प्रा. दिनकर बोरीकर
ख्यातनाम सिनेगायिका मुबारक बेगम यांचे १८ जुलै २०१६ रोजी जोगेश्वरी मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’ या स्वतः गायिलेल्या ओळी सत्य स्वरुपात उतरल्या आणि उरल्या केवळ मुबारक बेगम यांच्या स्मृती.
सुजनगढ, चुरु, राजस्थान येथे १९३५ मध्ये मुबारक बेगम यांचा जन्म झाला. जेमतेम परिस्थिती असलेल्या या कुटुंबात आकाशवाणीवर सुगम गाणे म्हणत, त्यांनी आपला संगीतप्रवास सुरू केला. अनेक खाचखळगे पार करीत अडचणींचा सामना करीत मुबारक बेगम यांनी आपली संगीतप्रज्ञा जपत स्वतःला एक स्वयंसिद्ध गायिका म्हणून स्थित केले. ‘आईये’ या हिंदी सिनेमापासून मुबारक बेगम यांनी गायिका म्हणून चित्रनगरीत प्रवेश केला. आपल्या सुरेल गायकीने त्यांनी हे नवे दालन उत्तरोत्तर समृद्ध करण्याचा सचोटीने प्रयत्न केला.
यात त्यांना अनेक अडचणी आल्या, परिस्थितीनेही त्यांना गांजले. मायावी जगतातील व्यवस्थेने सुद्धा अनेक संकटे त्यांच्यापुढे उभी केली. परंतु स्वयंसिद्धतेची कास धरणाऱ्या मुबारक बेगम यांनी ‘आओ चलो सखी वहाँ’ या गाण्यात गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबरोबर गायन करून आपली गायकीसुद्धा स्वरांचे ‘मुबारक’ लेणे आहे, हे सिद्ध केले.
हमराही, हमारी याद आयेगी, देवदास, मधुमती, सरस्वतीचंद्र यांसारख्या गाजलेल्या आणि संगीताच्या दृष्टीनेही रसिक आस्वादकतेच्या पातळीवर उतरलेल्या महान चित्रकृतींमधून मुबारक बेगम यांनी आपल्या स्वरांचा आलेख सदैव चढता ठेवला. नौशाद, खय्याम, मदनमोहन, सलील चौधरी अशा दिग्गज संगीतकारांच्या पसंतीचे त्या काळातील पहिले नाव मुबारक बेगम यांचेच होते. खरे म्हणजे मुबारक बेगम या त्या काळामध्ये सिनेगायकीच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होत्या. हे स्थान त्यांना कायम अबाधित ठेवता आलेही असते, परंतु प्रसिद्घीचा सोस आणि संचयाची बाधा नसलेल्या मुबारक बेगम यांच्या निरागस मनाला तिथले राजकारण भावले नाही. ‘मी-तू’च्या जगापासून त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले. परिणामी त्यांना आयुष्याच्या सायंकाळी अत्यंत हालअपेष्टा सहन करीत विपन्नावस्थेत जगावे लागले. अतिशय लाडक्या असलेल्या त्यांच्या कन्येला एक-दोन नव्हे, तर तब्बल पन्नास वर्षे पार्किसन्ससारख्या क्रूर आजाराने जायबंद केले आणि यातच तिचा अंत झाला. मुबारक बेगम यांच्या संवेदनशील मनाला यामुळे घणाघाती वेदना झाल्या.
कलावंतांचं आयुष्य मध्यान्हावर आलेल्या सूर्यासारखे असते. त्याला अत्युच्च तेजाची झळाळी तर असतेच, परंतु सातत्य नसल्याने ही सुखाची मात्रा अल्पजीवी ठरते आणि मग कफल्लकता आयुष्याचा ताबा घेते. या विपन्नतेने स्वरांची राणी असलेल्या मुबारक बेगम यांनाही सोडले नाही. या सर्व दुःखदायी वेदना मुबारक बेगम यांनी उभ्या आयुष्यामध्ये अनुभवल्या. परंतु यामुळे त्या कधीही विचलीत झाल्या नाहीत. तर अत्यंत करारीपणाने त्यांनी परिस्थितीचा सामना केला.
मुबारक बेगम यांच्या सुरेल आणि स्वाभिमानी कंठावर प्रेम करणारे अनेक हात त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले. राज्य शासनानेही त्यांना या प्रसंगी मदत केली यात सामाजिक दायित्व निभावणारी स.भु. शिक्षण संस्थादेखील मागे नव्हती. सभुने ही आपला खारीचा वाटा उचलत पन्नास हजार रुपयांचा धनादेश संगीत विभागप्रमुख डॉ. संजय मोहड आणि नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. किशोर शिरसाट यांच्या करवी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सुपूर्द केला. या वेळी मुबारक बेगम यांनी सभुविषयी कृतज्ञता व्यक्त करीत संस्थेच्या भरभराटीसाठी मनापासून शुभाशिषही दिले. खरोखरच मुबारक बेगम म्हणजे स्वरांचे ‘मुबारक’ लेणेच जणू! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
(लेखक स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.)