रोहतकची कुस्तीगीर साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकाच्या रूपाने भारताच्या पदकतक्त्याचा श्रीगणेशा केला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या पदकामागे तिची बारा वर्षांची तपश्चर्या आहे. तिची ही तपश्चर्या पदकामध्ये परिवर्तित करण्यात मोठा वाटा पहिले प्रशिक्षक ईश्वर दहिया यांचा आहे. रोहतक येथील सर छोटूराम स्टेडियम कुस्ती अॅकॅडमीत ६० वर्षांचे दाहियांनी अनेक महिला कुस्तीगीर घडवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला. साक्षीच्या यशानंतर त्यांनी आपला प्रवास ‘मटा’ सोबत उलगडला.
गोपाळ गुरव
Gopal.Gurav@timesgroup.com
ईश्वर दहिया यांनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल घडविले आहेत. पण, साक्षीच्या यशामुळे त्यांना आता जगभर ओळखले जात आहे. आपल्या अॅकॅडमीच्या मुलींच्या यशात आपले यश मानणारे दाहिया यांना यशाचा चढता आलेख पाहण्यासाठी मेहनत तर घ्यावी लागलीच, शिवाय गावकऱ्यांशी मोठा संघर्षही करावा लागला आहे. मात्र, तेच गावकरी आता त्यांना मान देतात; तेव्हा त्यांची छाती अभिमानाने फुलून येते.
२००२ पासून सुरुवात
मुलांप्रमाणे मुलींनाही कुस्ती शिकता यावी, अशी माझी इच्छा होती. पण, रोहतकसारख्या गावात हा विचार प्रत्यक्षात आणणे सोपे नव्हते. मुले आणि मुलींना एकत्र सराव करू देण्याचा विचार मी बोलून दाखविला. तेव्हा गावातील लोकांना त्याला कडाडून विरोध केला. मुळात मुलींनी कुस्तीसारखा अवघड खेळ का शिकावा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यांनी लग्न करावे आणि नवऱ्यासोबत राहावे. कुस्ती शिकून मुली काय करणार, असे बोलून लोकांनी माझी खिल्ली उडवली. मात्र, मी डगमगलो नाही. २००२मध्ये सुनीता तिच्या भावासह माझ्या अॅकॅडमीत आली. चौदा-पंधरा वर्षाच्या सुनीताला ओळखण्यात माझ्याकडून गल्लत झाली. ती मुलांसारखीच दिसत होती. मी तिला मुलांसोबत खेळण्याची परवानगी दिली. संध्याकाळी ती मैत्रीण कवितासह आली. तेव्हा मला कळले की ती मुलगी आहे. मुलींनी या अॅकॅडमीत मुलांसोबत कुस्ती खेळावी, याचा श्रीगणेशा झाला होता. लोकांनी विरोध केला. पण, मीही कुस्तीगीर असल्याने माझ्या वाटेला कोणी गेले नाही.
आंतरराष्ट्रीय नकाशावर रोहतक
२००२च्या अखेरिस माझ्या अॅकॅडमीत सुमन कंडू दाखल झाली. (पुढे याच मुलीने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले.) मुलींची संख्या चार झाली होती. त्यांच्या वजनी गटाच्या मुली माझ्या अॅकॅडमीत नव्हत्या. मग त्यांचा सराव कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी मी त्यांना मुलांसोबत सराव करण्यास सांगितले. याचा त्यांना फायदा झाला आणि माझी या मागील भूमिकाही त्यांच्या लक्षात आली. या मुलींनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यास सुरुवात केली आणि रोहतकचे नाव जगाच्या नकाशावर आले.
दहा वर्षांची साक्षी
साक्षी दहा वर्षांची असताना माझ्याकडे आली. तिचे आजोबाही पैलवान होते. त्यामुळेच तिलाही कुस्तीची आवड निर्माण झाल्याचे तिच्या आई सुदेश मलिक यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांचाही मुलीच्या कुस्तीसाठी विरोध होता. कारण, त्यांनाही समाजात राहायचे होते. मुलीने कुस्ती शिकावी याला नातेवाइकांचाही विरोध होता. तिच्याशी लग्न कोण करील, हाच प्रश्न सुदेश यांना सतावत होता. मात्र, वडिलांनी साक्षीला पाठिंबा दिला. त्यामुळे दहा वर्षांची साक्षी माझ्या अॅकॅडमीची सदस्य झाली. तोपर्यंत माझ्याकडे मॅटही आली होती. साक्षी सुरुवातीला थोडी नर्व्हस होती. पण, सरावाला सुरुवात झाली की ती सारे काही विसरून जायची.
पाच ते सहा तास सराव
खेळ कुठलाही असो. त्यात सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी हवी असते, ती जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी... मुलगा असो की मुलगी...माझ्या अॅकॅडमीत माझ्यासाठी सारे सारखेच होते. त्यामुळे मुलींनाही रोज पाच ते सहा तास सराव करावा लागत होता. याची कल्पना मी साक्षीच्या आईलाह दिली होती. तिच्या आहाराकडे लक्ष ठेवण्यासही सांगितले. सराव आणि पोषक आहाराशिवाय कुस्तीगीर घडूच शकत नाही. २००६-०७मध्ये तिला सब-ज्युनिअर एशियन स्पर्धेत पदक मिळाले. त्या वेळी भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे मी तिला वरिष्ठ गटाच्या शिबिरात दाखल करून घेण्याची विनंती केली. सुरुवातीला ही विनंती फेटाळली. कारण साक्षी खूप लहान होती. गीता फोगट आणि इतर मुलांना सरावासाठी मुलीची गरज पडेल म्हणून तिला शिबिरात सामावून घेण्यात आले. हा अनुभव तिला मोलाचा ठरला.
मानसिकता बदलली
साक्षीने २०१०च्या ज्युनिअर वर्ल्ड चँपियनशिपमध्ये ब्राँझपदक मिळवले. त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुमन कुंडूने ब्राँझपदक मिळवले. मुलींच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले होते. अनेक वर्षांची त्यांची तपश्चर्या फळाला येत होती. पण, अजून त्यांना मोठा पल्ला गाठायचा होता. या मुळे गावातील लोकांची मानसिकता बदलली. कुस्तीगीर मुलींना रेल्वे आणि इतर ठिकाणी नोकरी लागू लागली. आपली मुलगी देशासाठी खेळत आहे, याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. आता पालक स्वत:हून मुलींना माझ्या अॅकॅडमीत घेऊन येतात. पालकांच्या विचारात खूपच फरक पडला असून, पदक जिंकल्यानंतर मिळणारी प्रसिद्धी, सन्मान आदी गोष्टींमुळे आपल्याही मुलींनी आखाडा गाजवावा, असे त्यांना वाटत आहे... ईश्वर दाहिया सांगत होते.
तंत्रज्ञानात अजून पिछाडीवरच..
आमची अॅकॅडमी तशी अगदीच भव्यदिव्य नाही. मुलांप्रमाणे मुलींनाही कुस्ती खेळता यावी, हा माझा उद्देश होता. तंत्रज्ञानात आम्ही थोडे मागेच आहोत. त्यामुळेच मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळाल्यानंतर मी त्यांना माझ्या बंधनात बांधून ठेवत नाही. त्यांनी मोठी झेप घ्यावी, हीच माझी इच्छा असते. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती गाजवल्यानंतरही या मुली अजूनही माझ्या संपर्कात आहेत. वेगवेगळ्या डावपेचांबाबत चर्चा करतात. आपल्या चुका बोलून दाखवितात. या गोष्टी मला पुरस्कारांपेक्षाही मोठ्या वाटतात.
दहा नवीन मुली
साक्षीने रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळवल्यानंतर काही दिवसांतच माझ्या अॅकॅडमीत नवीन दहा मुली दाखल झाल्या. ‘आम्हालाही साक्षीसारखे बनायचे आहे,’ हा आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यात दिसत होता. साक्षी रिओसाठी पात्र ठरली, तेव्हाही माझ्या संपर्कात होती. तिच्या लढती सुरू होत्या; तेव्हाही तिचे आताचे प्रशिक्षक कुलदीपसिंग यांच्यांशी माझा संवाद सुरू होता. दुहेरी पट हा तिचा आवडता डाव. या डावानेच तिला यश मिळवून दिले.