चराचरात देवत्व पाहणारा देश आता पाशवी होतोय. सृष्टीतील जनावरांना पशूंना आपल्या बुद्धी आणि विवेकाने ताब्यात ठेवणारा माणूस पशूंनाही लाजवेल असे वागू लागला. तेव्हा तो नक्की विकसित झालाय का? हा प्रश्न पडतो. उत्क्रांतीची अशी मजल माणूस स्वत:लाच संपवून गाठेल असे दिसतेय.
सना पंडित
उत्क्रांतीपासून, वसाहत, औद्योगिक क्रांती, शोध, वैद्यकीय क्रांती, तंत्रज्ञानाचे अवकाश, वैचारिक क्रांती, आर्थिक स्वतंत्रता, व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्यानंतर आताशी स्वातंत्र्य आणि स्वैराचार एकमेकांत विलीन झाले. संविधान-घटना आठवून आठवून हक्क आणि अधिकारांची चर्चा, मागणी आणि अंमलबजावणी तत्काळ होते. 'संवैधानिक हक्क', घटनादत्त अधिकार' म्हटले की सगळ्या क्षणिक, तात्पुरत्या भावनिक मागण्या रास्त आणि वैध ठरतात. सध्या भावनिक उद्रेक मूळ धरून कळस गाठतोय. या भावना हळुवार नसून अनावर, विषारी आहेत. चराचरात देवत्व पाहणारा देश पाशवी होतोय. सृष्टीतील जनावरांना पशूंना आपल्या बुद्धी आणि विवेकाने ताब्यात ठेवणारा माणूस पशूनाही लाजवेल असे वागू लागला असताना तो नक्की विकसित झालाय का, हा प्रश्न पडतो. उत्क्रांतीची अशी मजल माणूस स्वत:लाच संपवून गाठेल असे दिसतेय.
कथा महाकथांमधली यंत्रे विसाव्या शतकात अवतरीत झाली. संजयची दूरदृष्टी दूरचित्रवाणीतून आम्हा सगळ्यांना मिळाली. विमाने, संगणकतंत्र सगळे हाती आले. प्रत्येकाचे मंत्र वेगळे, पण जग जवळ आणले ते वितभर यंत्रांनी. माणूस मात्र थिजला, थांबला. हैदराबाद पीडितेची बातमी आली. पहिला प्रश्न पडला की २०१२च्या निर्भया प्रकरणानंतर समाजात काहीच बदल झाला नाही? मेणबत्त्या घेऊन निघालेले मोर्चे, धरणे, आक्रोश समाजातून कुठे गेला? महिना-दीड महिना सर्वप्रकारच्या माध्यमांतून हा विषय घराघरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला. तरीही अशा पाशवी अमानवी बलात्काराच्या घटना घडतातच कशा? ज्ञानेंद्रियं बधिर, निकामी झालीत की मने गारठली की मन दिसत नाही म्हणून मनाचा विचारच येत नाही? तशी तर बुद्धीही दिसत नाही, मेंदूत असते म्हणतात, प्रत्येकाची वेगळी. तीही एकदम लुप्त झाली?
शिक्षणाचा प्रचार, प्रसार आणि संचार सर्वदूर झाला. मोबाइलचा त्याहीपलीकडे. आज समाजातील जवळ-जवळ सर्व घटक शिक्षित आहेत. उपजीविकेसाठी काही ना काही व्यवसाय करणारे, व्यवहारज्ञान असणारे, मतदानासाठी पात्र असणारे सगळे नागरिक म्हणजेच समाज आणि देश. शिक्षण मिळवून शांत, संयमी, तेजस्वी व्हायचे की उद्रेकी, उर्मट, आतताई, अहंकारी व्हायचे? आपली वर्गवारी जंगली हिंस्त्र पशूंच्या वरची आहे. पण मानवाची अशी वर्तणूक उत्क्रांतीलाही मान्य नव्हती. दुसऱ्याचा जीव घेणारी आग मनातही पेटत नव्हती. माणसाच्या प्रगतीची भूक वाढली, तशी भावनिक भूक दाबली गेली. कल्पनेच्या भराऱ्या मेंदूने काबीज करता येऊ लागल्या. भावनांसाठी वेळच नव्हता. पोटाची भूक शमत होतीच. जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राण्यात आहार, निद्रा, मैथून या गरजा जन्मजातच असतात. आहार, निद्रा या गरजा पूर्ण होतातच. भय असतेच म्हणून नियम आणि संस्कार येतात. पण संक्रमण आणि प्रगतीच्या मागे लागून मैथुनावर बंधन आलेही आणि सुटलेही.
भारतीय समाजाने अनेक वार सोसले. समाज विध्वंसक झाला नाही. अशी बीभत्सता, निर्घृणता नव्हती आली. समाज तेव्हा अनेक आघाड्यांवर लढत होता. अन्यायही होता, पण मूल्ये होती माणसापाशी. मन होते. सतिप्रथा बंद पाडणारे राजा राममोहन रॉय, स्त्री शिक्षणासाठी धडपडणारे फुले दाम्पत्य, विधवा विवाहासाठी महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी काशिनाथ तेलंग आणि धोंडो केशव कर्वे आपल्यात होते. स्त्रियांसाठी संवेदनशील असणारा आजचा समाज हैदराबाद प्रकरण त्रयस्थपणे पाहतो का, हा प्रश्न पडतो. जिथले नागरिक नासा गाजवतात, अनेक धर्म-प्रार्थना स्थळ मिरवतात, पंचशील संदेश जगभर देतात, शक्तिपीठे, चार धाम, गुरुद्वारे, चर्च, शांतीचे संयमाचे भोक्ते असलेले भारतीय आज पुतळे झालेत. आमचे समाजातील वावरणे म्हणजे यंत्रवतच झाले आहे असे वाटते. वेगवेगळ्या मागण्या रेटून मोर्चे काढून एकी दाखवली जाते. बलात्काराविरुद्ध एकी होत नाही. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाराही पुरुषच होता. आता तिला जिवंत संपवणारा ही पुरुषच. ही खरी शोकांतिका आहे. का झाले असे. सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत.
स्त्री हक्क, स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, सक्षमीकरण, आरक्षण सगळे स्त्रियांसाठी सुरू आहेच. शिक्षणाचा प्रसार पूर्णपणे आलाय. सर्वच क्षेत्रात स्त्रीचा वावर आहे. पुरुष सहकाऱ्यांसोबत काम करत आहेत. सधनता आली आहे. संवादही आहेच. तरीही मन-बुद्धीने युक्त मानव स्त्री-पुरुष एकमेकांच्या इतके विरोधात? दुसऱ्याला नष्ट करावेसे वाटतेय. काही सुटतेय का? कुठे चुकतेय का? नक्कीच काही तरी दुवा तुटलाय. प्रगतीसोबत भौतिकता आणि चंगळवाद आलाय. पायावर उभे राहता राहता. सगळे एक एकटे उभे झाले. नव्या आस्मानात, नवी आव्हाने घेत आपली मुळे हलकी झाली. कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली. चौकोनी कुटुंब आले. घरातली दुसरी पिढी मूल्यशिक्षणाला मुकली. शाळांतूनही प्रकल्प म्हणून उपक्रम असतात, नैतिकतेचे शिक्षण, संस्कार आणि रीतभात हे कालबाह्य होत आहे. आपल्या पायावर उभे राहण्याच्या घाईत सहजसंवाद संपल्यात जमा आहे. केवळ औपचारिकता आली आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांसाठीच्या योजना राबवताना पुरुषांचा विचारच झाला नाही. पुरुषांच्या बरोबरीत येण्यास जो संघर्ष झाला, तो अजूनही त्याचा विस्तार करू शकला नाही. स्त्री-पुरुष या समाजाचे सन्माननीय आणि समान घटक आहेत. त्यामुळे या योजना राबवताना समाजात जो बदल होणार होता, त्यावर मंथनच झाले नाही. वैश्विकीकरण आणि उदारमतवाद आला पण व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्रेकही आला. तेव्ही जी गणिते बदलली, त्यात पुरुषांचा विचारच झाला नाही. अमाप कायदे झाले. पुरुष वाईटच हे गृहीत धरूनच प्रत्येक मंचावरून, नेत्यांकडून, माध्यमांतून फक्त स्त्रीची काळजी वर्तवण्यात आली. काही मूलभूत अधिकार दोघांचेही सारखेच, पण सध्या सार्वत्रिक संकेत आहे की स्त्री हक्कांबद्दल बोलायचे आणि वाहवा मिळवायची. स्त्रियांच्या बाबतीत निर्णय, कायदा ठरविताना पुरुषांच्या हक्कांचा, गरजांचा, सामाजिक रुढी चालीरितीचा अभ्यास झाला नाही. त्यामुळे ते आरोपीच्या पिंजऱ्यातच होते आणि आहेत. स्त्रीवरील अत्याचार मात्र त्यामुळे भीतीदायकरित्या वाढले.
सुदृढ समाजासाठी मूलत: स्त्री-पुरुष सामंजस्य ही एकच गरज आहे. कुठे-कुठे हे सकारात्मक चित्र आहे. शरीराकर्षण नैसर्गिक आहे. स्त्री-पुरुषांची मानसिक गरज आहे. विज्ञानसुद्धा हेच सांगते की १३-१४ ते २५ हे शारीरिक आकर्षणाचे वय असते. आज गाड्यांमध्ये, झाडामागे, कमी वर्दळीच्या ठिकाणी मुले-मुली स्वेच्छेने बसलेले असतात. सर्वप्रकारचे चाळे सुरू असतात. त्यात मुली ही असतातच ना? त्यामुळे समजदारी ही सर्व स्तरावर अपेक्षित आहे. बलात्कार रोखण्यासाठी कायदे अत्यंत कठोर हवे, पण नियमही हवेत.
नागपुरात तर एका चिमुरडीवर बलात्कार झाला. किळस येतेय. निराशावादाने समाज ग्रस्त आहे आणि दुसरीकडे उत्तानवादही आहे. अश्लील साहित्याचा फैलाव नको इतका आहे. मोबाइल डेटा अल्पदरात मिळतो आहे. बेरोजगारी तर आहेच. मग नको तेच पाहण्याकडे कल लाढतो आहे. शिवाय अत्यंत कमी कपड्यातल्या बायका, त्यांचे अंगप्रदर्शन. त्यावर कहर म्हणजे महानायक सांगतात, 'तुला तुझ्या कपड्यांवरून कोणी बरं वाईट ठरवायला नको, अशी हो. तुझे कपडे म्हणजे तुझं चरित्र नाही', यांच्याच इंडस्ट्रीमध्ये भूमिकेच्या मागणीनुसार कपडे तयार होतात आणि पुरस्कारही मिळतात.
आज जेव्हा बलात्काऱ्यांना मारून टाका, बाहेरच्या देशात असं आहे, तसं आहे, अशी ओरड होते. पण तिथे सगळेच नियमही पाळतात. निकालाला सात-आठ वर्षे वेळ लागत नाही. आपल्याकडे धोरण बनवणारे तत्कालिन घटनेवरून धोरण बनवत असतील तर हा पुढे फार मोठा विद्रोह घेऊन येईल. या विषयांवर आज लोक, माध्यम जे बोलत आहेत त्यातही राजकारण आहे. संवेदनशीलता लोकांचीच हरवली आहे. सामान्य नागरिक इतर गोष्टींसाठी जसे आग्रही असतात, तसे या भयंकर कृत्याचा विरोध करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांनाही भीती वाटते. एका राष्ट्रीय पक्षाचा नेता देशाला बलात्काराची राजधानी म्हणतो, पण सगळ्या संस्थाना एकत्र करून ठोस पावले का उचलली जात नाहीत? (पुरुषांची) ही विकृत मानसिकता आधी नव्हती. समाजाला पुढे नेणारे, योजना ठरवणारे, राबविणाऱ्यांनी तातडीने माध्यमे, न्यायसंस्था, वैद्यकीय संस्था, कायदा-अंमलबजावणी, महिला व बाल कल्याण, पुरुष कल्याण आणि गृहखाते यांनी कुठलाही स्वार्थ न पाहता सकारात्मक, कायमस्वरूपी निदान शोधायलाच हवे. पुरोगामित्वाची चादर ओढून डोळेझाक करायची. बलात्कार झाला तर ओरडून श्रद्धांजली वाहायची, जामिनावर सुटलेल्या आरोपींना जगण्याचा हक्क बहाल करायचा आणि दुसरा बलात्कार होईपर्यंत आपल्या कोषात जायचे!
सहचर्य, सहवेदना या पुन्हा अग्रस्थानी असायलाच हवी. स्त्रीवरील बलात्कार हा फक्त स्त्रीवर्गाची समस्या नाही. ही गंभीर सामाजिक समस्या आहे. जीवनमान वाढत असताना जीवन जगणे भीतीदायक, क्लेशदायक होत आहे. व्हेनेझुएला, सिरिया ही धगधगत्या स्थितीत आहेत. जीवनाच्या मूळ संकल्पनेच्या जवळ जाणे हे ताबडतोब गरजेचे आहे. कारण संचय, अधिकार ताबा हे उत्पत्तीनंतर आले. नंतर समाज व नियम. पण स्त्री-पुरुष ही या सृष्टीवरील सर्वात बलिष्ठ प्रजाती. ती आपसात एकमेकांना संपवण्यास उभी झाली तर भविष्य शून्य असेल. जगण्याचा आणि आनंदी जगण्याचा अधिकार स्त्री-पुरुष दोघांनाही आहे. त्यायोगे सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
ज्यावेळी घटना लिहिली गेली, त्यावेळी असे क्रौर्य समाजात नव्हते. त्यामुळे तत्काळ विचाराचा हा मुद्दा असावा. बलात्काऱ्यालाही शिक्षा हवी आणि बलात्कार करून खून, जाळपोळ करणाऱ्यांनाही हवी. कायद्यासोबतच पुरुषांच्या समस्या आणि मानसिकता याचा अभ्यास आणि स्त्री-पुरुष संबंध पुनर्निर्माण हा येत्या काळातील त्वरित हाताळायचा मुद्दा आहे. ऋषीमुनींचा भारत देश, वैज्ञानिकांचा भारत देश बलात्काऱ्यांची राजधानी नसावा ही इच्छा आणि मागणे आहे. अन्यथा स्त्रियाही शस्त्र उचलतील आणि हे युद्ध न संपणारे असेल.