हेरंब कुलकर्णी
एका उपेक्षित शैक्षणिक जगाची ओळख
शहरी भागातले आणि मध्यमवर्गाचे उच्च मध्यमवर्गाचे प्रश्न हेच जणू सर्व समाजाचे प्रश्न आहेत अशा मांडणीचा हा काळ आहे. दप्तराचे ओझे, शाळाप्रवेश, फी वाढ, शाळेत जाण्यासाठी वाहनांची सुरक्षा, शाळेत फास्ट फूड खावे की नाही… हे सारे आज शिक्षणव्यवस्तेतील जणू जीवन मरणाचे प्रश्न बनले आहेत. हे सारे प्रश्न आहेत आणि ते नक्कीच महत्त्वाचेसुद्धा आहेत. पण या प्रश्नांच्या परिघाबाहेर एक वंचितांचे जग आहे. एक नाकारलेल्या माणसांचे जग आहे. जीवन-मरणाची लढाई लढताना ज्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटी असतो, अशा जगाकडे आपण दुर्लक्ष करतो. सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २०१० साली आला. त्यामुळे देशातील शाळेत न जाणारी किमान २ कोटी मुले या कायद्याने आता आपोआप शाळेत बसतील, असे वाटले. पण तो कायदा येऊन ७ वर्षे झाली, तरी ही परिघाबाहेरची मुले अजून परिघाबाहेरच आहेत. या पार्श्वभूमीवर या वंचित समूहातील मुलांचे प्रश्न घेऊन काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे काम थक्क करून टाकते. ‘सागरशाळा’ हे पुस्तक असेच एका जगाविषयी आहे. ज्या जगाचा आपण विचारही केलेला नाही.
देवेन्द्र कांदोळकर या स्वप्नाळू आणि संवेदनशील माणसाची मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठीची ही प्रदीर्घ आणि चिकाटीची धडपड आहे. मूळ गोव्याचे कांदोळकर हे सामाजिक कामासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून थेट गुजराथमध्ये कच्छला पोहोचतात. तिथे भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या ‘युसुफ मेहेर अली सेंटर’मध्ये जातात. त्या युसुफ मेहेर अली सेंटर मध्ये फक्त १५ दिवसांसाठी कांदोळकर थांबतात आणि बघता बघता १५ वर्षे तेथेच त्या परिसरातील माच्छिमारांच्या मुलांसाठी स्वत:ला झोकून देतात. केवळ मासेमारीवर जगणारा हा मच्छिमार समाज ऑक्टोबर ते मे या महिन्यांच्या काळात स्वत:ची गावे सोडून समुद्राच्या काठी येऊन राहतो. कारण या काळातच मासेमारी होते. या काळातील तेथील तीव्र उष्णता, दमट वातावरण, पिण्याच्या पाण्याचे हाल, राहण्याची गैरसोय आणि दिवसरात्र अमानुष कष्ट, अशा जगण्यात मुलांचे शिक्षण हा विषय पूर्णत: उपेक्षितच राहतो. मुले केवळ आईवडिलांना मासेमारीत किंवा तत्सम कामात मदत करीत राहतात किंवा मातीत खेळत राहतात. सर्वशिक्षण अभियानासारखी योजना आली आणि गेली, पण तिच्या जाळ्यात हे विद्यार्थी गावलेच नाहीत.
अशा स्थितीत कांदोळकर वैद्यकीय सेवेच्या निमिताने समुद्रकिनारी जातात आणि ही शेकडो शालाबाह्य मुले बघून अस्वस्थ होतात. त्या मुलांची यादी करतात. तेथील भाषा येत नसल्याने त्यांच्यातील शिकलेली मुले शिक्षक म्हणून शोधणे एवढाच एक पर्याय उरतो. आज बेकारांना इथे नोकऱ्या मिळत नसताना, तिथे मात्र शिक्षक शोधत फिरणारे कांदोळकर बघून साक्षरतेची दाहक स्थिती लक्षात येते. दोन अपंग तरुण काही गृहिणी शिक्षक म्हणून नेमले जातात. या मुस्लिम समूहात शिक्षणासाठी कांदोळकर यांनी केलेले प्रयत्न खूप वेगळे असतात. एका गावात बंद पडलेली शाळा उघडण्यासाठी कांदोळकर नमाज संपताना शुक्रवारी मशिदीबाहेर जाऊन उभे राहतात. गावाशी बोलतात. मुलांची फेरी काढतात आणि कुराणातील वचनांच्या घोषणा बनवितात. यातून बंद पडलेल्या शाळेत ७५ विद्यार्थी येऊ लागतात. ही शाळा शिक्षक त्या आठवड्यात कायमची बंद करणार असतात. ज्या प्रश्नांचा बाऊ केला जातो, ते आस्था असेल तर किती सहज सुटतात हे यातून लक्षात येते.
या शाळेत ते मुलांना स्वच्छतेची सवय लावतात. मुले सर्रास गुटखा खातात. तो गुटखा बंद करण्यासाठी ते विविध प्रयत्न करतात. महिलांना साक्षर करण्यासाठी वर्ग चालवितात. त्याचवेळी मुलींचे बालविवाह थांबवण्यासाठी पालक प्रबोधन करून मुलींना शाळेतून काढू नये म्हणून धडपडतात. यातून एक मुस्लिम मुलगी पहिल्यांदा १० वी होते. त्यावेळी त्यांना झालेला आनंद मुलींच्या शिक्षणाची वाट किती बिकट आहे याची साक्ष देतो.
कांदोळकर हे चांगले कलावंत आहेत. या संस्थेच्या बालवाड्यांत जाऊन ते मुलांचे मनोरंजन करतात. शिक्षिकांचे प्रशिक्षण करतात. या सागरशाळा सुरू केल्यावर या गरीब मुलांचे नाटक बसवतात. कोणतीही पार्श्वभूमी नसणारी ही गरीब शालाबाह्य मुले कोणत्याही सुविधा नसताना गुजराथ राज्यातील बाल नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवतात. हे काहीसे अविश्वसनीय वाटणारे सत्य वाचकांना निश्चितच रोमांचित करेल.
यानंतर ते या मुलांसाठी आणि मुलींसाठी वसतिगृह सुरू करतात. ते सुरू करताना पालकांची मानसिकता तयार करणे, निधी जमविणे ही सारी धडपड त्यांची शिक्षणाची तळमळ वाचकांपर्यंत पोहोचविते. या सर्व धडपडीत शिक्षण विभागाची असंवेदनशीलता आणि बेफिकीरवृत्ती चीड आणणारी आहे. वास्तविक या शाळा सुरू केल्या तेव्हा सर्व शिक्षा अभियान सुरू होते. ही मुले शोधून या मुलांसाठी शाळा सुरू करणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी होती, पण अशी शालाबाह्य मुले दाखवायचीच नाही हाच पॅटर्न तिथेही होता आणि ही संस्था पुढाकार घेते आहे, तर मदत करणे सोडाच पण या मुलांचे जन्मदाखले देणे, परीक्षेला परवानगी देणे यांसाठीही खूप त्रास दिला जातो. एकदा तर कांदोळकर अधिकाऱ्यासमोर एका पत्रासाठी रडतात. ज्या गुजराथचे ‘विकास मॉडेल’ म्हणून कौतुक होते, तिथे वंचित मुलांच्या शिक्षणासाठीची ही वास्तविकता हे पुस्तक नकळत समोर आणते.
हे पुस्तक एकाचवेळी वंचित मुलांची वेदना, समाज आणि शासनाकडून होणारी त्यांच्या शिक्षणाची उपेक्षा आपल्यासमोर मांडते आणि त्याचवेळी या उपेक्षित मुलांसाठी ठरवले तर काय करता येते, कितीप्रकारे मदत मिळवता येते? भाषेची अडचण असताना, त्या प्रदेशातील रहिवासी नसतानाही, ठरविले तर किती व्यापक काम करू शकतो याचा आदर्श घालून देते.
सागरशाळा
लेखक : देवेन्द्र कांडोळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठं : १५२
किंमत : १५०
एका उपेक्षित शैक्षणिक जगाची ओळख
शहरी भागातले आणि मध्यमवर्गाचे उच्च मध्यमवर्गाचे प्रश्न हेच जणू सर्व समाजाचे प्रश्न आहेत अशा मांडणीचा हा काळ आहे. दप्तराचे ओझे, शाळाप्रवेश, फी वाढ, शाळेत जाण्यासाठी वाहनांची सुरक्षा, शाळेत फास्ट फूड खावे की नाही… हे सारे आज शिक्षणव्यवस्तेतील जणू जीवन मरणाचे प्रश्न बनले आहेत. हे सारे प्रश्न आहेत आणि ते नक्कीच महत्त्वाचेसुद्धा आहेत. पण या प्रश्नांच्या परिघाबाहेर एक वंचितांचे जग आहे. एक नाकारलेल्या माणसांचे जग आहे. जीवन-मरणाची लढाई लढताना ज्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटी असतो, अशा जगाकडे आपण दुर्लक्ष करतो. सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २०१० साली आला. त्यामुळे देशातील शाळेत न जाणारी किमान २ कोटी मुले या कायद्याने आता आपोआप शाळेत बसतील, असे वाटले. पण तो कायदा येऊन ७ वर्षे झाली, तरी ही परिघाबाहेरची मुले अजून परिघाबाहेरच आहेत. या पार्श्वभूमीवर या वंचित समूहातील मुलांचे प्रश्न घेऊन काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे काम थक्क करून टाकते. ‘सागरशाळा’ हे पुस्तक असेच एका जगाविषयी आहे. ज्या जगाचा आपण विचारही केलेला नाही.
देवेन्द्र कांदोळकर या स्वप्नाळू आणि संवेदनशील माणसाची मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठीची ही प्रदीर्घ आणि चिकाटीची धडपड आहे. मूळ गोव्याचे कांदोळकर हे सामाजिक कामासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून थेट गुजराथमध्ये कच्छला पोहोचतात. तिथे भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या ‘युसुफ मेहेर अली सेंटर’मध्ये जातात. त्या युसुफ मेहेर अली सेंटर मध्ये फक्त १५ दिवसांसाठी कांदोळकर थांबतात आणि बघता बघता १५ वर्षे तेथेच त्या परिसरातील माच्छिमारांच्या मुलांसाठी स्वत:ला झोकून देतात. केवळ मासेमारीवर जगणारा हा मच्छिमार समाज ऑक्टोबर ते मे या महिन्यांच्या काळात स्वत:ची गावे सोडून समुद्राच्या काठी येऊन राहतो. कारण या काळातच मासेमारी होते. या काळातील तेथील तीव्र उष्णता, दमट वातावरण, पिण्याच्या पाण्याचे हाल, राहण्याची गैरसोय आणि दिवसरात्र अमानुष कष्ट, अशा जगण्यात मुलांचे शिक्षण हा विषय पूर्णत: उपेक्षितच राहतो. मुले केवळ आईवडिलांना मासेमारीत किंवा तत्सम कामात मदत करीत राहतात किंवा मातीत खेळत राहतात. सर्वशिक्षण अभियानासारखी योजना आली आणि गेली, पण तिच्या जाळ्यात हे विद्यार्थी गावलेच नाहीत.
अशा स्थितीत कांदोळकर वैद्यकीय सेवेच्या निमिताने समुद्रकिनारी जातात आणि ही शेकडो शालाबाह्य मुले बघून अस्वस्थ होतात. त्या मुलांची यादी करतात. तेथील भाषा येत नसल्याने त्यांच्यातील शिकलेली मुले शिक्षक म्हणून शोधणे एवढाच एक पर्याय उरतो. आज बेकारांना इथे नोकऱ्या मिळत नसताना, तिथे मात्र शिक्षक शोधत फिरणारे कांदोळकर बघून साक्षरतेची दाहक स्थिती लक्षात येते. दोन अपंग तरुण काही गृहिणी शिक्षक म्हणून नेमले जातात. या मुस्लिम समूहात शिक्षणासाठी कांदोळकर यांनी केलेले प्रयत्न खूप वेगळे असतात. एका गावात बंद पडलेली शाळा उघडण्यासाठी कांदोळकर नमाज संपताना शुक्रवारी मशिदीबाहेर जाऊन उभे राहतात. गावाशी बोलतात. मुलांची फेरी काढतात आणि कुराणातील वचनांच्या घोषणा बनवितात. यातून बंद पडलेल्या शाळेत ७५ विद्यार्थी येऊ लागतात. ही शाळा शिक्षक त्या आठवड्यात कायमची बंद करणार असतात. ज्या प्रश्नांचा बाऊ केला जातो, ते आस्था असेल तर किती सहज सुटतात हे यातून लक्षात येते.
या शाळेत ते मुलांना स्वच्छतेची सवय लावतात. मुले सर्रास गुटखा खातात. तो गुटखा बंद करण्यासाठी ते विविध प्रयत्न करतात. महिलांना साक्षर करण्यासाठी वर्ग चालवितात. त्याचवेळी मुलींचे बालविवाह थांबवण्यासाठी पालक प्रबोधन करून मुलींना शाळेतून काढू नये म्हणून धडपडतात. यातून एक मुस्लिम मुलगी पहिल्यांदा १० वी होते. त्यावेळी त्यांना झालेला आनंद मुलींच्या शिक्षणाची वाट किती बिकट आहे याची साक्ष देतो.
कांदोळकर हे चांगले कलावंत आहेत. या संस्थेच्या बालवाड्यांत जाऊन ते मुलांचे मनोरंजन करतात. शिक्षिकांचे प्रशिक्षण करतात. या सागरशाळा सुरू केल्यावर या गरीब मुलांचे नाटक बसवतात. कोणतीही पार्श्वभूमी नसणारी ही गरीब शालाबाह्य मुले कोणत्याही सुविधा नसताना गुजराथ राज्यातील बाल नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवतात. हे काहीसे अविश्वसनीय वाटणारे सत्य वाचकांना निश्चितच रोमांचित करेल.
यानंतर ते या मुलांसाठी आणि मुलींसाठी वसतिगृह सुरू करतात. ते सुरू करताना पालकांची मानसिकता तयार करणे, निधी जमविणे ही सारी धडपड त्यांची शिक्षणाची तळमळ वाचकांपर्यंत पोहोचविते. या सर्व धडपडीत शिक्षण विभागाची असंवेदनशीलता आणि बेफिकीरवृत्ती चीड आणणारी आहे. वास्तविक या शाळा सुरू केल्या तेव्हा सर्व शिक्षा अभियान सुरू होते. ही मुले शोधून या मुलांसाठी शाळा सुरू करणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी होती, पण अशी शालाबाह्य मुले दाखवायचीच नाही हाच पॅटर्न तिथेही होता आणि ही संस्था पुढाकार घेते आहे, तर मदत करणे सोडाच पण या मुलांचे जन्मदाखले देणे, परीक्षेला परवानगी देणे यांसाठीही खूप त्रास दिला जातो. एकदा तर कांदोळकर अधिकाऱ्यासमोर एका पत्रासाठी रडतात. ज्या गुजराथचे ‘विकास मॉडेल’ म्हणून कौतुक होते, तिथे वंचित मुलांच्या शिक्षणासाठीची ही वास्तविकता हे पुस्तक नकळत समोर आणते.
हे पुस्तक एकाचवेळी वंचित मुलांची वेदना, समाज आणि शासनाकडून होणारी त्यांच्या शिक्षणाची उपेक्षा आपल्यासमोर मांडते आणि त्याचवेळी या उपेक्षित मुलांसाठी ठरवले तर काय करता येते, कितीप्रकारे मदत मिळवता येते? भाषेची अडचण असताना, त्या प्रदेशातील रहिवासी नसतानाही, ठरविले तर किती व्यापक काम करू शकतो याचा आदर्श घालून देते.
सागरशाळा
लेखक : देवेन्द्र कांडोळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठं : १५२
किंमत : १५०