कौशल इनामदार
अभिनेते ऋषी कपूर मध्यंतरी एका मुलाखतीत संगीत कंपन्यांच्या दादागिरीविरुद्ध चांगलंच ठणकावून बोलले. ते म्हणाले, ‘त्यांना असे अनेक कलाकार भेटतात जे या संगीत कंपन्यांच्या अरेरावीमुळे त्रस्त आहेत, वैफल्यग्रस्त आहेत. संगीत कंपन्या कलाकारांचं शोषण करतात, गायक, संगीतकार, गीतकार यांच्याशी असे करार करतात, जे कलाकारांसाठी त्रासदायक आणि तोट्याचे असतात.’ ते पुढे असंही म्हणाले, ‘आज आपण गाणी केवळ ऐकत नाही, तर पाहतोसुद्धा. आमच्या काळात आम्ही प्रेक्षकांना गाणी तयार करून आधी ऐकवत असू. आज संगीत कंपन्यांकडे गेलात, तर ते म्हणतात, आम्ही अशा गाण्यांचे रिंगटोन बनवू शकत नाही. आता रिंगटोनसारख्या गोष्टींचा विचार करून गाणी बनवण्यात येतात. अशा परिस्थितीत चांगली गाणी तयार तरी कशी होणार? संगीत क्षेत्रात चांगलं काम न झाल्यामुळे अनेक संगीत दिग्दर्शक आणि गीतकारही त्रस्त आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला जे काम करावंसं वाटतं ते आम्हाला करायची संधीच मिळत नाही आणि प्रेक्षक आम्हाला शिव्या देतात, की आम्ही चांगलं काम करत नाही.’
ऋषी कपूर यांच्या या उद्रेकाशी बऱ्याच प्रमाणात मी सहमत आहे. त्यांच्या काही मुद्द्यांचा संगीतकार म्हणून एक धावता परामर्श मी घेणार आहे. पहिला मुद्दा आहे शोषणाचा. संगीत कंपन्या कलाकारांचं शोषण करतात, ही बाब काही तशी फारशी नवी नाही. यापायीच गीतकार जावेद अख्तर यांच्या पुढाकाराने १९५७ च्या कॉपीराइट कायद्यात बदल घडून आले आणि २०१२ कॉपीराइट कायदा दुरुस्ती मंजूर करण्यात आली. मात्र, त्याचा म्हणावा तसा फायदा कलाकारांना अजून होताना दिसत नाही आणि याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे संगीत व्यवसाय हा कायमच असंघटित होता आणि दुसरं आणि अधिक महत्त्वाचं कारण, म्हणजे कलाकार आजही आपल्या बौद्धिक संपदा हक्कांबद्दल अनभिज्ञ आहेत.
इतर क्षेत्रांप्रमाणे संगीत क्षेत्राचंही शतकाच्या सुरुवातीला ‘डिजिटलीकरण’ सुरू झालं. सुरुवातीला ध्वनिमुद्रण डिजिटल स्वरूपात असलं, तरी अखेरची उत्पादित वस्तू ही मूर्त स्वरूपातच उपलब्ध व्हायची. उदाहरणार्थ, स्पूल, एल्पी, कॅसेट आणि नंतर सीडी आणि डीव्हीडी. कविता सुचणं आणि तिला चाल देणं, यात पैशांची शून्य गुंतवणूक लागत असली, तरी गाणं ध्वनिमुद्रित करणं ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया होती आणि आहे. तो खर्च जरी एखाद्या कलाकाराने उचलला, तरी पुढचा वितरणाचा भाग हा त्या कलाकाराच्या आवाक्याबाहेरच होता. त्यासाठी त्याला संगीत कंपन्यांची गरज भासे. मग संगीत कंपन्यांचे चालक आपापल्या रुचीप्रमाणे (किंवा समाजाच्या अभिरुचीप्रमाणे) काय वितरित करायचं, ते ठरवायचे. त्यात त्यांचा हेतू अधिकाधिक नफा कमावणं (जो व्हायलाच हवा.) हाच असे; पण तो नफा कलाकाराच्या जीवावर या कंपन्या वाढवू पाहायला लागल्या आणि त्याचे दूरगामी परिणाम संगीत क्षेत्राला भोगावे लागले, असं माझं मत आहे.
माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो, म्हणजे काही गोष्टी स्पष्ट होतील. साधारण १९९९ची गोष्ट. माझा पहिला अल्बम (शुभ्र कळ्या मूठभर) साधारण १९९९ सालची गोष्ट. त्यानंतर मी आणखी एक अल्बम केला होता. त्याची निर्मितीही मीच केली. या अल्बममध्ये हौशी असे गायक कोणीच नव्हते. निर्मिती प्रक्रियेलाच अडीच-तीन लाख रुपये खर्च आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या पदाधिकाऱ्याने तो अल्बम ऐकून मला बोलावलं. ‘आमची कंपनी तुझा अल्बम मार्केट करेल. तुला १० टक्के रॉयल्टी देऊ,’ अशी त्यानं घोषणाच करून टाकली. मी विचारलं, ‘पण तुम्ही तुमच्या बाजूने काय करणार? व्हिडिओ करणार का? जाहिरात करणार का?’ तो पदाधिकारी हसला. ‘मराठीसाठी हे सगळं परवडत नाही. मागे अमुक अमुक कलाकाराचा अल्बम आम्ही केला आणि दहा हजार प्रतीही नाही खपल्या.’ हा अमुक अमुक कलाकार माझ्यापेक्षा अधिक नावाजलेला आणि अनुभवी होता. माझ्या मनात विचार आला - आणि मी तो त्या पदाधिकाऱ्याला बोलून दाखवला, ‘माझ्यापेक्षा अधिक नावाजलेल्या कलाकाराच्या अल्बमच्या तुम्ही दहा हजार प्रतीच विकल्यात, तर माझ्या अल्बमच्या किती विकाल? पण आपण असं धरून चालू, की दहा हजार प्रती विकल्यात, तरी दहा टक्क्यांप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्याल – तेही एका वर्षभराच्या काळात. मला खर्च आला आहे, अडीच लाख रुपये. अगदी नफा नाही झाला, तरी खर्च केलेले पैसे परत मिळावे, अशी माझी किमान अपेक्षा आहे. तरच मी माझा पुढचा अल्बम करू शकतो.’ ते म्हणाले, ‘तुझं म्हणणं बरोबर आहे; पण आमच्या कंपनीची हीच पॉलिसी आहे.’
पुढे पुढे काही कंपन्यांची अरेरावी इतकी वाढत गेली, की ते सीडी वितरित करण्याचे पैसे निर्मात्याकडूनच घ्यायचे. इतकंच नव्हे, तर काही सीडींच्या प्रती निर्मात्यालाच (म्हणजे बहुतेक वेळा कलाकारच! कारण बिगरफिल्मी संगीताला निर्माता मिळत नाही) घ्यायला लावायचे! मग सीडी आणि डीव्हीडीही बंद झाल्या आणि संगीत संपूर्ण व्हर्च्युअल रूपात आपण अनुभवायला लागलो. आता एक नवं आव्हान असं समोर आलं, की संगीत विकत घेण्याचं प्रमाण कमी झालं आणि जवळजवळ थांबलंच. पायरसीही वाढली, कारण डिजिटल प्रती करणं कुणासाठीही सोपं होऊन गेलं. एखादं गाणं यू-ट्यूबवरून कॉपी करून व्हॉट्स अॅपवर पाठवणं ही मुळात बौद्धिक संपदेची चोरी आहे, याचं भानच लोकांना नसतं. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की संगीतावर पैसे मिळवण्याकरता संगीत कंपन्या इतर मार्ग शोधू लागल्या. रिंगटोन, कॉलरट्यून, रेडिओ, यू-ट्यूब आणि इतर डिजिटल मंच यांमधून पैशाची आवक सुरू झाली. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे लोकांची अवधान कक्षा (अटेन्शन स्पॅन) झपाट्याने कमी होत गेली. आता स्वागतधुनेचंच उदाहरण घ्या. समोरच्या माणसानं फोन उचलेपर्यंतच आपल्याला ती धून ऐकू येते. जेमतेम ५ ते ८ सेकंद, म्हणजे पाच सेकंदांत मनाचा ठाव घेतला नाही, तर गाण्याचं सौंदर्यमूल्य उत्तम जरी असलं, तरी त्याला कमर्शियल मूल्य नाही. याचाच अर्थ असा, की गाणं चांगलं आहे, की वाईट, यापेक्षा ते लक्षवेधी आहे, की नाही, याला जास्त महत्त्व आलं. आणि म्हणूनच सोप्या चाली, छोटी स्वरवाक्यं आणि हुकलाइनच्या फॉर्म्युलावरच अधिकतर गाणी तयार होताना आपल्याला आढळतात.
ऋषी कपूर यांचा उद्रेक मी समजू शकत असलो आणि त्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती असली, तरी मला असंही वाटतं, की दोष द्यायची वेळ संपलेली आहे. आता संगीतकार, गीतकारांना स्वतःचे हक्क कळायला हवेत. संगीत कंपन्यांची मोनोपोली झुगारून कलाकारांनी आपला असा एक श्रोतृवर्ग तयार करायला हवा. ही हळू आणि काही प्रमाणात वेदनादायक प्रक्रिया असेल; पण अपरिहार्य आहे. इंटरनेटमुळे काही तोटे झाले असतील; पण इंटरनेट हे एक लोकशाही व्यासपीठही आहे, हे आपण विसरता कामा नये. माझ्यापुरतं तरी मी केव्हाच ठरवलं, की आपण आपलं संगीत थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं. रस्ता खडतर आहे; पण मी माझ्या मर्जीचा बादशहा आहे. मला हवं तेच संगीत लोकांना ऐकवण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. संगीतकाराने काय प्रकारचे संगीत करायला हवे आणि श्रोत्यांनी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला हवे, हे मधल्यांनी ठरविण्याची गरज नाही. संगीतकार आणि श्रोत्यांमध्ये थेट संवाद व्हावा. शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची वाटते. संगीताकडे वस्तू म्हणून न पाहता, संपत्ती म्हणून पाहायला हवं – संगीतकारांनीही आणि श्रोत्यांनीही!
(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)
अभिनेते ऋषी कपूर मध्यंतरी एका मुलाखतीत संगीत कंपन्यांच्या दादागिरीविरुद्ध चांगलंच ठणकावून बोलले. ते म्हणाले, ‘त्यांना असे अनेक कलाकार भेटतात जे या संगीत कंपन्यांच्या अरेरावीमुळे त्रस्त आहेत, वैफल्यग्रस्त आहेत. संगीत कंपन्या कलाकारांचं शोषण करतात, गायक, संगीतकार, गीतकार यांच्याशी असे करार करतात, जे कलाकारांसाठी त्रासदायक आणि तोट्याचे असतात.’ ते पुढे असंही म्हणाले, ‘आज आपण गाणी केवळ ऐकत नाही, तर पाहतोसुद्धा. आमच्या काळात आम्ही प्रेक्षकांना गाणी तयार करून आधी ऐकवत असू. आज संगीत कंपन्यांकडे गेलात, तर ते म्हणतात, आम्ही अशा गाण्यांचे रिंगटोन बनवू शकत नाही. आता रिंगटोनसारख्या गोष्टींचा विचार करून गाणी बनवण्यात येतात. अशा परिस्थितीत चांगली गाणी तयार तरी कशी होणार? संगीत क्षेत्रात चांगलं काम न झाल्यामुळे अनेक संगीत दिग्दर्शक आणि गीतकारही त्रस्त आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला जे काम करावंसं वाटतं ते आम्हाला करायची संधीच मिळत नाही आणि प्रेक्षक आम्हाला शिव्या देतात, की आम्ही चांगलं काम करत नाही.’
ऋषी कपूर यांच्या या उद्रेकाशी बऱ्याच प्रमाणात मी सहमत आहे. त्यांच्या काही मुद्द्यांचा संगीतकार म्हणून एक धावता परामर्श मी घेणार आहे. पहिला मुद्दा आहे शोषणाचा. संगीत कंपन्या कलाकारांचं शोषण करतात, ही बाब काही तशी फारशी नवी नाही. यापायीच गीतकार जावेद अख्तर यांच्या पुढाकाराने १९५७ च्या कॉपीराइट कायद्यात बदल घडून आले आणि २०१२ कॉपीराइट कायदा दुरुस्ती मंजूर करण्यात आली. मात्र, त्याचा म्हणावा तसा फायदा कलाकारांना अजून होताना दिसत नाही आणि याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे संगीत व्यवसाय हा कायमच असंघटित होता आणि दुसरं आणि अधिक महत्त्वाचं कारण, म्हणजे कलाकार आजही आपल्या बौद्धिक संपदा हक्कांबद्दल अनभिज्ञ आहेत.
इतर क्षेत्रांप्रमाणे संगीत क्षेत्राचंही शतकाच्या सुरुवातीला ‘डिजिटलीकरण’ सुरू झालं. सुरुवातीला ध्वनिमुद्रण डिजिटल स्वरूपात असलं, तरी अखेरची उत्पादित वस्तू ही मूर्त स्वरूपातच उपलब्ध व्हायची. उदाहरणार्थ, स्पूल, एल्पी, कॅसेट आणि नंतर सीडी आणि डीव्हीडी. कविता सुचणं आणि तिला चाल देणं, यात पैशांची शून्य गुंतवणूक लागत असली, तरी गाणं ध्वनिमुद्रित करणं ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया होती आणि आहे. तो खर्च जरी एखाद्या कलाकाराने उचलला, तरी पुढचा वितरणाचा भाग हा त्या कलाकाराच्या आवाक्याबाहेरच होता. त्यासाठी त्याला संगीत कंपन्यांची गरज भासे. मग संगीत कंपन्यांचे चालक आपापल्या रुचीप्रमाणे (किंवा समाजाच्या अभिरुचीप्रमाणे) काय वितरित करायचं, ते ठरवायचे. त्यात त्यांचा हेतू अधिकाधिक नफा कमावणं (जो व्हायलाच हवा.) हाच असे; पण तो नफा कलाकाराच्या जीवावर या कंपन्या वाढवू पाहायला लागल्या आणि त्याचे दूरगामी परिणाम संगीत क्षेत्राला भोगावे लागले, असं माझं मत आहे.
माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो, म्हणजे काही गोष्टी स्पष्ट होतील. साधारण १९९९ची गोष्ट. माझा पहिला अल्बम (शुभ्र कळ्या मूठभर) साधारण १९९९ सालची गोष्ट. त्यानंतर मी आणखी एक अल्बम केला होता. त्याची निर्मितीही मीच केली. या अल्बममध्ये हौशी असे गायक कोणीच नव्हते. निर्मिती प्रक्रियेलाच अडीच-तीन लाख रुपये खर्च आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या पदाधिकाऱ्याने तो अल्बम ऐकून मला बोलावलं. ‘आमची कंपनी तुझा अल्बम मार्केट करेल. तुला १० टक्के रॉयल्टी देऊ,’ अशी त्यानं घोषणाच करून टाकली. मी विचारलं, ‘पण तुम्ही तुमच्या बाजूने काय करणार? व्हिडिओ करणार का? जाहिरात करणार का?’ तो पदाधिकारी हसला. ‘मराठीसाठी हे सगळं परवडत नाही. मागे अमुक अमुक कलाकाराचा अल्बम आम्ही केला आणि दहा हजार प्रतीही नाही खपल्या.’ हा अमुक अमुक कलाकार माझ्यापेक्षा अधिक नावाजलेला आणि अनुभवी होता. माझ्या मनात विचार आला - आणि मी तो त्या पदाधिकाऱ्याला बोलून दाखवला, ‘माझ्यापेक्षा अधिक नावाजलेल्या कलाकाराच्या अल्बमच्या तुम्ही दहा हजार प्रतीच विकल्यात, तर माझ्या अल्बमच्या किती विकाल? पण आपण असं धरून चालू, की दहा हजार प्रती विकल्यात, तरी दहा टक्क्यांप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्याल – तेही एका वर्षभराच्या काळात. मला खर्च आला आहे, अडीच लाख रुपये. अगदी नफा नाही झाला, तरी खर्च केलेले पैसे परत मिळावे, अशी माझी किमान अपेक्षा आहे. तरच मी माझा पुढचा अल्बम करू शकतो.’ ते म्हणाले, ‘तुझं म्हणणं बरोबर आहे; पण आमच्या कंपनीची हीच पॉलिसी आहे.’
पुढे पुढे काही कंपन्यांची अरेरावी इतकी वाढत गेली, की ते सीडी वितरित करण्याचे पैसे निर्मात्याकडूनच घ्यायचे. इतकंच नव्हे, तर काही सीडींच्या प्रती निर्मात्यालाच (म्हणजे बहुतेक वेळा कलाकारच! कारण बिगरफिल्मी संगीताला निर्माता मिळत नाही) घ्यायला लावायचे! मग सीडी आणि डीव्हीडीही बंद झाल्या आणि संगीत संपूर्ण व्हर्च्युअल रूपात आपण अनुभवायला लागलो. आता एक नवं आव्हान असं समोर आलं, की संगीत विकत घेण्याचं प्रमाण कमी झालं आणि जवळजवळ थांबलंच. पायरसीही वाढली, कारण डिजिटल प्रती करणं कुणासाठीही सोपं होऊन गेलं. एखादं गाणं यू-ट्यूबवरून कॉपी करून व्हॉट्स अॅपवर पाठवणं ही मुळात बौद्धिक संपदेची चोरी आहे, याचं भानच लोकांना नसतं. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की संगीतावर पैसे मिळवण्याकरता संगीत कंपन्या इतर मार्ग शोधू लागल्या. रिंगटोन, कॉलरट्यून, रेडिओ, यू-ट्यूब आणि इतर डिजिटल मंच यांमधून पैशाची आवक सुरू झाली. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे लोकांची अवधान कक्षा (अटेन्शन स्पॅन) झपाट्याने कमी होत गेली. आता स्वागतधुनेचंच उदाहरण घ्या. समोरच्या माणसानं फोन उचलेपर्यंतच आपल्याला ती धून ऐकू येते. जेमतेम ५ ते ८ सेकंद, म्हणजे पाच सेकंदांत मनाचा ठाव घेतला नाही, तर गाण्याचं सौंदर्यमूल्य उत्तम जरी असलं, तरी त्याला कमर्शियल मूल्य नाही. याचाच अर्थ असा, की गाणं चांगलं आहे, की वाईट, यापेक्षा ते लक्षवेधी आहे, की नाही, याला जास्त महत्त्व आलं. आणि म्हणूनच सोप्या चाली, छोटी स्वरवाक्यं आणि हुकलाइनच्या फॉर्म्युलावरच अधिकतर गाणी तयार होताना आपल्याला आढळतात.
ऋषी कपूर यांचा उद्रेक मी समजू शकत असलो आणि त्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती असली, तरी मला असंही वाटतं, की दोष द्यायची वेळ संपलेली आहे. आता संगीतकार, गीतकारांना स्वतःचे हक्क कळायला हवेत. संगीत कंपन्यांची मोनोपोली झुगारून कलाकारांनी आपला असा एक श्रोतृवर्ग तयार करायला हवा. ही हळू आणि काही प्रमाणात वेदनादायक प्रक्रिया असेल; पण अपरिहार्य आहे. इंटरनेटमुळे काही तोटे झाले असतील; पण इंटरनेट हे एक लोकशाही व्यासपीठही आहे, हे आपण विसरता कामा नये. माझ्यापुरतं तरी मी केव्हाच ठरवलं, की आपण आपलं संगीत थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं. रस्ता खडतर आहे; पण मी माझ्या मर्जीचा बादशहा आहे. मला हवं तेच संगीत लोकांना ऐकवण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. संगीतकाराने काय प्रकारचे संगीत करायला हवे आणि श्रोत्यांनी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला हवे, हे मधल्यांनी ठरविण्याची गरज नाही. संगीतकार आणि श्रोत्यांमध्ये थेट संवाद व्हावा. शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची वाटते. संगीताकडे वस्तू म्हणून न पाहता, संपत्ती म्हणून पाहायला हवं – संगीतकारांनीही आणि श्रोत्यांनीही!
(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)