पुन्हा एकदा तवांग
आर. आर. पळसोकर
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे दोन मे रोजी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यांपैकी एक बुद्ध भिक्खू होता. या प्रकारामुळे तवांग गावावर प्रकाशझोत पडला. लामा लोबसांग ग्यात्सो या आपल्या नेत्याला अटकेतून सोडविण्यासाठी आंदोलक पोलिस ठाण्यासमोर निदर्शन करीत होते. तवांग हे सामरिकदृष्ट्या अतिमहत्त्वाचे गाव आहे. अरुणाचल प्रदेशच्या वायव्य टोकाला असलेल्या त्याच नावाच्या जिल्ह्याचे ते प्रमुख गाव आहे. तवांग दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे तेथील गोंपा (बुद्ध भिक्खूंचे प्रार्थनास्थळ आणि विहार). बौद्ध धर्मात ल्हासाच्या गोंपानंतर सर्वांत महत्त्वाचा गोंपा तवांगमध्ये आहे आणि तेथील मुख्य लामा किंवा धर्मगुरूंचे महत्त्व (रिनपोशे म्हणजे विद्वान) दलाई लामांनंतर मानले जाते.
तवांग गोंपाच्या रिनपोशेंचा अनादर केल्याचा आरोप लोबसांग ग्यात्सो यांच्यावर आहे. तवांगमधील जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधातही ते चळवळ करत होते. तवांगचे दुसरे महत्त्व म्हणजे १९५९ साली दलाई लामा चीनच्या आक्रमणाचा विरोध करत या मार्गाने भारतात आश्रयासाठी आले. त्यानंतर १९६२च्या भारत-चीन युद्धात चीनने याच प्रदेशात मुख्य हल्ला केला होता. त्या वेळी भारतीय लष्कर सज्ज नव्हते आणि प्रशासन गाफील होते. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून लष्कराने येथील सीमेच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात लष्करी ठाणी बांधली आहेत. अत्यंत दुर्गम, अतिउंच पहाडात आपले सैनिक तिथे पहारा देत असतात; तसेच त्यांना अगदी कमी असलेल्या लोकसंख्येचीही काळजी घ्यावी लागते. तवांग जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे पन्नास हजार आहे. अशा विरळ संख्येच्या प्रदेशात हिंसक राजकारणाने डोके उचलावे ही चिंताजनक बाब आहे.
तवांग जिल्ह्यात विकास अभावाने दिसतो. मर्यादित दळणवळण, आदिवासी लोकसंख्या, सामरिक अतिमहत्त्व आणि असंवेदनशील शासकीय व्यवस्था आदींचे स्फोटक मिश्रण तिथे आहे. अशा वातावरणात तवांगचा गोंपा आणि त्याचे रिनपोशे यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. जनतेचा त्यांच्यावर आणि गोंपाचे कार्यक्रम, धार्मिक सण आदींवर अतिशय विश्वास आणि श्रद्धा आहे. एक वैयक्तिक अनुभव बोलका आहे. १९९३च्या सुरुवातीला मी लष्करात असताना तेजपूरहून तवांगला चाललो होतो. बोमदी ला (ला म्हणजे खिंड) पार केल्यानंतर पुढे दरड कोसळून रस्ता बंद होता. बॉर्डर रोडचे जवान रस्ता उघडण्याच्या कामाला लागले होते. रस्त्यावर ताटकळत बसण्यापेक्षा मी जवळच्या लष्करी कॅम्पमध्ये गेलो. तिथे तवांग गोंपाचे मुख्य लामाही त्याच कारणासाठी प्रतीक्षा करत होते. वयाने ते तरुण होते. ओळख करून दिल्यानंतर मी त्यांना म्हणालो, ‘रिनपोशे, मी तुमच्या गोंपात १९६४ मध्ये गेलो होतो आणि तेव्हाच्या मुख्य लामांना भेटलो होतो,’ आणि थट्टेने पुढे म्हटले, ‘कदाचित तेव्हा तुमचा जन्मही झाला नसेल!’ त्यांनी मला निरखून पाहिले आणि म्हटले, ‘मला आठवते. मी तुम्हाला माझ्या मागच्या जन्मात भेटलो होतो.’ अशा श्रद्धा आणि आत्मविश्वासापुढे माझ्यासारखा कोणासमोर मान खाली न करणारा सैनिकही ओशाळला. सांगण्याचे कारण म्हणजे आपल्या अशा अविकसित, सीमावर्ती प्रदेशात अनेक गोष्टींचे प्रभाव पडलेले असतात. त्यांच्याकडे कानाडोळा करणे योग्य नाही. अरुणाचल प्रदेशच्या सीमांवर बुद्ध धर्माची आणि गोंपा संस्कृतीची घट्ट पकड आहे आणि त्याच्यात राजकारण आले किंवा आणले गेले, तर ते जनतेच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या सामरिक संरक्षणासाठी हानीकारक ठरेल.
अरुणाचलमध्ये १९६२च्या युद्धानंतर आवश्यकतेनुसार दळणवळणाचा विकास केला गेला; पण गेल्या काही वर्षांत चीनने आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे या क्षेत्रात अधिक लष्कर तैनात करण्याची गरज झाली आहे. १९६२मध्ये चीनच्या सैन्याने आक्रमणासाठी दोन मुख्य आणि वेगळ्या दिशा वापरल्या होत्या. कामेंग क्षेत्रात तवांग, सेला, बोमदी ला आणि पुढे पर्वतरांगेच्या मैदानी भागापर्यंत. पूर्वेकडे वालाँग प्रदेशात लोहीत नदीच्या खोऱ्यामार्गे किबीथू ते वालाँगपर्यंत. आज पूर्ण अरुणाचल प्रदेशात दळणवळण वाढवण्यासाठी सरकारने आणि बॉर्डर रोड संघटनेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. दुर्गम भागात सैनिकी संख्या वाढवण्यात आली आहे. या सर्व हालचालींमुळे तवांगच्या सैनिकी क्षेत्राचे सामरिक महत्त्व वाढले आहे; कारण चीनने १९६२मध्ये वापरला होता तोच मार्ग आजही आक्रमणासाठी आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित क्षेत्रात अस्थिरता, विरोधक भूमिका, हिंसाचार आदी बाबी देशाच्या संरक्षणाला घातक ठरु शकतात. इथे राजकारणाने शिरकाव करावा ही खेदाची गोष्ट आहे.
तवांगमध्ये झालेल्या घटनांचे सर्वांगीण विश्लेषण होणे आवश्यक आहे. आज अरुणाचल प्रदेशच्या तवांग आणि त्याच्या दक्षिणेशी असलेल्या कामेंग जिल्ह्यात दोन विभिन्न गरजा आहेत. सामरिक कारणांसाठी दळणवळण आणि विकास यांची झपाट्याने प्रगती करणे; पण त्याचबरोबर स्थानिक लोकांची पारंपारिक जीवनशैली सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वीच्या हिंसाचारात या मूलभूत कारणांत विसंगती झालेली दिसते. लोबसांग ग्यात्सो यांनी ‘मॉन प्रदेश वाचवा’ ही संघटना स्थापन केली आहे. जलविद्युत प्रकल्पाने पर्यावरणाचे संतुलन बिघडेल, असे त्यांचे म्हणणे आहे. अरुणाचल प्रदेशात अति-उंच पर्वतांचे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याच्यामुळे वेगाने वाहणारे मुबलक पाणी याशिवाय आणखी काहीच संपत्ती नाही. पर्यटनाची वाढ होत आहे; पण त्याला गती नाही. कोणताही प्रकल्प हाती घेताना स्थानिक भावनांना संभाळणे आवश्यक आहे. हे करायला बुद्ध धर्मगुरू आणि गोंपा यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. लोबसांग ग्यात्सोही लामा आहेत; परंतु त्यांनी तवांग गोंपाच्या रिनपोशेंच्या विरुद्ध भूमिका घेतलेली दिसते. असे तंटे पारंपारिक पद्धतीने मिटविल्यास विकास कार्यांना सहकार्य मिळेल. वेगळा प्रदेश, वेगळी जीवनशैली, वेगळे रीतीरिवाज, सर्वांना मान देउन त्यांचा समावेश करून घेणे आपले कर्तव्य आहे.
(लेखक निवृत्त ब्रिगेडिअर आहेत.)