>> रेखा इनामदार-साने
वाचकाला त्याच्या समृद्ध बालपणात डोकावण्याची, रमण्याची संधी देणारा, पुन्हा एकवार ते निखळ आनंददायी दिवस उजळून टाकणारा आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा कसोशीने शोध घेऊ पाहाणारा चौदा कथांचा ‘अचंब्याच्या गोष्टी’ हा संग्रह आशय-विषयाच्या वेगळेपणामुळे लक्षणीय ठरणारा आहे. कोणताही निश्चित, ठाम अन्वयार्थ लावता न येणाऱ्या अनुभवांच्या धूसर प्रदेशात वावरणाऱ्या, एका बाजूने अल्लड, निष्पाप तर दुसऱ्या बाजूने बेरकी, चलाख असलेल्या साधारणतः सहा ते बारा वयोगटातल्या मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या एकूण चौदा मातब्बर साहित्यिकांच्या कथांचा हा संग्रह आहे.
अडनिड्या वयातल्या मुलांच्या दृष्टिबिंदूतून या अफाट पसरलेल्या विश्वातील घडामोडींकडे पाहिले तर नानाविध, चित्तचक्षुचमत्कारिक आणि सुरस म्हणता येतील अशा घटनांची संगती कशी लागते, किंबहुना तशी ती लावता येते का, हे आजमावून बघण्याचा प्रयत्न येथील सर्व कथानायकांनी व त्यांना जन्म देणाऱ्या त्यांच्या प्रतिभाशाली निर्मात्यांनी केला आहे. त्यात, सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर या दोन सर्जनशील, समकालीन, गुणवान लेखकांनी प्रस्तुत संग्रहाचे नेटके संपादन केलेले आहे. ते स्वतः या खेळात मनसोक्त गुंतलेले भिडू असल्याने, मिलिंद बोकील यांच्या शब्दांत सांगायचे तर येथे समाविष्ट केलेली प्रत्येक कथा त्यांनी ‘आतून पाहिलेली’ आहे. व्यावहारिक अनुभवाचे कलानुभवात झालेले रूपांतर समजावून घेण्यात दोन्ही संपादकांना मनापासून रस आणि गती आहे. याचा प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून येतो.
अशा प्रकारच्या कोणत्याही संग्रहाचे मोल हे जितके संपादनकौशल्यावर अवलंबून असते, तितकेच ते त्यामध्ये अंतर्भाव केलेल्या साहित्याच्या कलात्मकतेवरही ठरते. इथे मुळातच लेखक म्हणून त्या त्या कालखंडात मोठा नावलौकिक प्राप्त केलेल्यांच्या कथा आहेत. त्या तेव्हा आणि आतापर्यंत तरी संस्मरणीय ठरलेल्या आहेत. उदा. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘सनई’, विद्याधर पुंडलीकांची ‘आजी शरण येते’ आणि शरच्चंद्र चिरमुले यांची ‘गुप्तधन’ इ. परंतु यासंदर्भात विशेष निर्देश करावासा वाटतो तो यशवंत कर्णिक (‘डोलकाठी’), विलास मोहिते (‘धग’), वामन काळे (‘लेखकाची गोष्ट’) व वामन इंगळे (‘आजोबाचे लग्न’) यांच्यासारख्या काहीशा बाजूला पडलेल्या, दुर्लक्षित राहिलेल्या कथाकारांच्या कथांचा. त्यांच्या कसदार कथांकडे संपादकांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. त्यांची दखल घेण्याचे श्रेय या दोघांना अवश्य द्यायला हवे.
प्रथमदर्शनीच ध्यानात येते की बहुतांशी कथांमधील भौगोलिक परिसर ग्रामीण वा निमशहरी आहे, तो महानगरातला नाही. चाळीत, बैठ्या कौलारू घरात व एकत्र कुटुंबात कथानक घडते. खळं, गोठे, उखळ, सारवलेली जमीन, तुळशीवृंदावन, पाणंद, द्रोणी, रहाट, विहीर, संस्कृत श्लोकांची संथा देणारे शास्त्रीबुवा आणि सारवट गाडीत बसून गावाला जाणे हे वातावरण येथे आहे. कथांतर्गत काळ १९७० - पूर्व आहे. गोट्या खेळणारी जत्रेला जाणारी, पतंग उडवण्यात तासन् तास रमून जाणारी आणि मुख्य म्हणजे गावभर उनाडक्या करत निरुद्देश भटकणारी मुले इथे आढळतात. मोठा, धाकटा भाऊ, दादा, ताई, आई, वडील आणि आजी-आजोबा यांना सहज सामावून घेणारे कुटुंब या कथांमध्ये दिसते. एखादी मैत्रीण श्रीमंतीचा तोरा मिरवते, तर एखादा मित्र गरिबीतही आपला ताठपणा, स्वाभिमान सोडत नाही. आपल्या मोठ्या भावाने लिहिलेल्या पुस्तकाची पहिली प्रत साक्षात पाहावी म्हणून धाकटा त्याच्यासमवेत शाळा बुडवून, भल्या पहाटे उठून, वाट तुडवून दमूनभागून का असेना पण कौतुकाने व उत्साहाने जातो आणि एवढा अट्टहास केल्यावर तो निर्दयी प्रकाशक अण्णाला केवळ दहा प्रती देऊन बोळवण करतो, म्हंटल्यावर निराश होतो. एकूणच साहित्य-व्यवहाराबद्दल त्याचा भ्रमनिरास होतो. (‘लेखकाची गोष्ट’) पारंपरिक भूमिका निष्ठेने वर्षानुवर्षे बिनतक्रार बजावणाऱ्या गृहिणी या विश्वात पदोपदी आढळतात. नवरे बाहेर शेती अथवा अन्य काही उद्योग करून कमावून आणतात आणि बायका उंबऱ्याआड स्वैपाकपाणी, मुलाबाळांचे, नातवंडांचे संगोपन करतात. शांत, स्वस्थ व गतिमंद असलेले हे सारे जग आता अस्तंगत झाले आहे. आजच्या तरुण आणि प्रौढ, विशी, तिशी वा चाळिशीत असलेल्या पिढीला ते कल्पना करूनच जाणावे लागेल. वरवर सोप्या वाटणाऱ्या परंतु अंतर्यामीच्या तरल आणि गहन अर्थाकडे निर्देश करणाऱ्या या कथा आहेत.
आपल्याला अनेकदा अमुक एक मुक्काम गाठणे, तमुक एक गोष्ट तडफडून मिळवणे, नंतर ती आपल्याकडे धरून ठेवण्यात धन्यता मानणे हे अधिक महत्त्वाचे वाटते. परंतु इप्सित साध्य करण्यापर्यंतची प्रक्रिया, तिच्यातली रोमांचकारकता व थरार अनुभवण्यातली मजा या खटाटोपात केव्हाच निसटून जाते. वस्तुतः बऱ्याच गोष्टी अचंब्याच्या आणि अद्भुतरम्य होतात त्या या प्रक्रियेमुळे! ‘आडव्या बोळा’तील रहस्यमय विश्व निळूला वारंवार खुणावत राहते. त्याला त्याविषयी नको इतके, उतू जाणारे कुतूहल आहेच; परंतु कसेही करून ते शमवण्यासाठी तो जे नाना उद्योग करतो, त्यातून कथा उत्कंठावर्धक होते आणि वाचकाला धरून ठेवते. एकदा बाबाजानच्या सुस्वर गाण्याची मोहिनी पडल्यावर, शास्त्रीबुवांची, शाळेतल्या मास्तरांची आणि सवंगड्यांची नजर चुकवून नरहरीची पावले पुनःपुन्हा तिच्या घराकडे वळतात. ‘तुला आवडतं माझं भजन?’ हा वरपांगी क्षुल्लक वाटणारा तिचा प्रश्न, तो मधुर आवाज म्हणजे टोळभैरवांपासून वाचवलेले त्याचे ‘गुप्तधन’ होते. सखा कलालांची ‘हिरवी काच’ ही संपूर्ण कथा केवळ विहिरीच्या काठावर घडते. श्यामला पोहोणे शिकवत असताना त्याच्या बेरकी बापाला तिसऱ्याच माणसाची अंगठी गवसते. तेव्हा ‘साडासाती’ अकस्मात संपूनच जाते. ‘हिरव्या काचे’तून दिसणारा हा ऊन-सावलीचा खेळ वाचकाला चकित करून टाकतो. ‘पतंग’ (ले. मिलिंद बोकील) या कथेतील पतंग बदविण्याचा बारीकसारीक तपशील तेवढ्या कृतीपुरता मर्यादित राहत नाही. जगण्यातील जमलेल्या-हुकलेल्या अनेकानेक गोष्टींवर, सुख- दुःखांवर - अगदी छोट्याच्या ताईच्या लग्नामुळे खट्टू झालेल्या मोठ्याच्या मनःस्थितीवरही त्यातून प्रकाश पडतो.
...........................................
अचंब्याच्या गोष्टी
संपादन : सुबोध जावडेकर / मधुकर धर्मापुरीकर मुखपृष्ठ : रविमुकुल
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
पृष्ठं : २१६, किंमत : २५० रु.
वाचकाला त्याच्या समृद्ध बालपणात डोकावण्याची, रमण्याची संधी देणारा, पुन्हा एकवार ते निखळ आनंददायी दिवस उजळून टाकणारा आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा कसोशीने शोध घेऊ पाहाणारा चौदा कथांचा ‘अचंब्याच्या गोष्टी’ हा संग्रह आशय-विषयाच्या वेगळेपणामुळे लक्षणीय ठरणारा आहे. कोणताही निश्चित, ठाम अन्वयार्थ लावता न येणाऱ्या अनुभवांच्या धूसर प्रदेशात वावरणाऱ्या, एका बाजूने अल्लड, निष्पाप तर दुसऱ्या बाजूने बेरकी, चलाख असलेल्या साधारणतः सहा ते बारा वयोगटातल्या मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या एकूण चौदा मातब्बर साहित्यिकांच्या कथांचा हा संग्रह आहे.
अडनिड्या वयातल्या मुलांच्या दृष्टिबिंदूतून या अफाट पसरलेल्या विश्वातील घडामोडींकडे पाहिले तर नानाविध, चित्तचक्षुचमत्कारिक आणि सुरस म्हणता येतील अशा घटनांची संगती कशी लागते, किंबहुना तशी ती लावता येते का, हे आजमावून बघण्याचा प्रयत्न येथील सर्व कथानायकांनी व त्यांना जन्म देणाऱ्या त्यांच्या प्रतिभाशाली निर्मात्यांनी केला आहे. त्यात, सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर या दोन सर्जनशील, समकालीन, गुणवान लेखकांनी प्रस्तुत संग्रहाचे नेटके संपादन केलेले आहे. ते स्वतः या खेळात मनसोक्त गुंतलेले भिडू असल्याने, मिलिंद बोकील यांच्या शब्दांत सांगायचे तर येथे समाविष्ट केलेली प्रत्येक कथा त्यांनी ‘आतून पाहिलेली’ आहे. व्यावहारिक अनुभवाचे कलानुभवात झालेले रूपांतर समजावून घेण्यात दोन्ही संपादकांना मनापासून रस आणि गती आहे. याचा प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून येतो.
अशा प्रकारच्या कोणत्याही संग्रहाचे मोल हे जितके संपादनकौशल्यावर अवलंबून असते, तितकेच ते त्यामध्ये अंतर्भाव केलेल्या साहित्याच्या कलात्मकतेवरही ठरते. इथे मुळातच लेखक म्हणून त्या त्या कालखंडात मोठा नावलौकिक प्राप्त केलेल्यांच्या कथा आहेत. त्या तेव्हा आणि आतापर्यंत तरी संस्मरणीय ठरलेल्या आहेत. उदा. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘सनई’, विद्याधर पुंडलीकांची ‘आजी शरण येते’ आणि शरच्चंद्र चिरमुले यांची ‘गुप्तधन’ इ. परंतु यासंदर्भात विशेष निर्देश करावासा वाटतो तो यशवंत कर्णिक (‘डोलकाठी’), विलास मोहिते (‘धग’), वामन काळे (‘लेखकाची गोष्ट’) व वामन इंगळे (‘आजोबाचे लग्न’) यांच्यासारख्या काहीशा बाजूला पडलेल्या, दुर्लक्षित राहिलेल्या कथाकारांच्या कथांचा. त्यांच्या कसदार कथांकडे संपादकांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. त्यांची दखल घेण्याचे श्रेय या दोघांना अवश्य द्यायला हवे.
प्रथमदर्शनीच ध्यानात येते की बहुतांशी कथांमधील भौगोलिक परिसर ग्रामीण वा निमशहरी आहे, तो महानगरातला नाही. चाळीत, बैठ्या कौलारू घरात व एकत्र कुटुंबात कथानक घडते. खळं, गोठे, उखळ, सारवलेली जमीन, तुळशीवृंदावन, पाणंद, द्रोणी, रहाट, विहीर, संस्कृत श्लोकांची संथा देणारे शास्त्रीबुवा आणि सारवट गाडीत बसून गावाला जाणे हे वातावरण येथे आहे. कथांतर्गत काळ १९७० - पूर्व आहे. गोट्या खेळणारी जत्रेला जाणारी, पतंग उडवण्यात तासन् तास रमून जाणारी आणि मुख्य म्हणजे गावभर उनाडक्या करत निरुद्देश भटकणारी मुले इथे आढळतात. मोठा, धाकटा भाऊ, दादा, ताई, आई, वडील आणि आजी-आजोबा यांना सहज सामावून घेणारे कुटुंब या कथांमध्ये दिसते. एखादी मैत्रीण श्रीमंतीचा तोरा मिरवते, तर एखादा मित्र गरिबीतही आपला ताठपणा, स्वाभिमान सोडत नाही. आपल्या मोठ्या भावाने लिहिलेल्या पुस्तकाची पहिली प्रत साक्षात पाहावी म्हणून धाकटा त्याच्यासमवेत शाळा बुडवून, भल्या पहाटे उठून, वाट तुडवून दमूनभागून का असेना पण कौतुकाने व उत्साहाने जातो आणि एवढा अट्टहास केल्यावर तो निर्दयी प्रकाशक अण्णाला केवळ दहा प्रती देऊन बोळवण करतो, म्हंटल्यावर निराश होतो. एकूणच साहित्य-व्यवहाराबद्दल त्याचा भ्रमनिरास होतो. (‘लेखकाची गोष्ट’) पारंपरिक भूमिका निष्ठेने वर्षानुवर्षे बिनतक्रार बजावणाऱ्या गृहिणी या विश्वात पदोपदी आढळतात. नवरे बाहेर शेती अथवा अन्य काही उद्योग करून कमावून आणतात आणि बायका उंबऱ्याआड स्वैपाकपाणी, मुलाबाळांचे, नातवंडांचे संगोपन करतात. शांत, स्वस्थ व गतिमंद असलेले हे सारे जग आता अस्तंगत झाले आहे. आजच्या तरुण आणि प्रौढ, विशी, तिशी वा चाळिशीत असलेल्या पिढीला ते कल्पना करूनच जाणावे लागेल. वरवर सोप्या वाटणाऱ्या परंतु अंतर्यामीच्या तरल आणि गहन अर्थाकडे निर्देश करणाऱ्या या कथा आहेत.
आपल्याला अनेकदा अमुक एक मुक्काम गाठणे, तमुक एक गोष्ट तडफडून मिळवणे, नंतर ती आपल्याकडे धरून ठेवण्यात धन्यता मानणे हे अधिक महत्त्वाचे वाटते. परंतु इप्सित साध्य करण्यापर्यंतची प्रक्रिया, तिच्यातली रोमांचकारकता व थरार अनुभवण्यातली मजा या खटाटोपात केव्हाच निसटून जाते. वस्तुतः बऱ्याच गोष्टी अचंब्याच्या आणि अद्भुतरम्य होतात त्या या प्रक्रियेमुळे! ‘आडव्या बोळा’तील रहस्यमय विश्व निळूला वारंवार खुणावत राहते. त्याला त्याविषयी नको इतके, उतू जाणारे कुतूहल आहेच; परंतु कसेही करून ते शमवण्यासाठी तो जे नाना उद्योग करतो, त्यातून कथा उत्कंठावर्धक होते आणि वाचकाला धरून ठेवते. एकदा बाबाजानच्या सुस्वर गाण्याची मोहिनी पडल्यावर, शास्त्रीबुवांची, शाळेतल्या मास्तरांची आणि सवंगड्यांची नजर चुकवून नरहरीची पावले पुनःपुन्हा तिच्या घराकडे वळतात. ‘तुला आवडतं माझं भजन?’ हा वरपांगी क्षुल्लक वाटणारा तिचा प्रश्न, तो मधुर आवाज म्हणजे टोळभैरवांपासून वाचवलेले त्याचे ‘गुप्तधन’ होते. सखा कलालांची ‘हिरवी काच’ ही संपूर्ण कथा केवळ विहिरीच्या काठावर घडते. श्यामला पोहोणे शिकवत असताना त्याच्या बेरकी बापाला तिसऱ्याच माणसाची अंगठी गवसते. तेव्हा ‘साडासाती’ अकस्मात संपूनच जाते. ‘हिरव्या काचे’तून दिसणारा हा ऊन-सावलीचा खेळ वाचकाला चकित करून टाकतो. ‘पतंग’ (ले. मिलिंद बोकील) या कथेतील पतंग बदविण्याचा बारीकसारीक तपशील तेवढ्या कृतीपुरता मर्यादित राहत नाही. जगण्यातील जमलेल्या-हुकलेल्या अनेकानेक गोष्टींवर, सुख- दुःखांवर - अगदी छोट्याच्या ताईच्या लग्नामुळे खट्टू झालेल्या मोठ्याच्या मनःस्थितीवरही त्यातून प्रकाश पडतो.
...........................................
अचंब्याच्या गोष्टी
संपादन : सुबोध जावडेकर / मधुकर धर्मापुरीकर मुखपृष्ठ : रविमुकुल
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
पृष्ठं : २१६, किंमत : २५० रु.