'खिरमट' आणि 'व्हय महाराजा!'
...
शिवाजी गावडे
...
मुंबई आकाशवाणीत सरकारी माध्यमात सहायक संचालक या पदावर सेवेत असलेले डॉ. महेश केळुसकर हे एक अजब रसायन आहे. 'कोकण मराठी साहित्य परिषदे'ची केंद्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळतानाही त्यांचे ६ कवितासंग्रह, २ कादंबऱ्या, १ कथासंग्रह, ६ ललित व विनोदी गद्य, ३ बालवाङ्मयीन पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच 'नागरिक' या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लेखन त्यांनी केले आहे. नुकतीच त्यांची 'खिरमट' आणि 'व्हय महाराजा!' अशी ललित गद्याची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
'खिरमट' या ललित गद्यात ६० ललित लेख असून त्या त्यांच्या बालपणींच्या आठवणींची साठवण असल्याचे जाणवते. त्यातल्या 'खोल जमिनीत झरे', 'नशिबान घोव खावचो', मराठी मराठी असा घोष कंठी, वर्गमित्र, उन्हाची कवटी, पावसाळी हवा, काला मिठ्ठा, आषाढातील आठवणी, मास्तरांसोबत, कशासाठी पोटासाठी, वाघोबा चष्माचोर, सु-रक्षाबंधन, स्टार राहुल आणि खिरमट या शीर्षांतून आपल्याला बऱ्याच विनोदाची डूब असलेल्या आठवणींची जाणीव होते.
खिरमट म्हणजे कैरी, गूळ, मीठ, मसाला आणि तेल यांचे मिश्रण असा त्याचा अर्थ आहे. त्याच अर्थाने 'खिरमट' या पुस्तकात अनेक भावणारे ललितबद्ध विषय आहेत. त्यात जुन्या आठवणी, कोकणातले बालपण, भाषा, सृष्टी, समाज, सण, भेटलेले वर्गमित्र, गंपटराव, मास्तर, बाबा-आबा-दादा, स्टार राहुल हायकूवाले कवी आणि अवती-भवतीचे कडूगोड जगणे यांवरील वैविध्यपूर्ण मनोरंजक लेख आहेत.
यातील बहुतेक लेखांचा शेवट चारोळीने झालेला असून काहींच्या मध्ये कविता विखुरलेल्या आहेत. मालवणी माणसाच्या स्वभावातील मिश्कील कंगोरे यातून जाणवतात. विशिष्ट शब्दांमध्ये ललित लिहिण्याची हातोटी यात असूनही वाचकांना खिळवून ठेवते. काही विषय तात्कालिक असले तरी त्याला ताजेपणाचा स्पर्श आहे. तसेच त्याला कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय डूब असल्याने ते आजही वाचकांना भावतील एवढे सक्षम आहेत.
तर 'व्हय महाराजा!' हे मालवणी भाषेची खुमारी असलेले मालवणी गजालींचे ललित गद्य पुस्तक आहे. 'बारा-पाचाचा गारणा' या प्रदीर्घ मालवणी गाऱ्हाण्याने याची सुरुवात झाली असून त्यात १५ लेखांचा समावेश आहे. त्यात गतकाळात रममाण होणाऱ्या आठवणी, गावातले दिवस, पावसातल्या गजाली, चाकरमान्यांच्या कैफियती, फोंड्याच्या शाळेतले उपदव्याप, त्यांच्या 'झिनझिनाट' या प्रसिद्ध कवितेतल्या अफेअरची बित्तंबातमी हे लालित्यपूर्ण लेखन आहे. तसेच त्यांनी कोकणची रंगभूमी आणि आधुनिकता, मालवणीचा झेंडा फडकविणारे नाटक 'वस्त्रहरण', लोककला वाचविण्यासाठी कोकणात झालेली धडपड यांवर पोटतिडकीने लिहिले आहे. मालवणी मुलखातील साक्षात्कारी आणि विलोभनीय निसर्ग, प्रेम करणारी पण मिश्कील माणसे, कोर्टकचेऱ्यांत व्यस्त असलेली भावबंदकी, तिरकस पण जिगरबाजपणे वागणारे गाववाले आणि शहरात राहूनही गावची चिंता करणारे चाकरमानी यांना खास शैलीत केळुसकर यांनी टिपले आहे. ते वाचताना मन शहारून जाते.
'कोंड' लेखातल्या माशांच्या कालवणाचे वर्णन वाचताना तो गतकालीन गावातला माशांचा सुगंध आठवतो. 'मारुतीवाडीची जुनी गाडी' यात देव त्यांना काय पाहिजे असे विचारतो तर ते कोकण हा स्वर्ग असल्याने पुन्हा कोकणातच जन्म मागतात आणि कोकणातल्या सणासुदींच्या कडूगोड आठवणी सांगतात.
प्रादेशिक साहित्याचा विचार करताना 'व्हय महाराजा' हा मालवणी भाषेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सर्जनशीलतेने तिरकस शैलीत लिहिलेल्या या मालवणी मुलखातल्या गजाली आणि पोटतिडकीने लिहिलेले कोकणची लोकरंगभूमी, लोककला यावरील लेख; तसेच सूक्ष्म नजाकतीने टिपलेल्या 'वस्त्रहरण' नाटकावरील लेख डॉ. महेश केळुसकर यांच्या 'व्हय महाराजा!'मधून आपण वाचायलाच हवेयत!
...
खिरमट आणि व्हय महाराजा
दोन्हीचे लेखक : डॉ. महेश केळुसकर
प्रकाशक : अनुक्रमे अनघा प्रकाशन, नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठं : अनुक्रमे १३५, १२०
किंमत : अनुक्रमे १७० रु., १३५ रु.