केदार वाघ Kedar.Wagh@timesgroup.com
संयुक्त राष्ट्रांबरोबर आठ वर्षे आरोग्य क्षेत्रात काम केल्यानंतर प्रशांत किशोर आज देशातील आघाडीचे राजकीय धोरणतज्ज्ञ बनले आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यांची सेवा घेतली आहे. किशोर यांचा हा प्रवास भारतीय राजकारणाची कूस बदलणाराही ठरला आहे.
आफ्रिकेतील चाडसारख्या अतिमागास देशात सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणे आणि राजकारण यांच्यात काय परस्परसंबंध असू शकतो? आता या प्रश्नाचे उत्तर प्रशांत किशोर असे आहे, असे सांगितले, तर….
संयुक्त राष्ट्रांबरोबर आठ वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर ते क्षेत्र अगदी इतिहासजमा करून प्रशांत किशोर आज देशातील आघाडीचे राजकीय धोरणतज्ज्ञ (पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट) बनले आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यांची सेवा घेतली आहे. अजूनही घेत आहेत. किशोर यांचा हा प्रवास रंजक आहेच; शिवाय तो भारतीय राजकारणाची कूस बदलणाराही ठरला आहे.
किशोर यांचा जन्म बिहारमधील आहे. ते व्यवसायाने सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. प्रशांत किशोर यांनी २००७च्या सुमारासच राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधून आरोग्य क्षेत्रात धोरणनिश्चितीत सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्या वेळी राहुल यांनी त्यांना फक्त अमेठीत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यापुरतेच मर्यादित काम करण्याची ऑफर दिली. ती किशोर यांनी धुडकावली.
काँग्रेसने केलेली चूक गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी केली नाही. त्यांनी प्रशांत किशोर यांच्यातील क्षमतांचा अंदाज खूप लवकर घेतला आणि त्यांना सामाजिक धोरणे आखण्यात सल्लागार म्हणून काम करण्याची संधी दिली. किशोर यांनी अमेरिकेतील ओबामांची पहिली निवडणूक पाहिली होती. ओबामांनी ज्या पद्धतीने प्रचारात वैचारिक मांडणी केली, ती पाहून किशोर प्रभावित झाले होते. निवडणुकीतील मांडणी अशाच प्रकारे केली पाहिजे, असे त्यांचे मत बनले. या तत्त्वाच्या आधारेच २०१२च्या निवडणुकीत मोदींच्या संपूर्ण निवडणुकीच्या धोरणांची आखणी किशोर यांनी केली होती. त्या निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. साहजिकच किशोर यांचे राजकीय वजन वाढले.
स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहणाऱ्या मोदींनी किशोर यांचा वापर अधिक व्यापक प्रमाणात करून घेतला. मोदींच्या सर्व प्रचार मोहिमेची जबाबदारी प्रशांत किशोर यांनी सांभाळली. या निवडणुकीत किशोर यांनी चाय पे चर्चा, थ्री डी मेळावे, रन फॉर युनिटी असे वैशिष्ट्यपूर्ण पण प्रतिमानिर्मितीसाठी आवश्यक असे उपक्रम राबविले. 'चाय पे चर्चा'चे यश हा आता इतिहास आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांचा प्रचारासाठी वापर करून घेणे हीही किशोर यांचीच कल्पना. या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करून किशोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदींच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन केले. सन २०१३ मध्ये किशोर यांनी 'सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स' (कॅग) या कंपनीची स्थापना केली. तिच्या माध्यमातून किशोर आणि त्यांचे सहकारी मोदींच्या निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन करीत होते. ही कंपनी प्रामुख्याने समाजमाध्यमांतील प्रचारावर भर देत होती. सन २०१४च्या निवडणुकीतील यशानंतर प्रशांत किशोर यांना धोरणतज्ज्ञ म्हणून देशपातळीवर मान्यता मिळाली. मोदींचे भव्य-दिव्य यश पाहून त्यांच्याकडे इतर पक्षांनीही मोर्चा वळवला.
सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी आणि प्रशांत किशोर यांनी फारकत घेतली. किशोर यांनी २०१५ मध्ये 'कॅग' विसर्जित करून त्याऐवजी इंडियन पोलिटिकल अॅक्शन कमिटी (आयपॅक) ही खास धोरण सल्लागार कंपनी स्थापन केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी किशोर यांना सल्लागार म्हणून नेमले. बिहारमध्ये संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी एकत्र यावे, ही कल्पना किशोर यांचीच! ती त्यांनी नितीश यांच्या गळी उतरवली. पण कल्पना चांगली असून चालत नाही, ती राजकीयदृष्ट्या व्यवहार्यही असावी लागते, हे काळाच्या ओघात सिद्ध झाले. आता तर प्रशांत किशोर संयुक्त जनता दलाचे पदाधिकारी आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी किशोर यांना सल्लागार म्हणून नेमले आहे. त्यावरून नितीश आणि किशोर यांच्यात बेबनाव निर्माण झाला आहे.
काँग्रेसने फार उशिरा किशोर यांची सेवा घेतली. उत्तर प्रदेशच्या आणि पंजाबच्या निवडणुकीत काँग्रेसने किशोर यांचा सल्ला घेतला, पण तिथे किशोर यांचा प्रभाव फारसा पडला नाही. पक्ष कोणताही असो, धोरण सल्लागार म्हणून काम करताना पक्षप्रमुखाशी थेट संपर्क हे किशोर यांच्य कार्यशैलीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. स्तंभलेखक प्लबन गुप्ता यांच्या मते, एखादी लाट असल्याखेरीज किशोर यशस्वी होत नाहीत. त्यामुळे २०१४ असो किंवा बिहारची निवडणूक असो किंवा नुकत्याच झालेल्या आंध्रच्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला सल्ला देण्याची वेळ असो; प्रत्येक वेळी प्रस्थापित लाटेवर ते स्वार झाले. उत्तर प्रदेशात ते प्रभावहीन ठरले. पंजाबमध्ये विजयाचे श्रेय अमरिंदरसिंग यांना जाते, असे मत गुप्ता यांनी 'फर्स्ट पोस्ट' या वेबसाइटवरील एका लेखात मांडले आहे.
गुप्ता यांचे मत खरे मानले, तरीही किशोर यांनी भारतीय राजकारणाला एक नवा पैलू प्राप्त करून दिला, हे नाकारता येणार नाही. निवडणूकपूर्व पाहणी करणाऱ्या, निकालांचे विश्लेषण करणाऱ्या किंवा अगदी बलस्थाने-कच्चे दुवे यांची पाहणी करणाऱ्याही कंपन्या भारतात आहेत. मात्र, एखाद्या पक्षाचे धोरण ठरविण्याचे कंत्राट घेणारी कंपनी घेण्याचे दुसरे उदाहरण दुर्मीळच. आता किशोर एका नव्या खेळीसाठी सज्ज झाले आहेत. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते तृणमूल काँग्रेसबरोबर काम करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता किशोर यांच्यासमोरील आव्हान नक्कीच अवघड असेल. राज्यात निवडणुकीनंतर उसळलेला राजकीय हिंसाचार भाजपच्या पथ्यावर पडणारा आहे, असे मानले जात आहे. या सगळ्या आव्हानांना किशोर कसे तोंड देतात आणि तृणमूलसाठी ते आपल्या पोतडीतून कोणती अभिनव कल्पना बाहेर काढणार, याची उत्सुकता असेल.