अ‍ॅपशहर

योगीराज देवनाथ महाराज

देवनाथ महाराज हे श्री माधवनाथ महाराजांचे परमशिष्य. नाशिकमध्ये अनेक वर्षे राहून त्यांनी भक्तांचे दैन्य, दु:ख दूर केले. पंचवटीतील मखमलाबाद नाका येथे त्यांची समाधी आहे. समाधीवर श्रीकृष्णाची मनोहारी मूर्ती विराजमान असून, समाधीवर डोके टेकवण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

प्रशांत भरवीरकर | Maharashtra Times 21 May 2017, 4:40 am
महान योगीपुरूष देवनाथ महाराजांचे संपूर्ण नाव विनायक नारायण जोशी. त्यांचा जन्म नाशिकजवळील गिरणारे येथे १८७८ मध्ये झाला. विनायकाच्या ठायी बाल्यावस्थेपासून दैवीसंपदा विकसत होती. ईश्वर दर्शनाची तीव्र लालसा हे साधकाचे मुख्य लक्षण. विनायकाच्या ठायी ही लालसा अगदी बालपणापासून तीव्रतेने वास करीत होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम avliyancha janthan yogiraj davnatha
योगीराज देवनाथ महाराज


विनायकाचे आंतरिक व आध्यात्मिक जीवन परमार्थ साधनेच्या तीव्रतेमुळे अधिकाधिक शुध्द व प्रगत होत होते. पारमार्थिक जीवनाची आर्तता परमावधीस पोहोचल्यावर नाशिकला १९०५ मध्ये विनायकाची योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांची भेट झाली. सदगुरूला सतशिष्य भेटले व सतशिष्याला सदगुरू भेटले. दोघेही एकमेकांची जणु चातकाप्रमाणे वाटच पहात होते. श्री माधवनाथ महाराजांनी विनायकावर अनुग्रह केला.

शालेय शिक्षण मामाकडे पूर्ण करून कुलकर्णी पदाचे काम शिकण्याकरीता पिंपळगाव गरूडेश्वर येथे आले. पिंपळगाव गरूडेश्वरापासून काही अंतरावर चक्रतीर्थ नावाचे पवित्र कुंड आहे. त्याठिकाणी तुकाराम गाथेचे अहोरात्र पारायण केले. याठिकाणी पारायणात मग्न असताना टाळघोषांचा मधूर ध्वनी कानी पडला. देहूनगरी दिसू लागली. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी दृष्टान्त दिला. ‘तुला वेरूळचे गुरू भेटतील, त्यांची भेट घेऊन तुझा कार्यभाग साधून घे म्हणजे सारे व्यवस्थित होईल.’ असा संदेशही मिळाला. मग काय निवृत्तीनाथांच्या यात्रेत त्र्यंबकेश्वरला श्री माधवनाथ महाराज आले होते. त्यांचा शोध घेऊन भेट घेतली. सदगुरू भेटताच विनायकाचे अष्टसात्त्विक भाव जागृत झाले. कंठ सदगदीत झाला व डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सदगुरू माधवनाथ महाराजांनी सर्व भक्तांना घरी पाठवून दिले व विनायकाला बोध करून नाशिक मुक्कामी पुन्हा भेटावयास सांगितले.

माधवनाथ महाराजांनी विनायकास खेचरी मुद्रा शिकवली. आपली जिव्हा वळवून पडजिभेच्या छिद्रातून भ्रुकूटीस्थानी नेऊन ठेवणे यास खेचरी म्हणतात. सदगुरूंच्या हस्ते जिभेच्या खालची शिर छेदन करून ही मुद्रा साधता येते. माधवनाथ महाराज त्यांना नेहमी म्हणत विनायका, तू गतजन्मीचा योगभ्रष्ट आहेस, खेचरीसाठीच तुझा जन्म झाला. नाशिकला त्या काळी नरसिंग महाराज नावाचे महान योगी रहात होते. विनायक त्यांचे नेहमी दर्शन घेत असे. एकदा रामनवमीस माधवनाथ महाराज नाशिकला आले असता दुपारच्या वेळी त्यांनी देवनाथांना तातडीने बोलावून घेतले आणि ‘लगेच जाऊन नरसिंग महाराजांचे दर्शन घे’ असे फर्मान काढले. नरसिंग महाराजांच्या पायावर देवनाथांनी डोके ठेवताच त्यांनी देवनाथांच्या दोन जोरात थपडा लगावल्या आणि ‘हमारे आसनपर चढते हो’ अशी पृच्छा केली. त्यामुळे देवनाथांना चांगल्याच झणझण्या आल्या. परंतु त्या थपडांचा प्रभाव रात्री दिसला, देवनाथांची कुंडलिनी वर चढू लागली आणि अमृतासमान आनंद झाला. या आनंदामुळे पुढे देवनाथ महाराज कधीही उदास वृत्तीत राह‌िले नाहीत.

१९१४ साली पिंपळगावी अश्विन महिन्यात प्लेगची साथ आली. तेव्हा देवनाथांनी अगोदरच सूचना देऊन ठेवली होती की गावाच्या पश्चिमेस झोपड्या बांधून त्यात वास करावा, त्याप्रमाणे सर्व गावकरी मंडळी आधीच तेथून निघून गेल्याने सर्वांचे प्राण वाचले. मात्र लक्ष्मणराव नावाचे त्यांचे शिष्य तापाने चांगलेच फणफणले. तो दिवस मार्गशीर्ष दशमीचा होता. दुसऱ्या दिवशी एकादशी असल्याने निवृत्तीनाथांच्या वारीस जाण्याचा लक्ष्मणरावांचा नियम होता. आता वारी चुकेल म्हणून त्यांना रूखरूख लागली परंतु देवनाथ महाराज घरी आले आणि ‘वारीस जा’ अशी सूचना केली. लक्ष्मणरावांचा ताप निघून गेला. वारी झाली, दर्शन झाले. लक्ष्मणराव घरी आले आणि पुन्हा तापाने फणफणले. यावरून देवनाथ महाराज नेहमी सांगत, कुणालाही भोग चुकत नाही.

१९१७ साली देवनाथ महाराज नाशकात आले व काशिनाथ कुकडे यांच्या घरात राहू लागले. तेथे काही दिवस किराण्याची दुकानदारी केली. त्यांच्या योगाभ्यासात मात्र खंड पडला नाही. भक्तांना ते संध्याकाळी दर्शन देत असत. हळूहळू भक्तगण वाढू लागले. त्रिकालज्ञ नाथ म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. दु:खी, कष्टी लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. शंकर दत्तात्रेय नावाच्या एका गृहस्थास पायाच्या व्याधीने ग्रासले होते. पुष्कळ दिवस औषधोपचार करूनही त्यास काही फरक पडेना तेव्हा तो देवनाथ महाराजांकडे आला त्यांना आपली व्यथा सांगितली. देवनाथ महाराजांनीही सदगुरूंच्या कृपेने दु:खमुक्त व्हाल असे सांगितले. दोन दिवसांनी काठीचा आधार न घेता शंकर दत्तात्रेय त्यांच्याकडे पायी आले. त्यानंतर माधवनाथ महाराजांनी आर्त जीवांचा तूच यापुढे त्राता होशील. माझे कार्य तुलाच करावे लागेल असे त्यांना सांगताच त्यांच्या मनी आनंदाचा कल्लोळ झाला. तेव्हापासून असंख्य भक्त देवनाथ महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. माधवनाथ महाराजांकडे जे भक्त जात त्यांना ते देवनाथ महाराजांकडे पाठवत.

इंदुरचे तुकोजीराव होळकर यांनी त्यांच्या गोपाळमंदिरात नाम सप्ताहास सुरूवात केली. शेवटच्या दिवशी काला आटोपून संपूर्ण गावास भोजनाचे आमंत्रण दिले मात्र आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली. आता मेघवृष्टी होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. तेव्हा देवनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला, ‘मनाप्रमाणे होईल’ आणि झालेही तसेच.

देवनाथ महाराजांची सप्तश्रृंगी देवीवर फार श्रध्दा होती. ते नित्य दर्शनासाठी सप्तशृंग गडावर जात असत. एकदा गडावर जाताना प्रचंड सोसाट्याचा वारा, पाऊस आला परंतु देवनाथ महाराज न डगमगता गडावर गेले. त्यांच्या भक्तीवर देवी प्रसन्न होत‌ी. गडावर जाताच त्यांना देवीने दृष्टान्तही दिला. मातेचे तेज:पुंज वदन पाहून देवनाथ महाराजांना खूप आनंद झाला. असा हा नाशिकचा अध्यात्म रवी, आपल्या गुरूची थोरवी गाऊन, ऋषीमुनींची प्राचीन परंपरा चालवत श्रावण द्वादशी १९४७ मध्ये ब्रह्मलीन झाला. श्री देवनाथ महाराजांची समाधी पंचवटीतील मखमलाबाद नाका (चौफुली) येथे आहे. समाधी तळघरात असून, वर श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती विराजमान आहे.

(संदर्भ : अनिल वि. पाठक यांच्या संग्रहातून)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज