- तुषार बोडखे
Tushar.Bodkhe@timesgroup.com
‘भीमगीताचे वातावरण चैतन्य निर्माण करते. समोरच्या गर्दीला गाण्यातून बाबासाहेब समजावून सांगणे आणि परिवर्तन घडवणे यासारखा दुसरा आनंद नाही’, गायिका पंचशिला भालेराव हिची रोखठोक भूमिका नेहमीच आश्वासक वाटते. फिल्मी गाण्यांचा तिला कधीच मोह झाला नाही. खडतर परिस्थितीवर मात करून हजारो कार्यक्रम गाजवणारी ही सामर्थ्यशाली गायिका आहे.
सध्या पंचशिला गाण्याच्या तयारीत आकंठ बुडालीय... दरवर्षी भीमजयंतीच्या काळात अशीच लगबग असते. नवीन गाणी शोधावी, चाल लावावी, स्वतःचं अन् रसिकांचं समाधान होईपर्यंत गाण्याची जोरदार तयारी करावी, असा नेहमीचा पायंडा. पंचशिलाच्या हडको परिसरातील छोटेखानी घरात वाद्यवृंदाचे कलाकार जमतात व एका अवीट मैफलीची तयारी सुरू होते. काव्यातील आशयातून काळजाला हात घालणारी भीमगीते मोजकीच. कवीवर्य वामनदादा कर्डक यांच्या प्रबोधनगीतांचा सर्वांत वरचा क्रमांक. वामनदादांची सक्षम गीत लेखन परंपरा पुढील गीतकारांनी झेपली नाही. दर्जेदार भीमगीतांची गायक-संगीतकारांना नेहमीच उणीव भासते. जुनी गाणी रसिकांना तोंडपाठ असताना नवीन गाणी देण्याचा अट्टाहास बाळगणारी पंचशिला भालेराव उमदी गायिका आहे. राज्यभरात गाजलेल्या भीमगीत गायिकात पंचशिला अग्रस्थानी आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांच्या कार्यक्रमासाठी राज्यभर तिचा दौरा असतो. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतील सर्व तारखा बुक. काही गावांत एकाच दिवशी दोन-दोन कार्यक्रम. कुटुंब, दौरा आणि संयोजन अशी तारेवरची तिहेरी कसरत करीत या गायिकेने आपले नाव रसिकांच्या मनावर बिंबवले. औरंगाबाद, मराठवाडा, महाराष्ट्र असा गायकीचा टप्पा ओलांडत आता गायनाच्या माध्यमातून देशभर पोहचण्याचा तिचा ध्यास आहे. हजारो कार्यक्रमांचे यशस्वी सादरीकरण आणि मानाच्या पुरस्काराने सन्मानित असलेल्या पंचशिलाचा प्रवास खडतर होता. आडगाव सरक (ता. औरंगाबाद) या लहानशा गावात पंचशिलाचे शालेय शिक्षण झाले. वडील नोकरी सांभाळत ‘भीमसंदेश गायन पार्टी’त गात असत. आईसुद्धा गायिका. आई-वडीलांचा गायनाचा वारसा पंचशिलाकडे आला. खेडेगावात ऐकू येईल तेच संगीत शिकता येते. शास्त्रीय संगीत वर्ग किंवा गुरूचे मार्गदर्शन हे शब्दसुद्धा कधी ऐकले नव्हते. प्रतिकूल भवताल असताना गाणे आपले करिअर असू शकते, असा विचारसुद्धा कधी मनाला शिवला नाही. कमी वयात लग्न झाले अन् कौटुंबिक जबाबदारी अंगावर आली. सासरी गाण्याला पूर्ण विरोध होता. ‘बाईमाणूस असून स्टेजवर गाणं म्हणणार का?’ असा प्रश्न विचारला गेला. पण, पतीची भक्कम साथ होती.
‘मला गाण्याची आवड होती. शहरात गेलो तर काहीतरी करू. नाहीतर, खेड्यात कोणतीच संधी मिळणार नाही असे घरात सांगितले. गाव सोडून औरंगाबादला आले. दहावी पास झाल्यामुळे गोदावरी कॉलेजात प्रवेश घेतला. संसार, गाणं आणि शिक्षण एकावेळी सुरू होते. गाण्याची संधी कशी मिळेल हा एकच विचार मनात घोळत असायचा,’ अशी आठवण पंचशिलाने सांगितली. संघर्षाच्या काळात पोलीस ग्राउंडवरील संगीत रजनीत गाण्याची संधी मिळावी, म्हणून पंचशिलाने भरपूर प्रयत्न केले. स्टेजजवळ भालेराव दाम्पत्य खूप वेळ उभे राहिले. मुंबईचे कलाकार आल्यामुळे स्थानिक गायिकेला संधी मिळत नव्हती. अखेरीस कशीबशी संधी मिळाली; मात्र, चांगले कलाकार असूनही आपल्याला ताटकळत ठेवल्याचा अपमान पंचशिलाच्या जिव्हारी लागला. अनेक अपमानास्पद प्रसंगांनी परीक्षा पाहिली, पण जिद्द कमी झाली नाही. पुढील चार वर्षात ही मधाळ आवाजाची गायिका परिसरात सर्वपरिचित झाली. स्टेजजवळ ताटकळत ठेवलेल्या ‘त्याच’ संयोजकांनी पंचशिलाला आग्रहपूर्वक बोलावून गाण्याचा कार्यक्रम केला. चार-पाच वर्षे मानधनाशिवाय कार्यक्रम करून ओळख निर्माण केली. त्यानंतरच्या दोन दशकांच्या प्रवासात भीमगीतांचे हजारो कार्यक्रम गाजवले. खडा आवाज आणि लोकगायकीच्या वैशिष्ट्यपूर्ण जागा हे पंचशिलाच्या गाण्याचे वेगळेपण रसिकांना भावते. कविवर्य वामनदादांची गाणी घराघरात पोहचवण्यात तिचे मोठे योगदान आहे. ‘चला चला गं चला सयांनो, जाऊ आज पहाटी, नाग नदीच्या काठी’ या गीताने अवघे वातावरण भारावते. ‘मै भीमराज की बेटी’ असे ठणकावून सांगत ती जमलेल्या गर्दीत चैतन्य निर्माण करते. दलित समाजाच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर काम केले. बाबासाहेबांचे विचारधन सांगत समाजाला प्रबुद्ध करण्याचा प्रयत्न करते असे ती अभिमानाने सांगते. या लोकप्रिय गायिकेने कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. बी. कॉम पदवीधर असलेली मुलगी पुण्यात नोकरी करते. पदवीधर मुलगा स्वतःच्या वाद्यवृंदात काम करतो. तर लहान मुलाचे कॉलेजात शिक्षण सुरू आहे.
‘भीमगीत गायिका असले तरी सर्व प्रकारची गाणी गाते. भावगीत, भक्तीगीत, लावणी या प्रकारांसाठी तेवढीच दाद मिळाली. शहरात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन गायक घडतात. मला तेवढे शिक्षण घेता आले नाही. पण, माझे गाणेसुद्धा मागे पडले नाही. रिअॅलिटी शो फक्त शहरातील गायकांसाठी मर्यादित आहेत. लोकगायकांना कधी तरी संधी मिळाली पाहिजे. अशी उपेक्षा वाट्याला आल्यानंतर कधी-कधी गाणं सोडून द्यावंसं वाटतं’ अशी खंत पंचशिलाने मांडली. पण, अशी खंत फार काळ टिकत नाही. कारण तिची ऊर्जा वेगळी आहे. तिला साद घालत असते ती हजारो आंबेडकरी अनुयायांची गर्दी अन् नसानसात संचारणारे भीमचैतन्य !