यंत्रमानवाला अॅग्रीकल्चरमधील रोबोट, म्हणजे 'अॅगबोट' म्हणून संबोधण्यात येते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अॅगबोट कोणत्या तणांचा नायनाट करायचा आहे, ते ओळखू शकतो. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याने अॅगबोटमार्फत तणनाशकाचे काम करवून घेतले. यामुळे त्यांची वार्षिक बचत १,३०० कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी झाली. यामुळे रोजगार कमी झाले नाहीत.
डॉ. अनिल लचके
शंभर वर्षांपूर्वी रोबो(ट) शब्द जगाला परिचित नव्हता. या शब्दाचा उल्लेख १९२०मध्ये 'झेक' भाषेतील 'रॉसम्स युनिव्हर्सल रोबो(ट)' नामक एका नाटकात प्रथम आला. रोबोचा अर्थ आहे, वेठीस धरलेला कामगार किंवा वेठबिगार. विविध कामे करणाऱ्या यंत्रमानवाची, म्हणजे रोबोची निर्मिती भावी काळात होईल, याची कल्पना ज्येष्ठ विज्ञान लेखक आयझॅक अॅसिमोव्ह यांना होती. तंत्रज्ञानाच्या या अभिनव शाखेला १९४१मध्ये आयझॅक यांनी रोबोटिक्स हा नवीन शब्द वापरला होता. रोबो शब्द जनमानसात येऊन या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.
यंत्रमानव म्हणजे दिलेली कार्यप्रणाली आत्मसात करून, त्यानुसार कार्य करणारे विद्युत साधन. कार्यप्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर. ते अत्यंत कुशलपणे न थकता, विनातक्रार विविध कामे मुकाट्याने पार पाडीत असतात. त्यांना न कंटाळता, तेच ते काम सतत करावे लागते. वेगळा पगारदेखील द्यावा लागत नाही. घरातील कानाकोपऱ्यात जाऊन केर काढणारी उपकरणे आता परदेशात मिळू लागली आहे. जपान, जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशात रोबोमार्फत मोटारींची जोडणी-बांधणी केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात यंत्रमानवाने शस्त्रक्रिया करायला सुरवात केली आहे. कम्प्युटर किंवा टीव्हीसाठी जे मायक्रोप्रोसेसर गरजेचे असतात, त्याची निर्मिती यंत्रमानव अचूकतेने मोठ्या प्रमाणात करतात. औद्योगिक क्षेत्रात सध्या हजारो यंत्रमानव अनेक प्रकारची कामे सहजतेने पार पाडत आहेत. यंत्रमानवाला यांत्रिक हात लावण्यात आले आहेत. चंद्रावर प्रत्यक्ष व्यक्ती पाठवण्याऐवजी, रोबो पाठवून त्याच्यामार्फत प्रयोग करवून घेणे जास्त सोयीचे आणि स्वस्त देखील पडेल; कारण रोबोला ऑक्सिजन, पाणी आणि भोजन द्यावे लागत नाही. उंच इमारतीची आग शमवायला पाठविता येते किंवा युद्धात अतिधोक्याच्या ठिकाणी यंत्रमानव पाठवून कामगिरी फत्ते करता येते. यंत्रमानव खोल महासागरातील गूढरम्य गोष्टींचा मागोवा घेऊ शकतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून, यंत्रमानवाकडून अवघड कामे करवून घेता येतात. एखाद्या इमारतीमध्ये जर दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवला असेल, तर यंत्रमानव त्याचा शोध घेऊ शकतो. एवढेच नव्हे, तर तो बॉम्ब निकामी करून सहीसलामत बाहेर पडू शकतो. बुद्धिबळाच्या खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकणारी काही सॉफ्टवेअर तयार झाली आहेत. ड्रायव्हर विना चालणाऱ्या मोटारी पळू लागल्या आहेत. बरीच यांत्रिक कामे यंत्रमानव करत असला, तरी काही कामे मात्र यंत्रमानवाला जमत नाहीत. रोबोला नैसर्गिक भाव-भावनांचा अभाव असतो. तो हसत नाही, रडत नाही. छोट्या बालकाला प्रेमाने खेळविण्यासाठी खरा माणूसच हवा. यंत्रमानवाला सॉफ्टवेअर किंवा कोणी तरी सूचना देणे गरजेचे असते. वीज मिळाल्याशिवाय तो कार्य करू शकत नाही. त्याच्याकडे प्रसंगावधान असेलच असेही नाही. साहजिकच अनेक कामे खऱ्या माणसाकडूनच करवून घ्यावी लागतात; मात्र वेळ वाचविण्यासाठी आपण रोबोची मदत घ्यायला हरकत नाही.
आपल्या देशातील विविध भागात कुठे पारंपरिक, तर कुठे आधुनिक पद्धतींचा वापर करून शेती केली जाते. जगात आता कृषी उद्योगाला हायटेकचे स्वरूप येत आहे. नानाविध व्यावसायिकांना या क्षेत्रात भरीव कार्य करता येईल; कारण नांगरणी, पेरणी, तोडणी, मळणी, पाखडणी अशा अनेक टप्प्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होण्यासारखा आहे. यांत्रिक शेतीसाठी आता बराच वाव मिळत आहे. युनोच्या अहवालानुसार जगाची लोकसंख्या पुढील ३० वर्षांत ७३० कोटींवरून ९७० कोटींवर जाईल. सर्वांना पुरेसे खाद्यान्न मिळणे आव्हानात्मक आहे. कृषीक्षेत्रातील उत्पादकता वाढवणे अटळ आहे. कीड वाढू लागली, तर ऐनवेळी कुशल शेतमजूर मिळतीलच याची खात्री नसते. यासाठी बळीराजाचा साहाय्यक म्हणून यंत्रमानव मोलाची कामगिरी करतील, अशी चिन्ह आहेत. काही देशांमधील शेतांमध्ये यंत्रमानवाने पदार्पण केलेले आहे.
बळीराजाचे कष्ट, मेहनत कमी होऊन उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा व्हावी, म्हणून काही आधुनिक स्वयंचलित यंत्रे सज्ज झाली आहेत. येथे रोबोटिक्स विषयाला महत्त्व प्राप्त होणार असून, तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय झाला आहे. कडक ऊन असो, पाऊस असो, यंत्रमानव शेतात काम करू शकतो. किमान जागेत जास्तीत जास्त बियांची पेरणी होऊ शकेल. एवढेच नव्हे, तर यंत्रमानव प्रत्येक बी अशा जागी पेरेल, की तिथे सूर्यप्रकाश, वाफसा आणि पाणी उपलब्ध असेल. अतिलाल किरणांना (इन्फ्रा रेडला) संवेदनक्षम असणारी यंत्रणा यंत्रमानवाला जोडलेली असेल. किती बिया कुठे पेरल्या, याची नोंद तो करेल. तांत्रिक भाषेत याला सीड मॅपिंग म्हणतात. कीडनाशकाची फवारणी करताना, त्याला रसायनांचा त्रास होत नाही. विंचू, सर्प, कीटक दंशाची भीती नाही. अचानक बिबट्या शेतात घुसला, तरी तो भिणार नाही. तो वजनाला हलका असतो; त्यामुळे वापरायला सुलभ आहे. ड्रोन हे मानवविरहित कमी उंचीवरून उडणारे छोटे यान आहे. ते कीडनाशकाची फवारणी अल्पवेळात करू शकते. पिकांना पाणी कमी पडल्यास, पाण्याचा शिडकावा करून पिके तगवण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. तोडणी करणे, मालाचे वर्गीकरण करणे, पॅकिंग करणे अशा काही कामांसाठी यंत्रमानवाचा उपयोग केला जातो आहे. पिकायला आलेल्या फळांची रंगीत चित्रे दाखवून, फळे उतरविण्याची कामगिरी यंत्रमानवाला देता येईल. यंत्रमानवाला संत्री, लिंब, द्राक्ष आदी फळे अलगदपणे काढता यावीत, म्हणून इंजिनीअर मंडळींनी हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर केला आहे. त्याच प्रमाणे पिकांना घातक असे तण उपटण्यासाठी यंत्रमानव उपयुक्त ठरतील. चालकाविना ट्रॅक्टर शेतात कामे करतील.
यंत्रमानवाला अॅग्रीकल्चरमधील रोबोट, म्हणजे 'अॅगबोट' म्हणून संबोधण्यात येते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अॅगबोट कोणत्या तणांचा नायनाट करायचा आहे, ते ओळखू शकतो. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याने अॅगबोटमार्फत तणनाशकाचे काम करवून घेतले. यामुळे त्यांची वार्षिक बचत १,३०० कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी झाली. यामुळे रोजगार कमी झाले नाहीत. नवीन कंपनीची उभारणी झाली. गुंतवणूकदार पुढे आले. शेतीचे काम सुलभ झाले. फक्त कामाचे स्वरूप बदलले. सर्वत्र माणूस हा लागतोच! कृषिक्षेत्रातील यंत्रमानवाला वीज किंवा डिझेलची गरज पडू शकते. ती अडचण दूर करण्यासाठी पुनर्विद्युत भारित (रिचार्जेबल) बॅटरीची सोय आहे. आता तर सौरऊर्जेवर वीजनिर्मिती करणारे पॅनल यंत्रमानवावर बसवले आहेत. यामुळे प्रदूषणाची समस्याही दूर झाली आहे. यंत्रमानवाकडून ग्रीन हाउसमध्ये, सार्वजनिक बागेत किंवा जंगलातदेखील कामे करून घेता येतात. यामुळे रोजगार कमी होण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही; कारण यंत्रमानवांची विक्री, दुरुस्ती, देखरेख, सॉफ्टवेअर, हार्डवेअर अशा अनेक कामांसाठी माणसे लागतील. शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळच्या वेळी सुलभतेने पार पाडता येतील. कदाचित आगामी काळात (हळूहळू का होईना) अॅगबोट बळीराजाचा निष्ठावंत सेवक म्हणून मान्यता प्राप्त ठरेल!