- प्रा. एच. एम. देसरडा
महात्मा गांधी यांची १५०वी जयंती देशातच नव्हे, तर सर्व जग एक महापर्व मानून त्या ऐतिहासिक बाबींचे स्मरण, चिंतन मंथन करण्यास सज्ज होत आहे. खरं तर अवघे जग, समस्त मानवसमाज गांधीजींना सद्विवेक, सत्य, अहिंसा, शंतता व करुणेचे प्रतीक मानतो. हाच महामार्ग आहे, प्रचलित गर्तेतून बाहेर पडण्याचा!
जगाला गांधींच्या निसर्गकेंद्री जीवनशैलीकडे वळण्याखेरीज गत्यंतर नाही. या भूमिकेचा स्वीकार केला जात आहे. अर्थात, ज्या पाश्चात्य औद्योगिकरण-आधुनिकरणचा १९०९साली ‘हिंद स्वराज’ या ग्रंथात गांधीजींनी निःसंदिग्ध शब्दात अव्हेर केला, त्याचे मर्म व धोके आज अनुभवास येत आहेत. कहर व कडेलोट होइपर्यंत याकडे दुर्लक्ष करणे खचितच शहाणपणाचे नव्हते, हे कुणी कुणाला सांगावे? गांधीजींची १५०वी जयंतीदिनी बाह्य धुमधडाक्याने, हारतुरे भाषणाने नाही तर आपल्या जीवनशैलीत पर्यावरणस्नेही बदल करूनच गांधीजींचे सच्चे स्मरण होऊ शकेल. सरकार व समाज दोघांनी ‘जगात जो बदल व्हावा, असे वाटते त्याचा आपण भाग असावे’ या गांधी आचरणाचा आपणास का बरे एवढा विसर पडतो? या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर लगेचच गांधीजींना ‘स्वच्छ भारत’ची भेट देण्याचे घोषित केले. मात्र, ते स्वतः चरख्यावर सूत कातायला बसले. धूळ व कचऱ्याची सफाई तर आवश्यक आहेच, पण विकासाच्या नावाने जी निसर्गाची कचराकुंडी केली जात आहे, त्याला पायबंद घालण्याचा एकही ठोस उपाय मोदी सरकारने केलेला नाही. होय, पूर्वीच्या सरकारांनीही गांधीजींच्या नावाचा जयघोषच केला. मात्र, स्मार्ट सिटी, मेक इन इंडियाच्या नावाखाली पर्यावरणाची उघडपणे पायमल्ली करण्यास चौफेर मुभा विद्यमान सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे. मेक इन इंडियाचे इंगितच मुळी मेक पोल्युशन इन इंडिया असे आहे.
आमच्या समस्त सूज्ञ व शहाण्या लोकांना, अभिजन महाजन वर्गाला गांधीजींपासून काही प्रेरणा घ्यावीशी वाटत नाही? गंमत म्हणजे यंदा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात गांधीजींचा वारंवार उल्लेख केला. तथापि, एकही तरतूद (गांधींच्या नावाची रोजगार योजना जुन्या सरकारची सोडली तर) गांधींच्या विचार व जीवनाशी सुसंगत नाही.
गांधीजींना यंत्र तंत्राचे स्थान व मर्यादेचे पूर्ण भान होते. यंत्राद्वारे अफाट उत्पादन (मास प्रॉडक्शन) न करता लोकांद्वारे उत्पादन (प्रॉडक्शन बाय मासेस) यावर त्यांचा का भर होता? रासायनिक व औद्योगिक शेतीचे दुष्परिणाम तसेच जीवाश्म इंधनाचा शेती, औद्योगिक उत्पादन, उर्जा व वाहतुकीसाठी होणारा अनाठायी व अफाट वापर यामुळेच तर पर्यावरणीय संकट ओढवले आहे, ही बाब आता कुणीही अमान्य करू शकत नाही. तरीही अद्याप ‘विकासा’च्या विनाशकारी पद्धतीला सोडचिठ्ठी देण्यास विकास बहाद्दर तयार नाहीत. प्रचलित औद्योगिक – आधुनिक विकास पद्धती जी निसर्गाची धूळघाण करणारी आहे त्याला नक्कीच स्वस्त जलद व सुरक्षित पर्याय आहेत. त्याचा आग्रह धरावा, त्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध उभे रहावे. सत्य व अहिंसेसाठी पडेल ती किंमत देण्याचे साहस गांधी सतत करत राहिले. एक नि:शस्त्र माणूसदेखील निर्भय होऊन अन्यायाच्या विरोधात उभा राहू शकतो, याचे साक्षात उदाहरण आहे गांधी. सबब, त्यांची १५०वी जयंती हे कर्मकांड न होता नव्या भारताच्या व नव्या वैश्विक व्यवस्थेच्या उभारणीसाठी संकल्प करण्याची एक मोठी संधी आहे.
(लेखक अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)