अविनाश धर्माधिकारी
'अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी' हा बृहत् ग्रंथ लिहून सारंग दर्शने यांनी मराठीतील राजकीय चरित्र वाङ्मयामध्ये मोलाची भर घातली आहे. या ग्रंथासाठी त्यांनी घेतलेले शिस्तशीर कष्ट पानोपानी दिसून येतात. एकदा हातात घेतलं की खाली ठेवावासा वाटणार नाही, इतका हा ग्रंथ छान जमून आला आहे. पत्रकारितेचा धर्म पाळून व्रतस्थ आणि तटस्थ पत्रकारिता करणारे जे मूठभर पत्रकार भारतात-महाराष्ट्रात निघतील त्यांच्यात सारंग यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांनी त्यांचं कौशल्य पणाला लावून अटलजींची ही चरित-कहाणी मांडली आहे. अर्पणपत्रिकेत डॉ. वि. वि. पेंडसे, श्री. ग. माजगावकर, स. ह. देशपांडे, दि. वि. गोखले आणि मधुकरराव देवल या गुरुजनांचा आदरपूर्वक उल्लेख करून हा ग्रंथ त्यांना समर्पित केला आहे. हे मूळचे संघ स्वयंसेवक. 'हिंदुत्व' विचारधारा मानणारे, हिंदुत्वाच्या विचारधारेत ज्यांनी स्वतंत्र बुद्धीनं भर घातली, काळानुसार बदल केले, प्रसंगी संघटनेत किंमत मोजली, असे हे पाचहीजण आहेत. तरी त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपापली मोठी कामं उभी केली. या वैचारिक विकासाला सारंग दर्शने अर्पणपत्रिकेत शब्द वापरतात - भारतीय राष्ट्रवाद.
एक प्रकारे अटलजींची चरितकहाणी मांडताना हा ग्रंथ आपल्याला भारताची स्वातंत्र्यानंतरची राजकीय वाटचाल दाखवतो. ग्रंथात सादर केलेला पर्स्पेक्टिव्ह हा संघ, जनसंघ, जनता पक्ष आणि मग भाजप असा विस्तारत जाणारा आहे. अटलजींचं जीवनच असं आहे की त्यात काही वेगळं, वैयक्तिक असं शिल्लक नाही. संघाचा स्वयंसेवक म्हणून त्यांच्या जीवनाची वाटचाल सुरू झाली. विद्यार्थिदशेपासूनच संघानं सोपवलेल्या जबाबदाऱ्या अटलजींनी पार पाडल्या. आधी संघ ही संघटना, तिचा हिंदुत्व हा विचार, आणि पुढे पक्षाचा नेता हे सर्व एकरूप आहे. त्यामुळं त्यांची चरितकहाणी मांडणं म्हणजे भारताच्या राजकीय वाटचालीचा संघ-भाजपच्या अँगलनं मांडलेला पर्स्पेक्टिव्ह आहे. तो वाचताना संघाची ऐतिहासिक वाटचाल, ती होताना श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संकल्पनेनुसार जनसंघाची स्थापना, आणीबाणीनंतरचं जनसंघाचं जनता पक्षातलं विसर्जन, भारतीय राजकारणातला हा मोलाचा प्रयोग पूर्णपणे फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना आणि पुढची वाटचाल या सर्वांचा अतिशय दीर्घ इतिहास लेखकानं मांडला आहे. भाजप ज्याला समजावून घ्यायचा आहे, त्याची स्वातंत्र्योत्तर राजकीय वाटचाल ज्यांना समजावून घ्यायची आहे, त्यानं हा ग्रंथ वाचणं अपरिहार्य आहे. चांगला फोटोग्राफर जुन्या स्मृती सांगायला सेपिया रंगातला फोटो काढतो, तसं हा ग्रंथ वाचताना आपण भारतीय राजकारणाचा सेपिया रंगातला फोटो पाहतोय, असं वाटत राहतं.
लेखकाचा वैचारिक कोष ज्ञान प्रबोधिनी, त्यातला राष्ट्रविचार आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या सहवासात तयार झाला आहे. शिवाय अर्पणपत्रिका पाच हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांना आहे. अर्थात, याचा अर्थ लेखकानं पूर्वग्रहानं हा ग्रंथ मांडलाय असं नाही. काही परखड मुद्दे, प्रसंगी अटलजींच्या किंवा संघटना-पक्षाच्या धोरणांची परखड चिकित्सा, घडलेल्या चुका किंवा उणिवा मांडायलाही लेखक बिचकलेला नाही. त्यामुळं ग्रंथाची विश्वासार्हता वाढत जाते. देशाच्या वाटचालीच्या ज्या अत्यंत मोलाच्या, लँडमार्क म्हणाव्यात अशा घटना - काश्मीर प्रश्न, त्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेली 'एकात्म मानवतावादा'ची वैचारिक मांडणी आणि त्यांचा दुःखद असा संशयास्पद मृत्यू, पुढचे जनसंघाचे अध्यक्ष डॉ. रघुवीर यांचा मृत्यू - इथपासून ही कहाणी पुढं सरकत राहते ती अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे अटलजींची सध्याची स्थिती, त्यांनी अधिकृतरीत्या राजकारणातून घेतलेला संन्यास आणि त्यांच्या 'भारतरत्न' उपाधीपर्यंत!
मला वाचताना वाटलं की चरित्रनायक मध्यवर्ती ठेवून हा विस्तृत आलेख लेखकानं मांडलेला आहे. या ग्रंथात आपल्याला मुख्यतः कवी आणि राजकीय अटलजी दिसतात. ती मांडणी आणि तिच्याभोवतीच्या काळाचा इतिहास आणखी खोल उतरू शकला असता, हे मी ग्रंथ उत्तम आहे असं सांगूनच म्हणतो आहे. काहीतरी खुसपट काढावं म्हणून नाही. राजकारणात असून सर्वांशी मैत्री ठेवता येते, सौजन्यानं वागता येतं, अशा शालीन राजकारणाचं प्रत्यक्ष रूप म्हणजे अटलजी. खरोखरच त्यांना 'अजातशत्रू' हा शब्द वापरणं चूक ठरणार नाही!
फार गुंतागुंतीच्या काळात अटलजींकडे सत्ता आली. त्यावेळी त्यांना २०-२२ घटकपक्ष बरोबर घेऊन पुढं सरकायचं होतं. त्यावेळी संघ-भाजपला स्वतःचा खास असा वैचारिक कार्यक्रम बाजूला ठेवावा लागला. पण अटलजींनी सर्व पक्षांची नीट मोट वळून एक प्रभावी आणि यशस्वी सरकार चालवून दाखवलं. आर्थिक सुधारणांची गती कायम ठेवली. भारताला विकासाच्या पथावर आणून ठेवलं. आत्ताच्या सरकारनं यातून काही धडे घ्यावेत, हे तर निश्चितच आहे. विशेषतः, घटकपक्षांना नाराज करणं, स्वबळावर बहुमत मिळाल्याचा एक प्रकारचा अहंकार व्यक्त होत असताना आपल्या मूळ वैचारिक भूमिका न सोडता अटलजींचं सर्वांना बरोबर घेणारं उदार व्यक्तिमत्त्व आताच्या सरकारनंही ध्यानात ठेवावं असं आहे. राजकीय व्यवस्थापनाचं हे एक कौशल्य आहे.
सत्ताधारी पक्षाशीसुद्धा देशाच्या हितासाठी प्रसंगी सहकार्य करायचं असतं, असं राजकारण अटलजी आणि जनसंघ-भाजपनं केलं आणि तसा निकोप पायंडा पाडला. कितीही टीका केली तरी इंदिराजी आणि अटलजींच्या नात्यामध्ये वैयक्तिक पातळीवर कटुता नव्हती. असलाच तर खरा मित्रभाव होता. असं म्हटलं जातं की इंदिराजी पहिल्यांदा संसदेत आल्या तेव्हा अनेकांनी नेहरूंवर घराणेशाहीचा आरोप केला. अटलजींना प्रतिक्रिया विचारली तर त्यांच्या शैलीत प्रसन्नपणे हसून ते म्हणाले होते. 'अच्छा है! इस बहाने देखनेलायक कोई तो चेहरा संसद में उपस्थित होगा.' नर्मविनोदी आणि अर्थातच पातळी न सोडणारा मैत्रिभाव जोपासणारी अटलजींची ही अशी शालीनता. अटलजींच्या संसदेतल्या एका भाषणानंतर इंदिराजी म्हणाल्या, 'आप भाषण तो बहुत अच्छा करते हो, लेकिन गलत बेंच पे बैठे हो! यहाँ आ जाईये!'
भारताचा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ छायापत्रकार रघु राय यांनी काढलेला विलक्षण फोटो मला आठवतो. अटलजी आणि इंदिराजी एका छत्रीमध्ये संसदेतून बाहेर पडत आहेत. मला तो फोटो अर्थपूर्ण वाटतो. आपली राजकीय मतं असू शकतात याचा अर्थ माणसं लगेच शत्रू बनत नाहीत. हा लोकशाहीचा आत्मा आहे; इतकंच काय भारतीय संस्कृतीचाही आत्मा आहे. या आत्म्याचं व विलक्षण प्रतिभावंत कवीचं दर्शन म्हणजे अटलजींचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं कार्य. सारंग दर्शने यांनी हा ग्रंथ सिद्ध करून अटलजींचं काम समाजासमोर ठेवण्याचं फार मोठं समाजकार्य केलं आहे.
अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी
लेखक : सारंग दर्शने
मुखपृष्ठ : सतीश भावसार
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठं : ५४०
किंमत : ६०० रु.
'अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी' हा बृहत् ग्रंथ लिहून सारंग दर्शने यांनी मराठीतील राजकीय चरित्र वाङ्मयामध्ये मोलाची भर घातली आहे. या ग्रंथासाठी त्यांनी घेतलेले शिस्तशीर कष्ट पानोपानी दिसून येतात. एकदा हातात घेतलं की खाली ठेवावासा वाटणार नाही, इतका हा ग्रंथ छान जमून आला आहे. पत्रकारितेचा धर्म पाळून व्रतस्थ आणि तटस्थ पत्रकारिता करणारे जे मूठभर पत्रकार भारतात-महाराष्ट्रात निघतील त्यांच्यात सारंग यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांनी त्यांचं कौशल्य पणाला लावून अटलजींची ही चरित-कहाणी मांडली आहे. अर्पणपत्रिकेत डॉ. वि. वि. पेंडसे, श्री. ग. माजगावकर, स. ह. देशपांडे, दि. वि. गोखले आणि मधुकरराव देवल या गुरुजनांचा आदरपूर्वक उल्लेख करून हा ग्रंथ त्यांना समर्पित केला आहे. हे मूळचे संघ स्वयंसेवक. 'हिंदुत्व' विचारधारा मानणारे, हिंदुत्वाच्या विचारधारेत ज्यांनी स्वतंत्र बुद्धीनं भर घातली, काळानुसार बदल केले, प्रसंगी संघटनेत किंमत मोजली, असे हे पाचहीजण आहेत. तरी त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपापली मोठी कामं उभी केली. या वैचारिक विकासाला सारंग दर्शने अर्पणपत्रिकेत शब्द वापरतात - भारतीय राष्ट्रवाद.
एक प्रकारे अटलजींची चरितकहाणी मांडताना हा ग्रंथ आपल्याला भारताची स्वातंत्र्यानंतरची राजकीय वाटचाल दाखवतो. ग्रंथात सादर केलेला पर्स्पेक्टिव्ह हा संघ, जनसंघ, जनता पक्ष आणि मग भाजप असा विस्तारत जाणारा आहे. अटलजींचं जीवनच असं आहे की त्यात काही वेगळं, वैयक्तिक असं शिल्लक नाही. संघाचा स्वयंसेवक म्हणून त्यांच्या जीवनाची वाटचाल सुरू झाली. विद्यार्थिदशेपासूनच संघानं सोपवलेल्या जबाबदाऱ्या अटलजींनी पार पाडल्या. आधी संघ ही संघटना, तिचा हिंदुत्व हा विचार, आणि पुढे पक्षाचा नेता हे सर्व एकरूप आहे. त्यामुळं त्यांची चरितकहाणी मांडणं म्हणजे भारताच्या राजकीय वाटचालीचा संघ-भाजपच्या अँगलनं मांडलेला पर्स्पेक्टिव्ह आहे. तो वाचताना संघाची ऐतिहासिक वाटचाल, ती होताना श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संकल्पनेनुसार जनसंघाची स्थापना, आणीबाणीनंतरचं जनसंघाचं जनता पक्षातलं विसर्जन, भारतीय राजकारणातला हा मोलाचा प्रयोग पूर्णपणे फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना आणि पुढची वाटचाल या सर्वांचा अतिशय दीर्घ इतिहास लेखकानं मांडला आहे. भाजप ज्याला समजावून घ्यायचा आहे, त्याची स्वातंत्र्योत्तर राजकीय वाटचाल ज्यांना समजावून घ्यायची आहे, त्यानं हा ग्रंथ वाचणं अपरिहार्य आहे. चांगला फोटोग्राफर जुन्या स्मृती सांगायला सेपिया रंगातला फोटो काढतो, तसं हा ग्रंथ वाचताना आपण भारतीय राजकारणाचा सेपिया रंगातला फोटो पाहतोय, असं वाटत राहतं.
लेखकाचा वैचारिक कोष ज्ञान प्रबोधिनी, त्यातला राष्ट्रविचार आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या सहवासात तयार झाला आहे. शिवाय अर्पणपत्रिका पाच हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांना आहे. अर्थात, याचा अर्थ लेखकानं पूर्वग्रहानं हा ग्रंथ मांडलाय असं नाही. काही परखड मुद्दे, प्रसंगी अटलजींच्या किंवा संघटना-पक्षाच्या धोरणांची परखड चिकित्सा, घडलेल्या चुका किंवा उणिवा मांडायलाही लेखक बिचकलेला नाही. त्यामुळं ग्रंथाची विश्वासार्हता वाढत जाते. देशाच्या वाटचालीच्या ज्या अत्यंत मोलाच्या, लँडमार्क म्हणाव्यात अशा घटना - काश्मीर प्रश्न, त्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेली 'एकात्म मानवतावादा'ची वैचारिक मांडणी आणि त्यांचा दुःखद असा संशयास्पद मृत्यू, पुढचे जनसंघाचे अध्यक्ष डॉ. रघुवीर यांचा मृत्यू - इथपासून ही कहाणी पुढं सरकत राहते ती अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे अटलजींची सध्याची स्थिती, त्यांनी अधिकृतरीत्या राजकारणातून घेतलेला संन्यास आणि त्यांच्या 'भारतरत्न' उपाधीपर्यंत!
मला वाचताना वाटलं की चरित्रनायक मध्यवर्ती ठेवून हा विस्तृत आलेख लेखकानं मांडलेला आहे. या ग्रंथात आपल्याला मुख्यतः कवी आणि राजकीय अटलजी दिसतात. ती मांडणी आणि तिच्याभोवतीच्या काळाचा इतिहास आणखी खोल उतरू शकला असता, हे मी ग्रंथ उत्तम आहे असं सांगूनच म्हणतो आहे. काहीतरी खुसपट काढावं म्हणून नाही. राजकारणात असून सर्वांशी मैत्री ठेवता येते, सौजन्यानं वागता येतं, अशा शालीन राजकारणाचं प्रत्यक्ष रूप म्हणजे अटलजी. खरोखरच त्यांना 'अजातशत्रू' हा शब्द वापरणं चूक ठरणार नाही!
फार गुंतागुंतीच्या काळात अटलजींकडे सत्ता आली. त्यावेळी त्यांना २०-२२ घटकपक्ष बरोबर घेऊन पुढं सरकायचं होतं. त्यावेळी संघ-भाजपला स्वतःचा खास असा वैचारिक कार्यक्रम बाजूला ठेवावा लागला. पण अटलजींनी सर्व पक्षांची नीट मोट वळून एक प्रभावी आणि यशस्वी सरकार चालवून दाखवलं. आर्थिक सुधारणांची गती कायम ठेवली. भारताला विकासाच्या पथावर आणून ठेवलं. आत्ताच्या सरकारनं यातून काही धडे घ्यावेत, हे तर निश्चितच आहे. विशेषतः, घटकपक्षांना नाराज करणं, स्वबळावर बहुमत मिळाल्याचा एक प्रकारचा अहंकार व्यक्त होत असताना आपल्या मूळ वैचारिक भूमिका न सोडता अटलजींचं सर्वांना बरोबर घेणारं उदार व्यक्तिमत्त्व आताच्या सरकारनंही ध्यानात ठेवावं असं आहे. राजकीय व्यवस्थापनाचं हे एक कौशल्य आहे.
सत्ताधारी पक्षाशीसुद्धा देशाच्या हितासाठी प्रसंगी सहकार्य करायचं असतं, असं राजकारण अटलजी आणि जनसंघ-भाजपनं केलं आणि तसा निकोप पायंडा पाडला. कितीही टीका केली तरी इंदिराजी आणि अटलजींच्या नात्यामध्ये वैयक्तिक पातळीवर कटुता नव्हती. असलाच तर खरा मित्रभाव होता. असं म्हटलं जातं की इंदिराजी पहिल्यांदा संसदेत आल्या तेव्हा अनेकांनी नेहरूंवर घराणेशाहीचा आरोप केला. अटलजींना प्रतिक्रिया विचारली तर त्यांच्या शैलीत प्रसन्नपणे हसून ते म्हणाले होते. 'अच्छा है! इस बहाने देखनेलायक कोई तो चेहरा संसद में उपस्थित होगा.' नर्मविनोदी आणि अर्थातच पातळी न सोडणारा मैत्रिभाव जोपासणारी अटलजींची ही अशी शालीनता. अटलजींच्या संसदेतल्या एका भाषणानंतर इंदिराजी म्हणाल्या, 'आप भाषण तो बहुत अच्छा करते हो, लेकिन गलत बेंच पे बैठे हो! यहाँ आ जाईये!'
भारताचा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ छायापत्रकार रघु राय यांनी काढलेला विलक्षण फोटो मला आठवतो. अटलजी आणि इंदिराजी एका छत्रीमध्ये संसदेतून बाहेर पडत आहेत. मला तो फोटो अर्थपूर्ण वाटतो. आपली राजकीय मतं असू शकतात याचा अर्थ माणसं लगेच शत्रू बनत नाहीत. हा लोकशाहीचा आत्मा आहे; इतकंच काय भारतीय संस्कृतीचाही आत्मा आहे. या आत्म्याचं व विलक्षण प्रतिभावंत कवीचं दर्शन म्हणजे अटलजींचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं कार्य. सारंग दर्शने यांनी हा ग्रंथ सिद्ध करून अटलजींचं काम समाजासमोर ठेवण्याचं फार मोठं समाजकार्य केलं आहे.
अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी
लेखक : सारंग दर्शने
मुखपृष्ठ : सतीश भावसार
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठं : ५४०
किंमत : ६०० रु.