अ‍ॅपशहर

​ वाचनगोडी कायम

शहरातील वाचन चळवळींतील तरुणांचा सक्रिय सहभाग, पुस्तकांमधील चोखंदळपणा आणि विशेषतः मराठी साहित्याबाबत माहिती तसेच मागणी, असे चित्र पाहिले की, हे आरोप किती बिनबुडाचे आहेत, हे प्रकर्षाने जाणवते.

Maharashtra Times 23 Apr 2017, 3:00 am
वाचनाची आस उरलेली नाही, कौतुकाने वाचणारी तरुण मंडळी ही केवळ इंग्रजी पुस्तकांनाच पसंती देत असल्याने मराठी साहित्याचे काय होणार, अशा अनेक शंकांचे जाळे विणले जाते. मात्र शहरातील वाचन चळवळींतील तरुणांचा सक्रिय सहभाग, पुस्तकांमधील चोखंदळपणा आणि विशेषतः मराठी साहित्याबाबत माहिती तसेच मागणी, असे चित्र पाहिले की, हे आरोप किती बिनबुडाचे आहेत, हे प्रकर्षाने जाणवते. डोंबिवलीत नुकत्याच पार पडलेल्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या निमित्ताने याचा पुन्हा प्रत्यय आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम good response for reading by youth
​ वाचनगोडी कायम


सानिका कुसूरकर

डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान हा अभिनव सोहळा नुकताच पार पडला. अशा स्वरुपाचा देशातील हा पहिलाच सोहळा होता. आपल्या घरातील पुस्तके इतर वाचकांना देत त्यांच्याजवळील पुस्तकांचा खजिना निवडण्यासाठी वाचकांनी तब्बल आठ दिवस गर्दी केली होती. आठ दिवसांत सात हजारांहून अधिक वाचकांनी लावलेली हजेरी आणि पन्नास हजार पुस्तकांचा खजिना ही आकडेवारी आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. आठ दिवसांचा लेखाजोगा असल्याने वाचकांची एवढी मोठी संख्या ही प्रत्येकाच्याच आकर्षणाचा विषय ठरला. खालवत चालेली वाचकसंख्या आणि मराठी पुस्तकांबाबत नसणारी उत्सुकता, अशा विधानांना छेद देणारे हे चित्र डोंबिवलीसह अनेक शहरांमध्ये दिसून येते. वाचन चळवळी, वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आखले जाणारे कार्यक्रम यांची वाढती संख्या, हेच त्यामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.

गरज सक्षम उपक्रमांची

वाचक नाहीत, असा सर्वसाधारण नियम मानून त्यासाठी प्रयत्नच न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र वाचकांचे संघटन करण्याचा एखादा प्रयत्न झाला, तर त्याला मिळणारा प्रतिसाद हा निश्चित आशादायी असतो. डोंबिवली, ठाणे, कल्याण, अशा वाचनप्रिय शहरांमध्ये अनेक संस्थांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. शब्दयात्रा, पुस्तकमेळा, साहित्यविश्व, पुस्तक आदानप्रदान, साहित्यानंद, अशा नानाविध कार्यक्रमांचा आस्वाद प्रत्येक आठवड्याला रसिकांना घेता येतो. या सर्वांमध्ये पुस्तक आणि वाचन हे समान धागे असतात. या उपक्रमांची सुरुवात झाली आणि त्याला मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे आयोजकांना टीकेचा सामनाही करावा लागला. मात्र कोणताही खंड न पाडता उपक्रम अविरत सुरू ठेवणाऱ्या उपक्रमांना काळानुसार चांगला प्रतिसाद मिळत गेला. सध्या तर अशा उपक्रमांना सर्व वयोगटांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे वाचकांच्या अनुपस्थितीवर खापर फोडण्यापेक्षा अशा उपक्रमांचा अधिकाधिक विस्तार होण्याची गरज वाचकांकडून व्यक्त केली जाते.

थोडा है थोडी के जरुरत है

शहरांतील अनेक वाचन चळवळींची सुरुवात ही तरुणांकडून केली जात आहे. काही वर्षांपासून या क्षेत्रात सक्रिय झालेल्या तरुणांना चांगल्या नियोजनाची गरज आहे. तरुणांकडील कल्पकता, ऊर्जा, काम करण्याची जिद्द यांचा उपयोग अधिकाधिक करून घेत त्यांचे योग्य नियोजन व्हावे, त्याचा वापर शहरातील इतर वाचकांनाही करून द्यावा, यासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या सुरू असणाऱ्या चळवळी, या समाधनाकराक असल्या तरी त्यात तरुणांचा सहभाग वाढवून ही चळवळ अविरत पुढे जाईल, यासाठी तज्ज्ञांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे.

मराठीचीच ओढ कायम

तरुणांना इंग्रजी भाषेची अधिक गोडी असून इंग्रजीपुढे मराठी साहित्याकडे ते पाठ फिरवतात, असा सर्रास आरोप केला जातो. मात्र वाचन उपक्रमातील प्रत्यक्ष चित्र यापेक्षा फारच वेगळे आहे. डोंबिवलीतील साहित्यानंदमध्ये दोन्ही भाषांतील पुस्तकांचा समावेश असला, तरी मराठी भाषेतील साहित्य खजिन्याकडेच आठही दिवस सर्वाधिक गर्दी होती. चेतन भगत, सुदीप नगरकर यांसारख्या लोकप्रिय लेखकांच्या इंग्रजी पुस्तकांकडे काही मोजकी तरुणाई वळली असली, तरी त्यांच्यासह वपु, पु. ल. देशपांडे यांचा तरुणांवरील प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. इंग्रजी पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकांचीच गोडी अधिक असल्याची नोंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. त्यासह इतर शहरातही होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये मराठी पुस्तकांकडेच तरुणांचा कल अधिक असल्याचे मान्यवरांकडून सांगितले जाते. यातही अनुवादित आणि ऐतिहासिक पुस्तकांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते.

हवी भक्कम साथ

अनेक तरुण साहित्य, काव्य, या क्षेत्रांत धडपड करत आहेत. जुन्या साहित्यांच्या संवर्धनासह नव्याची आस, यासाठीदेखील त्यांचे प्रयत्न सुरू असतात. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना संस्था, लेखक, वाचक, प्रकाशक यांची साथ मिळण्याची गरज आहे. तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळून देणे आणि त्यांच्याकडूनच वाचन संस्कृतीचा हा वारसा पुढे नेणे, यासाठी सर्वांच्याच एकत्रित योगदानाची गरज आहे. तरुण वाचकांच्या प्रतिसादावर ताशेरे ओढण्यापेक्षा त्यांच्या या धडपडीची दखल घेऊन वाचनाची ही परंपरा अविरत सुरू राहावी, यासाठी अधिक नवे उपक्रम आणि त्यातील सातत्य, यावर अधिक भर देण्याची गरज अनेक वाचकांकडून व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज