डॉ. मीना वैशंपायन
...
स्त्रियांच्या आत्मचरित्रांनी आजवर मराठी वाङ्मय खूप समृद्ध केले आहे. स्त्रीजीवनाचे अनेक पैलू, वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष, आणि मिळवलेलं यश त्यांच्या आत्मचरित्रांमधून आपल्यापुढे येतं. पण प्रत्येक माणसाचा पिंड जसा वेगळा, तसा त्याचा जीवनमार्गही निराळाच असतो, आणि त्याची जीवनाला भिडण्याची वृत्तीही वेगळी असते. त्यामुळेच आपल्याला आत्मचरत्रं नेहमीच वेगळं काहीतरी देतात. 'माझी गोष्ट' सांगणाऱ्या डॉ. लीला गोखले(रानडे)यांच्या जीवनसंघर्षाची, जीवनातील यशःप्राप्तीची गोष्टही अशी वेगळीच आहे.
लक्षणीय बाब म्हणजे हे आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखिकेने- लीलाआजींनी आज आपल्या वयाची शंभरी ओलांडली आहे, तरी वयाच्या या टप्प्यावर आल्यावरही त्यांचा मानसिक उत्साह आणि कुतूहल कायम आहे असं दिसतं. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात १८७०-७५पासून पुण्यात मोठे नाव व प्रतिष्ठा मिळवलेल्या व्ही. आर. रानडे अँन्ड सन्स (रानडे कॉन्ट्रॅक्टर) यांच्या सधन आणि खूप मोठ्या, एकत्र कुटुंबात, १९१७मध्ये लीलाआजींचा जन्म झाला. त्या काळातील सणवार, धार्मिक विधी, वेगवेगळ्या प्रसंगीचे रीती-रिवाज या साऱ्यांशी त्यांचा परिचय होत गेला. आपल्या तीव्र स्मरणशक्तीने व सूक्ष्म निरीक्षणाने ते सारं त्यांच्या मनावर ठसलं आणि ते लीलाआजींनी पहिल्याच प्रकरणात तपशीलवार सांगितलं आहे. हा भाग सामाजिक इतिहासाचा मोठाच दस्तावेज आहे. आपल्या दीर्घायुष्यातील असंख्य घटना सांगतानाही, एका शतकाच्या साक्षीदार असणाऱ्या लेखिकेचं निवेदन गतिमान, वाचनीय, आकर्षक झालं आहे.
कोकणातील सहाळशेत नावाच्या खेड्यात राहणारं रानडे यांचं कुटुंब इतर अनेकांप्रमाणे पोट भरण्यासाठी पुण्यात आलं. पेशव्यांच्या मामांकडून किवळे येथे मिळालेल्या इनाम जमिनीवर घर बांधून राहायला लागलेले रानडे आधी किवळेकर व नंतर पुणेकर झाले. पुण्यात त्यांनी आपलं चांगलं बस्तान बसवलं, तिथेच त्यांचा उत्कर्ष झाला. पुण्यात भाऊमहाराजाचा बोळ व शेलूकराचा बोळ या ठिकाणी, कधी जुना वाडा घेऊन बांधकाम करत, कधी नवी जागा घेत, त्यांचे वाडे उभे राहिले.
या अशा मोठ्या वाड्यात आणि अक्षरशः शंभर माणसांच्या कुटुंबात जन्मलेल्या लेखिकेला लहानपणी घरातील नाती-गोती लक्षात ठेवणंही कठीण वाटे, कारण इतक्या मोठ्या घरात सख्खे-चुलत, आते-मामे भावंडं, वडील माणसं, बायका-पुरुष नोकर-चाकर, यांची एकच गर्दी असे. रानडे महाराष्ट्राबाहेरची मोठी बांधकामंही करत, त्यामुळे घरातील काहीजण बाहेरगावी असत. लीलाआजीही वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत त्रिचनापल्ली येथे आई-वडिलांजवळ होत्या, आणि मग शिक्षणासाठी पुण्याला आल्या. त्यामुळे आपल्याला सख्खी भावंडं किती याचाही पत्ता त्यांना खूप उशिरा लागला. त्या काळी दूरचे, आश्रयाला आलेले इतर नातेवाईक स्त्री-पुरुष घरात असत. त्यापैकी काहींची शब्दचित्रं लेखिकेने नेमकेपणाने रेखाटली आहेत. वाड्याच्या एकूण अवाढव्य पसाऱ्याचं आणि कारभाराचं सत्यचित्रण वाचताना आज एखाद्या ऐतिहासिक मालिकेचं दृश्य डोळ्यांपुढे सहज उभं राहतं.
लहान वयातील खेळ, कृष्णाबाईंसारखीने सांगितलेल्या कथा, पाठ केलेली, आपोआप पाठ झालेली गाणी, कविता यांच्या आठवणी त्या सांगतात. पुण्यात आधी सेवासदन, व मग हुजूरपागा या शाळांमध्ये शिक्षण घेताना आपल्या झालेल्या गमती-जमती, स्नेहसंमेलनांमध्ये भाग घेतल्यावर आलेले अनुभव, शिक्षकांच्या आठवणी, प्रत्येक छोट्या कामासाठीही मनापासून केलेली मेहनत या साऱ्यांचे चित्रण त्या अगदी मनापासून करतात. तेव्हापासूनच अंगावर पडलेली वा आपण घेतलेली जबाबदारी कसोशीने व उत्तमरीत्या पार पाडण्याची सवय त्यांना लागली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली. याच काळात घरातील स्वयंपाकीणबाई भाजताना पाहून, व त्यांना डॉक्टर बरं करतात हा प्रसंग पाहून लीलाआजींनी आपण डॉक्टरच व्हायचं असा निश्चय केला आणि अनेक अडचणी आल्या तरी तो पुरा केला. शाळेत जाताना अकराव्या वर्षीच नऊवारी नेसून जात असल्या तरी त्याच वेशात त्या टेनिस, बॅडमिंटनही खेळत हे वाचून गंमत वाटते.
एकूणच त्या काळी साधेपणाने राहत, बौद्धिक मेहनत घेत शिक्षणालाच महत्त्व देणारी कुटुंबं व तरुण पिढी यांचं वास्तव चित्र उभं राहतं. मॅट्रिकनंतर इंटर पास होऊन मेडिकलसाठी मुंबई गाठावी लागली. तिथे राहण्याची अडचण, दमट हवा, हॉस्टेलवर राहिलं की खाण्यापिण्याचे हाल, धावपळ या सगळ्या गोष्टींना तोंड देत लीलाआजी डॉक्टर झाल्या. त्यात आजारपणं, बरगडीला टी.बी. सारख्या रोगाची झालेली लागण, नंतर त्यासाठी ऑपरेशन अशा अनेक संकटांनी सोबत केलीच होती.
मेडिकलच्या अभ्यासाच्या युक्त्या, या अभ्यासक्रमासाठी लागणारी चिकाटी, प्रचंड मेहनत आणि न थकता 'पेशंटली' पेशंटस् हाताळण्याची तयारी हे सारं यात सविस्तरपणे सांगितलं आहे. अनेक गोष्टींचं वर्णन करताकरता लीलाआजी मेडिकलच्या कॉलेजांमधील तत्कालीन वातावरण, तिथलं अंतर्गत राजकारण, विद्यार्थ्यांची आपापसातली चढाओढ याचं दर्शन घडवतातच, पण विद्यार्थी व शिक्षक, मेडिकल कॉलेजातील अभ्यास, ड्युटीचे तास, तेथे लागणारी सततची उपस्थिती, सावधपणा, कामातील एकाग्रता अशा अनेक गोष्टींचं त्या चित्रण करत जातात. अनेक वेळा नामांकित डॉक्टर्स, त्यांची स्वतःच्या विषयातील तज्ज्ञता, रोगनिदान करताना केलेला विचार यांचंही विवेचन अगदी सुलभ भाषेत करतात. वैद्यकीय विश्वातील कितीतरी बारीक-सारीक पण महत्त्वाच्या गोष्टींचा येथे ऊहापोह होतो.
एम्.बी.बी.एस्.ची पदवी, मग घेतलेली कामा हॉस्पिटलमधील पोस्ट, तेथील अनुभव, एम.डी. करताना उद्भवलेले आणीबाणीचे प्रसंग हे सारं खरोखरी मुळातूनच वाचायला हवं. या वेळेपर्यंत बा. ल. ऊर्फ बंडू गोखले, या कम्युनिस्ट विचारसरणीच्या, सायन्स पदवीधर असणाऱ्या, उत्तम शास्त्रीय संगीत, वाद्यवादन, वाचन अशा आवडी असणाऱ्याशी ओळख झाली होती. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हाच या दोघांनी विवाहबंधन स्वीकारलं आणि पुढे पन्नास वर्षं उत्तमप्रकारे निभावलं.
आज शंभरी ओलांडलेल्या या आजीबाईंनी नवनव्या गोष्टी शिकण्याचा नेहमीच आनंद लुटला. वयाच्या ८२व्या वर्षी मराठीची प्राज्ञ परीक्षा दिली. ९०व्या वर्षापर्यंत आपली मोटार आपणच चालवली. कोणत्याही अडचणींचा गाजावाजा न करता अत्यंत धीराने त्यांना तोंड दिलं. साथीदाराचा मृत्यू जितक्या खंबीरपणे स्वीकारला, तसाच खंबीरपणा डॉक्टरीचा व्यवसाय करताना दाखवला. आपल्या पेशाशी अत्यंत प्रामाणिक राहत, शास्त्राची कास कधीच न सोडता, त्यांनी डॉक्टरी हा व्यवसाय न मानता रुग्णसेवा हा आपला धर्म मानला, त्या अर्थी त्या अतिशय धार्मिक आहेत.
एकूण निवेदनात प्रसंगानुसार त्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्यं त्या सांगतात खरं, पण या साऱ्यात काहीसा तटस्थपणा जाणवतो. गोखले यांच्याबरोबर लग्न ठरवताना ते विवाहित होते आणि त्यांचं पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेत लीलाताईंशी लग्न केलं. त्या काळात दोघांनी घेतलेल्या या निर्णयाचे घरी काय पडसाद उमटले किंवा त्यांच्या स्वतःच्या भावना त्यावेळी कशा होत्या, मुलांच्या जन्मानंतरचा आनंद व इतरही भावनांना येथे फारशी जागा मिळत नाही. डॉक्टरी पेशामुळे असेल कदाचित, काहीशी निर्मम वृत्ती जाणवते. त्याबरोबर कित्येक पेशंटस् बरोबर संबंध आल्यावरही मानवी स्वभाव, नात्यातील गुंतागुंत असं चित्रण येत नाही. मोठ्या कुटुंबात असणारे हेवेदावे, आकस, मानवी स्वभावधर्म यासारख्या गोष्टींचंही दर्शन घडत नाही.
वर म्हटल्याप्रमाणे काही बाबी खटकल्या, तरी तत्कालीन समाजजीवनातील एका उच्चवर्णीय गटाची जीवनशैली, त्यांचे आधुनिक विचार यांची व वेगळ्या कार्यक्षेत्राची ओळख यातून होते.
...
माझी गोष्ट
लेखिका : डॉ. लीला गोखले(रानडे)
मुखपृष्ठ : निकिता ओक
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह, मुंबई
पृष्ठं : २४४
किंमत : ३५० रु.