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला, तर यात डॉक्टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची, यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे. आता कित्येक डॉक्टर मंडळी त्यांच्या मुलांना या व्यवसायात येण्यापासून रोखत आहेत आणि हे खचितच चांगले लक्षण नाही.
निष्काळजीपणा आणि कायदा
याचा अर्थ डॉक्टरविरुद्ध काहीच कारवाई करता येत नाही असे नाही. याही व्यवसायात अपप्रवृत्ती आहेतच की. न्यायालयीन केसच्या भीतीमुळे आता डॉक्टर कुठलीही रिस्क घेत नाहीत आणि शक्य त्या सर्व टेस्ट करण्यास सांगतात. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे रुग्णाला कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाईही दिलेली आहे. त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाताऐवजी डाव्याच हाताचे ऑपेरेशन केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशननंतर पोटात कापसाचा गोळा विसरणे, अशा प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा केलेल्या आहेत. एकीकडे होणारे हल्ले आणि दुसरीकडे कोर्ट केसेसची भीती, असे इतर कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत आढळून येत नाही.
कायद्याचे कवच; पण कागदावरच?
इंडियन पीनल कोडमधील नेहमीच्याच तरतुदींबरोबरच महाराष्ट्रासारख्या अगदी मोजक्या काही राज्यांनी डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी विशेष कायदे पारित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील निष्काळजीपणापोटी डॉक्टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही असे म्हटले आहे, की जर प्रत्येकवेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले, तर डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल. अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल. हे विधान डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतदेखील तंतोतंत लागू पडेल.
'महाराष्ट्र वैद्यकीय व्यक्ती आणि संस्था, हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा' २०१० साली पारित झाला आहे. या कायद्यान्वये डॉक्टर, मेडिकलचे विद्यार्थी, हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, मदतनीस या सर्वांना हल्ल्यांपासून रक्षण दिले आहे. या कायद्यान्वये आरोपींना ५० हजार रुपये दंड आणि/अथवा तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे हॉस्पिटलच्या मालमत्तेचे, मशिनरीचे नुकसान झाल्यास, त्यांच्या किमतीच्या दुप्पट किमती एवढी नुकसान भरपाईदेखील आरोपींकडून वसूल करता येईल. या कायद्याखाली कदाचित पहिलीच शिक्षा मागील आठवड्यात पालघर येथील कोर्टाने दिल्याचे वाचनात आले. या कायद्याची नीट अंमलबजावणी झाल्यास अशा गैर प्रकारांना आळा बसू शकेल.
डॉक्टरांचे एकमेव असे प्रोफेशन असावे, की त्यांना एकाच वेळी पेशंटचा रोष आणि कायदेशीर कारवाईची भीती, अशा दोघांनाही सामोरे जावे लागते. डॉक्टरांवर हल्ला झाल्यास त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया ही संपावर जाण्याची असते; परंतु संप करणे हा कायदेशीर अधिकार नसल्याचे सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांनी वेळोवेळी सांगितल्यामुळे तो ही मार्ग बंद होतो. त्यात आता ग्राहक संरक्षण कायद्याचे कार्यक्षेत्र वाढविल्यामुळे डॉक्टरांच्या चिंतेत (अनाठायी) वाढ झाली आहे. भीतीमुळे आता हॉस्पटिलमध्ये बाउन्सर्स ठेवणे सुरू झाले आहे. सध्या डॉक्टर-पेशंट यांचे नातेसंबंध दुष्टचक्रात अडकले आहे.
उपाय काय?
सर्वसमावेशक केंद्रीय कायदा करणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर-पेशंट यांचे दुष्टचक्रात अडकलेले नातेसंबंध सुधारणे गरजेचे आहेत. यासाठी संवाद वाढणे गरजेचे आहे. पेशंट आणि त्याच्या नातेवाइकांना डॉक्टरांचे दोन सहानुभूतीचे शब्द हवे असतात, याकडे डॉक्टरांनी देखील लक्ष द्यावे. पेशंटला भेटायला येणाऱ्या 'व्हिजिटर्स'च्या संख्येवर नियंत्रण, हा एक महत्त्वाचा उपाय आहे. मुंबई उच्च न्यायालायने देखील २०१७ मध्ये मार्ड डॉक्टरांच्या याचिकेवर निर्णय देताना, पेशंटला भेटायला येणाऱ्या 'व्हिजिटर्स'ची संख्या एकावेळी दोन एवढीच ठेवावी, असा निकाल दिला आहे.
शेवटी आपण लक्षात घ्यावे, की डॉक्टर म्हणजे काही देव नाही. त्यांच्याही उपचारांना मर्यादा आहेतच आणि निष्काळजीपणा केल्यास डॉक्टरांवर कायद्याचा बडगाही उगारता येतो. कायदा हातात घेऊन डॉक्टरांवर काय किंवा कोणावरही हल्ला करणे, हे प्रगत समाजाचे खचितच लक्षण नाही. कमीत कमी कायदे आणि कमीत कमी हॉस्पिटल्स, हे प्रगत समाजाचे लक्षण आहे.