- डॉ. केशव सखाराम देशमुख
सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून नावीन्यपूर्ण तसेच गुणवत्तापूर्ण पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी समाजबंधू म्हणून प्रत्येक मराठी माणसाची आहे.
समाजातील नागरिकांचा एक मोठा हिस्सा हा शिक्षणाच्या बाहेर राहून परंतु जीभेवरच्या भाषेला घेऊन समाजाशी संवादी राहत आलेला असतो. अशा माणसांसाठी मराठी किती सोबत करते, याबद्दल विचार करायला हवा. मातृभाषा मराठीचा जागर या दृष्टीने मला जास्त महत्त्वाचा वाटतो. महाराष्ट्रातला शहरी आणि ग्रामीण माणूस या दोन प्रचंड मोठ्या शाखांमधील प्रत्येक जण मराठीशी बोलणे आणि लिहिणे यांच्याशी संबंधित आहे. मराठी भाषिक या प्रांतातील प्रत्येक माणूस हा बँकेत जाऊन व्यवहार करतो, सरकारी कार्यालयात जाऊन तो त्याचे वैयक्तिक, सार्वजनिक काम पाहतो, नागरिक म्हणून त्याला जागोजागी बोलावे लागते. सही किंवा अंगठापण द्यावा लागतो. पालक म्हणून शिक्षणातील सर्व प्रकारच्या संस्थेत त्याला जावेच लागते.
याशिवायही विविध साधनांचा वापर करून तो प्रवास करतो. बाजारपेठा, उद्योग, नोकरी यानिमित्तही हा महाराष्ट्रीय माणूस समाजाशी जोडून असतोच. तेव्हा त्याचा विविध भाषा मातृभाषांशी संपर्क येतो. इतर भाषांचे अवगतीकरण करणे ही गोष्ट चांगलीच; पण माझी मराठी मातृभाषा म्हणून या माणसाच्या भाषेला ज्ञानात, व्यवहारात, शिक्षणात आणि सरकारी सर्व प्रकारच्या कचेरीत प्राधान्यक्रमाने स्थान दिलेले असले पाहिजे. यातच मराठी भाषा गौरवाची सार्थकता जास्त सामावलेली आहे हे विसरता कामा नये.
इतर भाषा येत नसतील तर महाराष्ट्रात त्यांची कुठेही अडवणूक होऊ नये याची काळजी सर्व मराठी मातृभाषा प्रेमींनी करायला हवी. ज्ञानभाषा म्हणून इतर अन्य भाषांचे श्रेय आणि स्थान मान्य करूनसुद्धा मराठी भाषा सुद्धा ज्ञानभाषेचा भाग बनण्यासाठी समाज म्हणून आपलेपण प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.
मराठीतून सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध असणे आणि तशी सोय करून देणे, सर्वप्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठीसाठी आग्रह बाळगणे पण गुणवत्ता जपत त्याबद्दचा विचार करणे, नव्या ज्ञानशाखांची पाठ्यपुस्तके मराठीत तयार करणे, मराठी भाषांतरीत साहित्य जगात घेऊन जाण्याची सुविध करणे, व्यवहारांच्या महत्त्वाच्या शासकीय, खाजगी सर्वच्या सर्व क्षेत्रांत मराठीचे कागद (छापील) उपलब्ध करून देणे, परिभाषा मराठीत भाषांतरीत करून जनतेला उपलब्ध करून आणि मराठी भाषाप्रेमींना दळणवळणासाठी कोणतीच अडचण होऊ नये, यासाठी प्रयत्न हीच मराठी भाषा गौरवाची खरी कार्य संस्कृती आहे, हे विसरता कामा नये.
मराठी ही शाळेतील शिक्षकांची किंवा ती शिकवणाऱ्या प्राध्यापकांची भाषा आहे. या कप्प्यामधून प्रथम बाहेर पडायला हवे. जनता आणि मराठी हे सूत्र मराठी भाषेच्या महती आणि विकासासाठी जास्त विचारात घेणे, हेच अधिक हितावह ठरेल. सार्वत्रिक मराठी होण्यासाठीचे हे सर्वात मोठे पाऊल आहे. हे पण लक्षात घ्यायला हवे. विद्यापीठे, महाविद्यालये जशी याबद्दल दिशा दिग्दर्शन करतील, त्याबरोबरच समाजातील मराठी माणूस म्हणून आपले प्रत्येकाचे यात उत्तरदायित्व आहे, हे टाळता येणारे नाही. समन्वयातून संवाद आणि या सामूहिक संवादातूनच मायमराठीचा विकास हाच विचार मातृभाषा मराठीच्या जागरासाठी अधिक गुणकारी ठरू शकेल असे वाटते.
मराठी माणूस म्हणून मराठीसाठी प्रत्येकजण काय करू शकतो, याचापण विचार मराठी भाषा गौरवानिमित्त करायलाच हवा. एक किंवा एकटा यात काही करू शकत नाही. उलट माणसांची साखळी हीच विकासाचा नकाशा उभा करत असतो. आणि रिझल्ट देऊ शकत असते. सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून नाविन्यपूर्ण तसेच गुणवत्तापूर्ण पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी समाजबंधू म्हणून प्रत्येक मराठी माणसाची आहे. यानिमित्त ठळकपणे काय करता येईल, जसे की
कोणताही भाषिक अथवा लिखित व्यवहार करताना समाज बंधू भगिनींना मराठीतून व्यवहाय करावयास अडचण येऊ नये.
लोकांच्या बोलण्याच्या भाषेचे संकलन जतन आणि ग्रंथरुपात लेखन व्हावे. जनतेची जीभेवर बसलेली भाषा जतन करण्याची मोहीम हाती घेतली जायला हवी.
बोली कसो की प्रमाणभाषा, या सर्व भाषांचे रक्षण झाले पाहिजे, यादृष्टीने मातृभाषा मराठीची महती व तिचा विकास साधला गेला पाहिजे.
इतर भाषा शिकण्याचे स्वागत आहेच पण मराठीला जपत, तिचा विकास करत समाजबंधूंनी सहयोग दिला पाहिजे.
नवीन तंत्रज्ञानांचा किंवा माहितीजालाचा मराठीच्या उत्कर्षासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. शासनाच्या मराठी भाषा धोरणातील उद्दिष्टांना धरून सांगायचे तर समाजमानसात मराठी भाषेविषयी आत्मियता उत्पन्न करणे आणि मराठी भाषेविषयी न्यूनगंड दूर करणे फार महत्त्वाचे आहे.
ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, वैद्यकशास्त्र विधी व अभियांत्रिकी इत्यादी सर्व ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षणासाठी मराठी माध्यम उपलब्ध करून देणे. असेही मराठी भाषाधोरणाचे एक उद्दिष्ट २०१४च्या मसुद्यात भाषा सल्लागार समितीने नमूद केले आहे आणि याचा विचार हळूहळू सुरू झालेला आहे. ज्ञानांची सर्व साधने मराठीत उपलब्ध होण्याच्या क्रियेला मराठी माणसांचा सहभाग हा सर्वाधिक रहायलाच हवा.
मराठी साहित्याचे, भाषेचे, बोलींचे कोश जास्तीत जास्त तयार व्हावेत आणि त्यांची समाजोपलब्धी असायला हवी.
प्रसारमाध्यमांनी मराठी भाषा मातृभाषांच्या लोकजागरणासाठी हिरीरीने सहभाग घ्यावा. कारण सामाजिक क्रांतीसाठी तसेच ज्ञानपरिवर्तनासाठी प्रसारमाध्यमं हिच बलवान भूमिका घेत मराठी उत्कर्षासाठी आपले अतुलनीय योगदान देऊ शकतात. वाचन क्रांतीत आणि समाजबदलात माध्यमाचे स्थान सदोदित फारच ठळक राहिलेले आहे. वृत्तपत्रे आणि जनता हा धागा मराठी मातृभाषाविकासदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे.
इंटरनेट, सोशल मीडिया आणि याप्रकारीच जगव्यापी नाना साधने सर्व समाजाच्या हातात आहेत. त्यातून मराठी केंद्रवर्ती ठेवून मातृभाषेचा उत्कर्ष साधणे हे सुलभ आहे. असे चांगले आग्रह व तीव्र इच्छाशक्ती समाजमनात वाढीस लागली पाहिजे.
मराठी साहित्य, लोकसाहित्य, लोकरंगभूमी, मराठी चित्रपट आणि अभिजात स्वरूपाचे सर्व लोकाविष्कार यांचे जतन प्रसारण जास्तीत जास्त वाढविण्याचा कल हा वाढीस लागला पाहिजे.
शिक्षणप्रक्रियेत सहभागी सर्वसर्व घटकांसाठी आणि विद्यार्थीजगतासाठी मराठी मध्यभागी ठेवत विविध स्पर्धा सतत घेत राहणे तसेच त्यातून स्पर्धांची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे. याबद्दल विचार आणि विचारातून कृतिविचार हा वाढवला जायला हवा.
अत्याधुनिक साधनांची समाजात आज सहज उपलब्धी आहे. ज्यामुळे विश्वबंधुत्त्वाचे नाते प्रस्थापित झाले. यादृष्टीने मराठी कळफलक किंवा युनिकोडप्रणित मराठी अशा पुष्कळ विषयांचे लेखन, चर्चा, प्रशिक्षण, कार्यशाळा झाल्या तर मायमराठीच्या गौरवाची खरी सुरूवात ही समाजातून रुजेल.
पळणारे हे धावते जग आणि झपाट्याने बदलणारा काळ यांच्यासोबत मराठी माणसाला राहावे लागेल. त्यापासून दूर जाता येणार नाही. उलट हे सर्व स्वीकारतच मराठीचा उंच ध्वज जगात फडकवण्याची संधी म्हणून बदलणाऱ्या काळाकडे, जगाकडे पहावे लागेल आणि यात सर्व मराठी समाजबंधू भगिनींचा सहभाग असायला हवा.