अ‍ॅपशहर

सर्जनशील अनुवादस्मरण

सोलापुरातील ‘आशय परिवारा’ने नुकताच जागतिक ग्रंथदिनानिमित्ताने कविता अनुवादाचा विशेष अंक प्रकाशित केला असून तो दिवंगत लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या अनुवादित कवितांनी सडलेला आहे. कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्र्यं. वि. सरदेशमुखांची वेगळी अशी ओळख आहे.

Maharashtra Times 19 Jun 2016, 12:00 am
रणधीर शिंदे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम book review
सर्जनशील अनुवादस्मरण


सोलापुरातील ‘आशय परिवारा’ने नुकताच जागतिक ग्रंथदिनानिमित्ताने कविता अनुवादाचा विशेष अंक प्रकाशित केला असून तो दिवंगत लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या अनुवादित कवितांनी सडलेला आहे. कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्र्यं. वि. सरदेशमुखांची वेगळी अशी ओळख आहे. ‘बखर’ आणि ‘डांगोरा एका नगरीचा’ या त्यांच्या कादंबऱ्यांनी वेगळी अशी जाण मराठी साहित्यविश्वाला दिली आहे. १९५५ साली सरदेशमुखांची ‘उत्तररात्र’ही दीर्घकविता प्रसिद्ध झाली तर, ‘कविता चंद्रकेतूची आणि उत्तररात्र’ हा संग्रह १९९९ साली प्रकाशित झाला. वेगळ्या अनुभवप्रदेशांचे संवेदन आणि आधिभौतिक जाणिवांचे आकर्षण सरदेशमुखांच्या संवेदनशीलतेला होते. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, कला यांच्या व्यासंगातून घडलेली दृष्टी त्यांच्या साहित्यातून प्रकटत आली. सरदेशमुख यांचे अनुवादकार्य वाचकांना फारसे माहीत नाही. मात्र जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांतील वाङ्मयाच्या व्यासंग परिचयातून ते अनुवादाकडे वळले. आवडलेल्या, भावलेल्या कृती त्यांनी अनुवादासाठी निवडल्या. तसेच या कवींच्या कवितेतील जाणिवाविश्वाशी स्वतःच्या संवेदनशीलता जोडले जाण्यातूनही सरदेशमुख यांनी अनुवाद केले आहेत. या अंकात वीस अनुवादित कवितांचा समावेश आहे. जोहान गटे, हरमान हेसे, पी. बी. शेली, एमिली डिकन्सन, वॉल्ट व्हीटमन, श्री. अरविंद, वॉल्टर, डिगमेयर या कवी-कवयित्रींच्या कवितांचे अनुवाद आहेत. हे सर्व कवी भिन्न भिन्न संवेदनशीलतेचे आहेत. मुख्यत्वे जर्मन व अमेरिकन कवींच्या कवितांचा हा अनुवाद आहे.

विविध संवेदनशीलतेच्या कवींच्या या कविता आहेत. अस्तित्वाची व मरणभानाची तीव्र अशी जाणीव व्यक्त करणाऱ्या कवितांची संख्या तुलनेने जास्त आहे. सर्वात जास्त कविता या हरमान हेसे या जर्मन कवीच्या आहेत. मानवी अस्तित्वाला घेरून असणाऱ्या मरणभानाची प्रमुख संवेदना या कवितेत आहे. एकांत जाणीव आणि अतीताचा ध्यास तसेच जीवनातील अंतानंतरच्या नित्यनूतनतेची जाणीव हरमान हेसेच्या कवितांतून व्यक्त झालीय.

या कवींच्या कवितेत आधिभौतिक जाणिवांची रूपेही आहेत. शाश्वत आणि अशाश्वत, निर्मिती आणि संहार अशी द्वंद्वरूपे या कवींच्या कवितेतून व्यक्त झाली आहेत. मानवी मनातील खोलवरच्या मरणसंवेदनेच्या सावलीतले जग आणि अस्तित्वाच्या तीव्र जाणिवेने पोखरलेल्या अतीताच्या शोधयात्रेला निघालेल्या जाणिवेचा भोक्तृत्व सरदेशमुखांनी या कविता-अनुवादातून करून दिला आहे.

या कवितांचा अनुवाद खास सरदेशमुखी वळणाचा आहे. सरदेशमुखांची भाषा ही प्रतिमाप्रचूर रूपकात्मक स्वरूपाची आहे. तसेच खास असे तिचे ग्रांथिक मराठी वळणही जाणवते. ‘भैरवी रात्र’, ‘सैराट वादळ वारा’, ‘देवकार्य’, ‘आकाशाचा कोवळा निळावा’, ‘मेघमाळांच्या सावल्या’, ‘अज्ञेयाच्या जागर हाका’ अशा खास शब्दशैलीची उपस्थिती या अनुवाद भाषेत आहे. हा अनुवाद करत असताना तो आपल्या भाषेत अंतरिकीकरण करावा, अशी त्यांची धारणा होती. ‘अनुवाद हा एका जीवाने दिलेल्या उद्‍गाराचा कोणा दुसऱ्या, तिसऱ्यापर्यंत पोचवलेला निरोप असतो’, असे सरदेशमुख यांनी म्हटले आहे, ते कोणत्याही अनुवादाच्याबाबतीत रास्तच ठरते.

या कविता मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्याचे श्रेय सरदेशमुख यांच्या साहित्याचे व्यासंगी चाहते आणि ग्रंथप्रेमी नीतीन वैद्य यांच्याकडे जाते. या संग्रहाला सरदेशमुखांच्या कवितेचा व अनुवादकार्याचा परिचय करून देणारी छोटेखानी मर्मज्ञ अशी प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे. सरदेशमुखांचे कविताप्रेम, व्यासंग, कविता पाठांतरणे आणि त्यांची काव्यविषयक धारणा ते त्यांच्या एकूण काव्यप्रवासाबद्दलची मार्मिक अशी निरीक्षणे वैद्य यांनी नोंदवली आहेत. नीतीन वैद्य यांना सरदेशमुख यांचा जवळचा सहवास लाभल्यामुळे त्यांच्या निर्मितीखुणांसंबंधी मांडलेली निरीक्षणे वेगळी ठरतात.

........................................................

अनुकविता

संपादन : नीतीन वैद्य

प्रकाशक : आशय परिवार, सोलापूर

पृष्ठं : ३४

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज