सुरेश सावंत
'शाळा आणि तुरूंग या जगातील दोनच अशा जागा आहेत की जिथे कुणीच स्वतःहून जात नाही. तेथे दाखल करावे लागते,' अशी आजच्या शिक्षणव्यवस्थेवर बेधडक टीका करणारे जे. कृष्णमूर्ती हे जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अच्युतराव पटर्वधन यांच्यापासून जगातील अेनक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि कलावंत कृष्णमूर्ती यांच्या विचारांनी अतिशय प्रभावित झाले होते. शिक्षणाची जगावेगळी मांडणी करून तशा शाळा चालविणारे कृष्णमूर्ती आमच्या शिक्षकांना माहीत नाहीत, याचे कारण इतर शिक्षणशास्त्रज्ञांप्रमाणे डीएड्., बी.एड्.च्या अभ्यासक्रमात कृष्णमूर्ती यांचे विचार आणि कार्य अद्याप समाविष्ट झालेले नाही. अशा अज्ञात कृष्णमूर्ती यांचे जीवनकार्य आणि शैक्षणिक विचार हेरंब कुलकर्णी यांनी 'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स' या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी वाचकांसमोर आणले आहेत.
पहिल्याच प्रकरणात व्यक्ती आणि तत्त्वज्ञ म्हणून जे. कृष्णमूर्ती यांचा परिचय करून दिला आहे. आधुनिक शिक्षणव्यवस्थेसंदर्भात कृष्णमूर्ती म्हणतात की, मला शिक्षणाचे यश साक्षरतेचे प्रमाण किती वाढले, यावर मोजावेसे वाटत नाही. समाजाच्या संवेदनशीलतेची पातळी किती वाढली यावर ते मोजायला हवे.
केवळ माहितीचा संचय म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षणातून एक विश्लेषक मन तयार व्हावे ही जे. कृष्णमूर्ती यांची अपेक्षा होती. प्रचलित शिक्षणपद्धतीत शिक्षणाचा केवळ एकांगी व एककल्ली विचार केल्यामुळे एखादे विशिष्ट तंत्र हस्तगत करणे, एवढाच अर्थ शिक्षणला उरला आहे. व्यक्तीच्या मनात सुसंवाद निर्माण करता येईल, ही आजच्या शिक्षणापुढील मुख्य समस्या आहे. कृष्णमूर्ती यांच्या मते शिक्षकांनी विषय शिकविताना मुलाच्या मनात बदल घडवून आणावयाचा आहे. मुलांना विलक्षण चिकित्सक वृत्तीचे बनवायचे आहे. आपल्या अंतरंगातील सर्व कुरूपता समजून घेणे. हाही शिक्षणाचा उद्देश आहे.
कृष्णमूर्ती शाळांमध्ये शिक्षक विविध विषयांचे अध्यापन कसे करतात याविषयी लेखकाने एका स्वतंत्र प्रकरणात आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. लेखकाला या शाळांमध्ये अत्यंत समर्पित भावनेने अध्यापन करणारे अनेक शिक्षक भेटले. त्यापैकी कित्येक विद्यापीठात अध्यापनाची पात्रता धारण करणारे, विविध क्षेत्रांतील मोठया पगाराच्या नोकऱ्या सोडून आलेले आणि उच्चविद्याविभू्षित व समर्पित वृत्तीने काम करणारे शिक्षक होते. या शिक्षकांच्या अध्यापनपद्धतीचा कोणताही साचा नाही. या शाळा विशिष्ट असा पॅटर्न निर्माण करीत नाहीत. भाषेच्या अध्यापनात भाषिक खेळ खेळले जातात. विद्यार्थ्याना दैनंदिनी लिहायला शिकविले जाते. आठवड्यातून एकतरी चित्रपट दाखविला जातो, अध्यापन करताना शिक्षक पाठ्यपुस्तकात बघून शिकवत नाहीत. परिसर अभ्यास या विषयाच्या अध्यापनात 'पर्यावरण' या विषयावरील विविध प्रकल्प दिले जातात. प्रकल्प तयार करण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली जाते. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, यासाठी सतत वर्गाबाहेर नेले जाते. आपल्या कुटुंबाचा वृक्ष काढण्यासाठी आणि आपल्या शहराचा नकाशा तयार करण्यासाठी मदत केली जाते. विद्यार्थ्यांना स्वतःचे आत्मचरित्र लिहायला सुचविले जाते. पाठ्यपुस्तकाबाहेरच्या अनुभवावर चर्चा होते. इतिहासाकडे ते केवळ सत्यशोधनाचे साधन म्हणून बघतात. मानवतेची कथा म्हणून बघतात. मुलांना केवळ माहिती देण्यापेक्षा मुलांमधील उत्सुकता जागविण्यासाठी महत्त्व दिले जाते. कला, कार्यानुभव, संगीत या विषयांना आपल्या प्रचलित शिक्षणपद्धतीत नगण्य स्थान आहे. याउलट कृष्णमूर्ती शाळांमध्ये कला या विषयाला प्राधान्यक्रम आहे.
तुलनात्मक विचार केला असता रवींद्रनाथ टागोर आणि जे. कृष्णमूर्ती यांच्या शैक्षणिक विचारांमध्ये आणि शाळांमध्ये एक आंतरिक नाते जाणवते. जीवनापासून आणि निसर्गापासून शिकण्याची दोघांचीही पद्धत एकच आहे. विद्यर्थ्यांवर नियमांची सक्ती करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अंतर्मुख व्हायला येथे प्रोत्साहन दिले जाते. मूल केवळ अभ्यासात अडकून पडायला नको. त्याच्या इतर क्षमताही विकसित व्हायला हव्यात. हा प्रयत्न या दोन्ही ठिकाणी दिसतो.
लेखक हेरंब कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या अखेरीस कृष्णमूर्ती शाळांच्या चार-पाच मर्यादा दाखवून दिल्या आहेत. या संदर्भातील लेखकाचे विवेचन फारच स्पष्ट आहे. कृष्णमूर्तींना ज्या प्रकारचा उत्स्फूर्त, स्वतंत्र मनाचा, संवेदनशील शिक्षक अभिप्रेत असतो, तसा शिक्षक जेथे असेल तेथे कृष्णमूर्ती शाळा असेल; आणि कदाचित कृष्णमूर्ती शाळेत तसा शिक्षक नसेल तर तिथेही कृष्णमूर्ती शाळा नसेल. 'माझ्या वर्गात मी माझे व्यक्तिमत्त्व अशा प्रकारचे कोमल, संवेदनशील करून कृष्णमूर्ती स्कूल प्रत्यक्षात आणू शकेन का? असा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने आपल्या मनाला विचारून बघावा. 'होय' असे उत्तर आले तर आनंदच आहे!
शेवटी लेखकाने, कृष्णमूर्तींना अपेक्षित असलेल्या शाळा सर्वत्र सुरू करणे शक्य नसेल हेही मान्य केले आहे. कारण भारतात आणि जगात मिळून अशा केवळ आठच शाळा आहेत. अशा शाळा विकसित करणे कितीही आदर्श असले, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे हे व्यवहार्य नाही, हे लक्षात घेऊन कृष्णमूर्ती शाळांकडून आपल्या शाळांनी काय घ्यावे, याकडेही समारोपाच्या प्रकरणात लेखकाने लक्ष वेधले आहे.
'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स'
लेखक : हेरंब कुलकर्णी,
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन पुणे,
पृष्ठं : २१४
किंमत : २२० रू.
'शाळा आणि तुरूंग या जगातील दोनच अशा जागा आहेत की जिथे कुणीच स्वतःहून जात नाही. तेथे दाखल करावे लागते,' अशी आजच्या शिक्षणव्यवस्थेवर बेधडक टीका करणारे जे. कृष्णमूर्ती हे जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अच्युतराव पटर्वधन यांच्यापासून जगातील अेनक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि कलावंत कृष्णमूर्ती यांच्या विचारांनी अतिशय प्रभावित झाले होते. शिक्षणाची जगावेगळी मांडणी करून तशा शाळा चालविणारे कृष्णमूर्ती आमच्या शिक्षकांना माहीत नाहीत, याचे कारण इतर शिक्षणशास्त्रज्ञांप्रमाणे डीएड्., बी.एड्.च्या अभ्यासक्रमात कृष्णमूर्ती यांचे विचार आणि कार्य अद्याप समाविष्ट झालेले नाही. अशा अज्ञात कृष्णमूर्ती यांचे जीवनकार्य आणि शैक्षणिक विचार हेरंब कुलकर्णी यांनी 'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स' या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी वाचकांसमोर आणले आहेत.
पहिल्याच प्रकरणात व्यक्ती आणि तत्त्वज्ञ म्हणून जे. कृष्णमूर्ती यांचा परिचय करून दिला आहे. आधुनिक शिक्षणव्यवस्थेसंदर्भात कृष्णमूर्ती म्हणतात की, मला शिक्षणाचे यश साक्षरतेचे प्रमाण किती वाढले, यावर मोजावेसे वाटत नाही. समाजाच्या संवेदनशीलतेची पातळी किती वाढली यावर ते मोजायला हवे.
केवळ माहितीचा संचय म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षणातून एक विश्लेषक मन तयार व्हावे ही जे. कृष्णमूर्ती यांची अपेक्षा होती. प्रचलित शिक्षणपद्धतीत शिक्षणाचा केवळ एकांगी व एककल्ली विचार केल्यामुळे एखादे विशिष्ट तंत्र हस्तगत करणे, एवढाच अर्थ शिक्षणला उरला आहे. व्यक्तीच्या मनात सुसंवाद निर्माण करता येईल, ही आजच्या शिक्षणापुढील मुख्य समस्या आहे. कृष्णमूर्ती यांच्या मते शिक्षकांनी विषय शिकविताना मुलाच्या मनात बदल घडवून आणावयाचा आहे. मुलांना विलक्षण चिकित्सक वृत्तीचे बनवायचे आहे. आपल्या अंतरंगातील सर्व कुरूपता समजून घेणे. हाही शिक्षणाचा उद्देश आहे.
कृष्णमूर्ती शाळांमध्ये शिक्षक विविध विषयांचे अध्यापन कसे करतात याविषयी लेखकाने एका स्वतंत्र प्रकरणात आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. लेखकाला या शाळांमध्ये अत्यंत समर्पित भावनेने अध्यापन करणारे अनेक शिक्षक भेटले. त्यापैकी कित्येक विद्यापीठात अध्यापनाची पात्रता धारण करणारे, विविध क्षेत्रांतील मोठया पगाराच्या नोकऱ्या सोडून आलेले आणि उच्चविद्याविभू्षित व समर्पित वृत्तीने काम करणारे शिक्षक होते. या शिक्षकांच्या अध्यापनपद्धतीचा कोणताही साचा नाही. या शाळा विशिष्ट असा पॅटर्न निर्माण करीत नाहीत. भाषेच्या अध्यापनात भाषिक खेळ खेळले जातात. विद्यार्थ्याना दैनंदिनी लिहायला शिकविले जाते. आठवड्यातून एकतरी चित्रपट दाखविला जातो, अध्यापन करताना शिक्षक पाठ्यपुस्तकात बघून शिकवत नाहीत. परिसर अभ्यास या विषयाच्या अध्यापनात 'पर्यावरण' या विषयावरील विविध प्रकल्प दिले जातात. प्रकल्प तयार करण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली जाते. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, यासाठी सतत वर्गाबाहेर नेले जाते. आपल्या कुटुंबाचा वृक्ष काढण्यासाठी आणि आपल्या शहराचा नकाशा तयार करण्यासाठी मदत केली जाते. विद्यार्थ्यांना स्वतःचे आत्मचरित्र लिहायला सुचविले जाते. पाठ्यपुस्तकाबाहेरच्या अनुभवावर चर्चा होते. इतिहासाकडे ते केवळ सत्यशोधनाचे साधन म्हणून बघतात. मानवतेची कथा म्हणून बघतात. मुलांना केवळ माहिती देण्यापेक्षा मुलांमधील उत्सुकता जागविण्यासाठी महत्त्व दिले जाते. कला, कार्यानुभव, संगीत या विषयांना आपल्या प्रचलित शिक्षणपद्धतीत नगण्य स्थान आहे. याउलट कृष्णमूर्ती शाळांमध्ये कला या विषयाला प्राधान्यक्रम आहे.
तुलनात्मक विचार केला असता रवींद्रनाथ टागोर आणि जे. कृष्णमूर्ती यांच्या शैक्षणिक विचारांमध्ये आणि शाळांमध्ये एक आंतरिक नाते जाणवते. जीवनापासून आणि निसर्गापासून शिकण्याची दोघांचीही पद्धत एकच आहे. विद्यर्थ्यांवर नियमांची सक्ती करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अंतर्मुख व्हायला येथे प्रोत्साहन दिले जाते. मूल केवळ अभ्यासात अडकून पडायला नको. त्याच्या इतर क्षमताही विकसित व्हायला हव्यात. हा प्रयत्न या दोन्ही ठिकाणी दिसतो.
लेखक हेरंब कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या अखेरीस कृष्णमूर्ती शाळांच्या चार-पाच मर्यादा दाखवून दिल्या आहेत. या संदर्भातील लेखकाचे विवेचन फारच स्पष्ट आहे. कृष्णमूर्तींना ज्या प्रकारचा उत्स्फूर्त, स्वतंत्र मनाचा, संवेदनशील शिक्षक अभिप्रेत असतो, तसा शिक्षक जेथे असेल तेथे कृष्णमूर्ती शाळा असेल; आणि कदाचित कृष्णमूर्ती शाळेत तसा शिक्षक नसेल तर तिथेही कृष्णमूर्ती शाळा नसेल. 'माझ्या वर्गात मी माझे व्यक्तिमत्त्व अशा प्रकारचे कोमल, संवेदनशील करून कृष्णमूर्ती स्कूल प्रत्यक्षात आणू शकेन का? असा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने आपल्या मनाला विचारून बघावा. 'होय' असे उत्तर आले तर आनंदच आहे!
शेवटी लेखकाने, कृष्णमूर्तींना अपेक्षित असलेल्या शाळा सर्वत्र सुरू करणे शक्य नसेल हेही मान्य केले आहे. कारण भारतात आणि जगात मिळून अशा केवळ आठच शाळा आहेत. अशा शाळा विकसित करणे कितीही आदर्श असले, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे हे व्यवहार्य नाही, हे लक्षात घेऊन कृष्णमूर्ती शाळांकडून आपल्या शाळांनी काय घ्यावे, याकडेही समारोपाच्या प्रकरणात लेखकाने लक्ष वेधले आहे.
'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स'
लेखक : हेरंब कुलकर्णी,
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन पुणे,
पृष्ठं : २१४
किंमत : २२० रू.