दीपक घारे
...
नाटक हे जितकं रंगभूमीवर घडतं, तितकंच ते करणाऱ्या रंगकर्मींच्या आणि प्रेक्षकांच्या मनात सतत रेंगाळत असतं. नाट्यानुभवामागचा मानवी जीवनाचा व्यापक आशय अनेकांना विविध प्रकारे भावतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे शंभू मित्र यांना अभिप्रेत असलेलं आत्मरूपाचं चिंतन. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्याकडे सर्जनशील साहित्याकडे पाहण्याची अशीच एक सखोल आणि चिंतनशील दृष्टी होती. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नाटकाविषयीचा मूलभूत विचार मांडणारं पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्याचं नाव आहे, 'नट, नाटक आणि आपण.'
नाटकाचा प्रयोग महत्त्वाचा की संहिता, नाटकाला साहित्यप्रकार मानायचे की नाही, याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. सरदेशमुखांचं सारं विवेचन प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा नाटकाच्या संहितेवर भर देणारं आहे. नाटक प्राधान्याने शब्द आहे. शब्दांच्या अन्वयाने संवाद होतो. शुद्रकाचं 'मृच्छकटिक' असो वा गडकऱ्यांचं 'पुण्यप्रभाव', त्यांचे प्रयोग होवोत वा न होवोत, ती टिकून राहिली आहेत ती संहितारूपानेच. त्यामुळे नाट्यरूपामागचा मानवी जीवनाचा जो तत्त्व विचार आहे, नाटकातून उलगडत जाणाऱ्या आणि आत्मरूपाच्या साक्षात्काराच्या क्षणापर्यंत नेणारा जो प्रवास आहे, त्याचं विवेचन सरदेशमुखांनी इथे केलेलं आहे.
नट, नाटककार आणि आपण, म्हणजेच प्रेक्षक यांच्या भूमिका आणि त्यांचं स्वरूप सरदेशमुखांनी स्पष्ट केलं आहे. नाटककाराला संहिता रचताना, दिग्दर्शकाला ती संहिता प्रयोगक्षम बनवताना आणि नटनटींना ती अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोचवताना आत्मप्रत्ययाला साक्षी ठेवणं गरजेचं आहे. आणि या साऱ्यांच्या प्रतिभेचा जेव्हा प्रेक्षक रसिकपणे आदरपूर्वक स्वीकार करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने नाट्यानुभव परिपूर्ण होतो.
सरदेशमुखांचा ओढा कालिदास, शेक्सपिअरसारख्या अभिजात नाटकांकडे असला, तरी 'वेटिंग फॉर गोदो', 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे' अशा आधुनिक नाटकांचा आणि ब्रेख्तसारख्या नाटककारांचा विचार त्यांनी केलेला आहे. पण अॅब्सर्ड नाटकांच्या टोकाच्या भूमिकेपेक्षा पारंपरिक आणि प्रायोगिक यांचा समतोल साधणारी महेश एलकुंचवार ह्यांची नाटकं सरदेशमुखांच्या नाट्याभिरुचीला अधिक भावतात.
नाटक हे दु:खमुळाचा आणि सद्भावाचा शोध घेते. नाटकाचं प्रयोजन हे माणसाच्या मनातील सदसद्विवेकबुद्धी जागी करणं हे आहे. हॅम्लेटच्या तोंडून नाटकाचं धर्मतत्त्वच शेक्सपिअरने सांगितलं आहे, असं सरदेशमुखांना वाटतं.
'Play is the thing
Wherein I will catch
The conscience of the king!'
नाटकात प्रतीकार्थ हा महत्त्वाचा असतो. प्रतीकात जीवनाचा अर्थ सामावलेला असतो. निरागस माणसांची सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांकडून होणारी पारध हा 'शाकुंतल'चा प्रतीकार्थ आहे. प्रत्यक्ष जीवनातील भेदक वास्तव प्रतीकांमधून सुसह्य होतं. सरदेशमुखांचा 'वेटिंग फॉर गोदो'बद्दल मुख्य आक्षेप आहे तो, प्रतीकार्थाचं त्यात सामर्थ्य नाही हा. बेकेट हा प्रतीकार्थाने पोचू शकतो, पण तो महायुद्धाची विध्वंसक परिस्थिती अनुभवलेल्या प्रेक्षकांपर्यंतच. सरदेशमुखांनी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि त्यांच्यासारख्या अवलिया पुरुषांच्या अनाकलनीय वर्तनाचा संदर्भ देऊन सांगितलं आहे की, पुढे येऊ घातलेल्या अॅब्सर्ड युगाचा स्वामी समर्थांच्या दैनंदिन रहाटीतून एक साक्षात्कार मिळाला. अॅब्सर्ड नाटकांमधली भौतिक अर्थशून्यता, पिरांदेल्लो याची नाटक आणि जीवन यांच्या सीमारेषेबद्दल तात्त्विक प्रश्न निर्माण करणारी दृष्टी आणि आध्यात्मिक आशयापर्यंत घेऊन जाणारी आदर्श नाट्यजाणीव, यांची सरदेशमुखांनी सांगड घातली आहे.
'अॅब्सर्ड नाटके, शोकात्म नाटके, भयद्वेष-सूड यांच्या आविष्काराची नाटके जितकी सार्थ आणि सेव्य, तशी रोमांचक स्वप्नमाधुर्याची नाटकेही सेव्य आणि सार्थ आहेत, हे आपण कधीच विसरू नये' असा सरदेशमुखांच्या विवेचनाचा सारांश आहे. फार्स आणि फँटसीसारख्या मनोरंजनपर नाटकांना हिणवू नये. कारण नाटक हे सुष्ट-दुष्ट, चांगलं-वाईट सर्वांना पोटात घेणारं विश्वात्मक सर्वेश्वराचं प्रत्यक्ष रूप आहे. या विश्वरूपाचा साक्षात्कार आपल्याला नाट्यरूपातून होतो.
परिशिष्टात सरदेशमुखांनी काही नाटकांवर आणि नाटककारांवर लिहिलेले लेख दिलेले आहेत. त्यातून त्यांची नाट्यानुभवाकडे पाहण्याची आदर्श दृष्टी अधिक स्पष्ट होते. इब्सेनच्या मराठीतील लोकप्रिय प्रतिमेपेक्षा वेगळं असं आकलन इब्सेनवरील लेखात आहे. तर महेश एलकुंचवार यांच्या 'वाडा चिरेबंदी' नाट्यत्रयीत सरदेशमुखांना आलेला आशयघनता आणि रचनाकुशलता यांचा प्रगल्भ नाट्यानुभव त्यांनी मांडलेला आहे. सरदेशमुखांना अभिप्रेत असलेल्या आदर्श नाट्यधर्माच्या जवळ जाणारं आजच्या काळातलं नाटक म्हणजे 'वाडा चिरेबंदी'; 'एक स्वयंसिद्ध कुळधर्म' असंच सरदेशमुखांनी त्याचं वर्णन केलेलं आहे.
माधव वझे ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना सरदेशमुखांच्या प्रतिपादनातील मर्मस्थाने उलगडून सांगते, तशीच ती सरदेशमुखांच्या शिवतत्त्वाच्या आग्रहीपणामागच्या हळवेपणाबद्दल सावधही करते. स्तानिस्लावस्की, लॉरेन्स ऑलिव्हिए, डॉ. श्रीराम लागू यांचे संदर्भ देत माधव वझे ह्यांनी सरदेशमुखांची विधाने तपासून पाहिली आहेत. आजच्या काळात सरदेशमुखांची इतकी आदर्शवादी भूमिका कदाचित पटणार नाही. पण रंगभूमीचा मूलभूत विचार करायला प्रवृत्त करण्याचं सामर्थ्य या तात्त्विक लेखनात नक्कीच आहे!
…...
नट, नाटक आणि आपण
लेखक : त्र्यं. वि. सरदेशमुख
मुखपृष्ठ : शिरीष घाटे
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह, मुंबई
पृष्ठं : १२२
किंमत : २२५ रु.