सदानंद मोरे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाची घटना मानली जाते, याबाबत कोणाचे दुमत व्हायचे कारण नाही. मुळात साहित्य संमेलन या प्रकाराकडेच तुच्छतेने पाहणारे विचारवंतही अस्तित्वात आहेत याची मला जाणीव आहे. पण मराठी माणूस 'त्यांची मते त्यांच्याकडे' असे समजूनच व्यवहार करीत राहिला ही वस्तुस्थिती आहे.
साहजिकच साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही साहित्यिकांनाही खुणावणारी बाब राहिली आहे. त्याला माझ्यासारख्या साहित्यिकाने अपवाद असायचे कारण नाही. महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा अभ्यासक या नात्याने साहित्य संमेलन हा माझ्यासाठी पहिल्यापासूनच कुतूहलाचा आणि चिंतनाचा विषय होता. काही साहित्य संमेलनांशी मी वेगवेगळ्या नात्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडला गेलो होतो. इतकेच नव्हे तर मी नुकतीच लिहायला सुरुवात केली होती, तेव्हा माझा मित्र प्रा. दादाभाऊ औटी याने 'तू केव्हातरी संमेलनाध्यक्ष होशील' असे भाकीतही केले होते. दुर्दैवाने दादाभाऊंचे अकाली निधन झाल्यामुळे त्याला स्वत:ला आपले भाकीत खरे ठरल्याचे पाहता आले नाही व ती रुखरुख माझ्याही मनाच्या कोपऱ्यात राहून गेली. तरीही संमेलनाध्यक्ष होण्याची मला तातडी नव्हती व त्यामुळे त्यासाठी इतर अनेक जणांनी केली तशी व्यूहरचना वगैरे करण्याच्या फंदात पडण्याचा प्रश्नच माझ्यासाठी उद्भवत नव्हता. जे घडले ते अनपेक्षितपणे.
८८वे साहित्य संमेलन संत नामदेवरायांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान या गावी घ्यायचे साहित्य महामंडळाने ठरवले, तो त्यांनी 'सरहद' या संस्थेच्या निमंत्रणाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद होता. काही मंडळींनी त्याच्याकडे तुच्छतेने पाहून कुत्सित शेरेबाजी करायलाही मागेपुढे पाहिले नाही. तथापि महामंडळ, पंजाब सरकार आणि स्वत: सरहद त्याकडे अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने पाहत होते, याचा प्रत्यय लवकरच आला.
संमेलन नामदेवरायांच्या भूमीत होणार आहे, हे समजल्यावर माझ्यातला 'वारकरी' जागा झाला व मी उत्स्फूर्तपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माझी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नव्हती, मी साहित्यिकांच्या कोणत्याही गटात मोडणारा नव्हतो. पण तरीही मी निवडून आलो याचे श्रेय मतदारांची प्रगल्भता आणि अर्थातच नामदेवरायांची कृपा यांनाच द्यावे लागते.
असो, यथावकाश निवडणूक झाली, मी जिंकलो. नंतर संमेलनही यशस्वीपणे म्हणजे अगोदर वा नंतर कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित न होता पार पडले. त्या व्यासपीठावरून मला माझी साहित्यविषयक भूमिका मांडता आली आणि मराठी साहित्यातील संतांच्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित करता आले, ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब होती. माझ्या समजुतीप्रमाणे संतसाहित्य आणि अर्वाचीन मराठी साहित्य यांच्यातील अनुबंध इतक्या ठसठशीतपणे यापूर्वी कोणत्या अध्यक्षाने मांडला असल्याचे इतिहास सांगत नाही. बहुतेकांचा कल संतसाहित्याविषयी औपचारिक आदर प्रगट करून त्याला वाङ्मयेतिहासाच्या कप्प्यात बंद करण्याकडेच होता.
साहित्य संमेलनाच्या टीकाकारांचा एक मुद्दा संमेलनाच्या उत्सवीपणाचा व संमेलनाध्यक्षांच्या उत्सवमूर्ती म्हणून तीन दिवस मिरवण्याचा असतो. या अध्यक्षाकडे ना कोणता निर्णय घेण्याची क्षमता असते ना कोणत्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार.
या टीकेला उत्तर देताना मी असे म्हटले होते की अध्यक्षाने उत्सवमूर्ती म्हणून तीन दिवस मिरवून घ्यायचे की त्यानंतर वर्षभर काही काम करायचे, हे त्या त्या अध्यक्षावर अवलंबून आहे. म्हणजे हा निर्णय त्याने घ्यायचा असतो. संमेलन यशस्वीपणे पार पडले आणि अध्यक्षाकडे त्याने फिरावे म्हणून ठराविक रक्कम सुपूर्द केली, म्हणजे महामंडळाचे काम संपले. पुढची जबाबदारी संबंधित अध्यक्षांची असते.
मी असे नम्रपणे नमूद करीत इच्छितो की घुमान संमेलनानंतरच्या वर्षभरात मी ही जबाबदारी यथाशक्ती आणि यशस्वीपणे निभावली. या काळात मी कोठे गेलो, कोणत्या विषयावर बोललो याची नोंदवही मी ठेवली होती. त्यानुसार मी म्हणू शकतो की मला मिळालेल्या बहुतेक सर्व निमंत्रणांचा मी आदर केला. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मी गेलो. माझी वाङ्मयीन भूमिका मी मांडली हे एक प्रकारचे प्रबोधनच होते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.
संमेलनाध्यक्षाने हे करण्याची गरज यासाठी आहे की त्या काळात लोक त्याच्याकडे आदरभावाने पाहत असतात. त्याच्या म्हणण्याला एक प्रकारची authenticity लाभलेली असते. या गोष्टीचा त्याने सदुपयोगच केला पाहिजे. आपली टोकाची मते इतरांवर लादायचा त्याला अधिकार नाही. त्याला जे वाटते ते सांगायचे स्वातंत्र्य त्याला अर्थातच आहे. पण ते सांगताना त्याने हे आपले वैयक्तिक मत असल्याचा खुलासाही केला पाहिजे. आपल्या पदाचा दुरुपयोग करीत इतरांबद्दल भडक विधाने करणे त्याने टाळावे. कारण या पदामुळे त्याला जेवढे व्यासपीठ उपलब्ध होत असते तेवढे इतरांना मिळत नसते.
अध्यक्षपदामुळे - म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही जे मांडता त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाते. तुमच्या मांडणीत काही दम असेल तर तिचा उपयोग करून घ्यावा अशी भावनाही समजूतदार व संवेदनशील लोकांमध्ये आपोआपच तयार होते. मला स्वत:ला याचा अनुभव आल्याशिवाय राहिला नाही. संमेलनाच्या निमित्ताने माझा अभ्यास आणि मते यांचा सर्वदूर प्रसार झाला. जितका कदाचित एरवी झाला नसता, किंवा झालाच असता तर त्याला आणखी वेळ लागला असता.
संमेलनानंतर महाराष्ट्र शासनाने माझी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. शासनाचे भाषाधोरण ठरविण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. मी समाधानाने सांगू इच्छितो की आमच्या समितीचे हे काम इमानेइतबारे पूर्णतेस नेले व त्याचा अहवाल शासनाकडे वेळेत सुपूर्दही केला.
हे काम बघूनच बहुधा भाषा समितीची मुदत संपल्यावर शासनाने माझ्याकडे नुकतेच साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद सोपवले आहे. मला वाटते की या प्रक्रियेत संमेलनाध्यक्ष पदाच्या वर्षभर केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसरे असे की अध्यक्ष म्हणून वावरताना कराव्या लागणाऱ्या वाचन, चिंतन, मनन, संवाद यातून माझे स्वत:चे विचारविश्व अधिक समृद्ध झाले, ज्याचा उपयोग मला पुढील कार्यासाठी झाला व होतो आहे.
या निमित्ताने अनेक नव्या माणसांची ओळख झाली, त्यांचा स्नेह लाभला म्हणजेच लोकसंग्रहात भर पडली. या गोष्टीची बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही. या सर्वांचा मी ऋणी राहीन!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाची घटना मानली जाते, याबाबत कोणाचे दुमत व्हायचे कारण नाही. मुळात साहित्य संमेलन या प्रकाराकडेच तुच्छतेने पाहणारे विचारवंतही अस्तित्वात आहेत याची मला जाणीव आहे. पण मराठी माणूस 'त्यांची मते त्यांच्याकडे' असे समजूनच व्यवहार करीत राहिला ही वस्तुस्थिती आहे.
साहजिकच साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही साहित्यिकांनाही खुणावणारी बाब राहिली आहे. त्याला माझ्यासारख्या साहित्यिकाने अपवाद असायचे कारण नाही. महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा अभ्यासक या नात्याने साहित्य संमेलन हा माझ्यासाठी पहिल्यापासूनच कुतूहलाचा आणि चिंतनाचा विषय होता. काही साहित्य संमेलनांशी मी वेगवेगळ्या नात्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडला गेलो होतो. इतकेच नव्हे तर मी नुकतीच लिहायला सुरुवात केली होती, तेव्हा माझा मित्र प्रा. दादाभाऊ औटी याने 'तू केव्हातरी संमेलनाध्यक्ष होशील' असे भाकीतही केले होते. दुर्दैवाने दादाभाऊंचे अकाली निधन झाल्यामुळे त्याला स्वत:ला आपले भाकीत खरे ठरल्याचे पाहता आले नाही व ती रुखरुख माझ्याही मनाच्या कोपऱ्यात राहून गेली. तरीही संमेलनाध्यक्ष होण्याची मला तातडी नव्हती व त्यामुळे त्यासाठी इतर अनेक जणांनी केली तशी व्यूहरचना वगैरे करण्याच्या फंदात पडण्याचा प्रश्नच माझ्यासाठी उद्भवत नव्हता. जे घडले ते अनपेक्षितपणे.
८८वे साहित्य संमेलन संत नामदेवरायांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान या गावी घ्यायचे साहित्य महामंडळाने ठरवले, तो त्यांनी 'सरहद' या संस्थेच्या निमंत्रणाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद होता. काही मंडळींनी त्याच्याकडे तुच्छतेने पाहून कुत्सित शेरेबाजी करायलाही मागेपुढे पाहिले नाही. तथापि महामंडळ, पंजाब सरकार आणि स्वत: सरहद त्याकडे अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने पाहत होते, याचा प्रत्यय लवकरच आला.
संमेलन नामदेवरायांच्या भूमीत होणार आहे, हे समजल्यावर माझ्यातला 'वारकरी' जागा झाला व मी उत्स्फूर्तपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माझी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नव्हती, मी साहित्यिकांच्या कोणत्याही गटात मोडणारा नव्हतो. पण तरीही मी निवडून आलो याचे श्रेय मतदारांची प्रगल्भता आणि अर्थातच नामदेवरायांची कृपा यांनाच द्यावे लागते.
असो, यथावकाश निवडणूक झाली, मी जिंकलो. नंतर संमेलनही यशस्वीपणे म्हणजे अगोदर वा नंतर कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित न होता पार पडले. त्या व्यासपीठावरून मला माझी साहित्यविषयक भूमिका मांडता आली आणि मराठी साहित्यातील संतांच्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित करता आले, ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब होती. माझ्या समजुतीप्रमाणे संतसाहित्य आणि अर्वाचीन मराठी साहित्य यांच्यातील अनुबंध इतक्या ठसठशीतपणे यापूर्वी कोणत्या अध्यक्षाने मांडला असल्याचे इतिहास सांगत नाही. बहुतेकांचा कल संतसाहित्याविषयी औपचारिक आदर प्रगट करून त्याला वाङ्मयेतिहासाच्या कप्प्यात बंद करण्याकडेच होता.
साहित्य संमेलनाच्या टीकाकारांचा एक मुद्दा संमेलनाच्या उत्सवीपणाचा व संमेलनाध्यक्षांच्या उत्सवमूर्ती म्हणून तीन दिवस मिरवण्याचा असतो. या अध्यक्षाकडे ना कोणता निर्णय घेण्याची क्षमता असते ना कोणत्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार.
या टीकेला उत्तर देताना मी असे म्हटले होते की अध्यक्षाने उत्सवमूर्ती म्हणून तीन दिवस मिरवून घ्यायचे की त्यानंतर वर्षभर काही काम करायचे, हे त्या त्या अध्यक्षावर अवलंबून आहे. म्हणजे हा निर्णय त्याने घ्यायचा असतो. संमेलन यशस्वीपणे पार पडले आणि अध्यक्षाकडे त्याने फिरावे म्हणून ठराविक रक्कम सुपूर्द केली, म्हणजे महामंडळाचे काम संपले. पुढची जबाबदारी संबंधित अध्यक्षांची असते.
मी असे नम्रपणे नमूद करीत इच्छितो की घुमान संमेलनानंतरच्या वर्षभरात मी ही जबाबदारी यथाशक्ती आणि यशस्वीपणे निभावली. या काळात मी कोठे गेलो, कोणत्या विषयावर बोललो याची नोंदवही मी ठेवली होती. त्यानुसार मी म्हणू शकतो की मला मिळालेल्या बहुतेक सर्व निमंत्रणांचा मी आदर केला. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मी गेलो. माझी वाङ्मयीन भूमिका मी मांडली हे एक प्रकारचे प्रबोधनच होते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.
संमेलनाध्यक्षाने हे करण्याची गरज यासाठी आहे की त्या काळात लोक त्याच्याकडे आदरभावाने पाहत असतात. त्याच्या म्हणण्याला एक प्रकारची authenticity लाभलेली असते. या गोष्टीचा त्याने सदुपयोगच केला पाहिजे. आपली टोकाची मते इतरांवर लादायचा त्याला अधिकार नाही. त्याला जे वाटते ते सांगायचे स्वातंत्र्य त्याला अर्थातच आहे. पण ते सांगताना त्याने हे आपले वैयक्तिक मत असल्याचा खुलासाही केला पाहिजे. आपल्या पदाचा दुरुपयोग करीत इतरांबद्दल भडक विधाने करणे त्याने टाळावे. कारण या पदामुळे त्याला जेवढे व्यासपीठ उपलब्ध होत असते तेवढे इतरांना मिळत नसते.
अध्यक्षपदामुळे - म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही जे मांडता त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाते. तुमच्या मांडणीत काही दम असेल तर तिचा उपयोग करून घ्यावा अशी भावनाही समजूतदार व संवेदनशील लोकांमध्ये आपोआपच तयार होते. मला स्वत:ला याचा अनुभव आल्याशिवाय राहिला नाही. संमेलनाच्या निमित्ताने माझा अभ्यास आणि मते यांचा सर्वदूर प्रसार झाला. जितका कदाचित एरवी झाला नसता, किंवा झालाच असता तर त्याला आणखी वेळ लागला असता.
संमेलनानंतर महाराष्ट्र शासनाने माझी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. शासनाचे भाषाधोरण ठरविण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. मी समाधानाने सांगू इच्छितो की आमच्या समितीचे हे काम इमानेइतबारे पूर्णतेस नेले व त्याचा अहवाल शासनाकडे वेळेत सुपूर्दही केला.
हे काम बघूनच बहुधा भाषा समितीची मुदत संपल्यावर शासनाने माझ्याकडे नुकतेच साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद सोपवले आहे. मला वाटते की या प्रक्रियेत संमेलनाध्यक्ष पदाच्या वर्षभर केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसरे असे की अध्यक्ष म्हणून वावरताना कराव्या लागणाऱ्या वाचन, चिंतन, मनन, संवाद यातून माझे स्वत:चे विचारविश्व अधिक समृद्ध झाले, ज्याचा उपयोग मला पुढील कार्यासाठी झाला व होतो आहे.
या निमित्ताने अनेक नव्या माणसांची ओळख झाली, त्यांचा स्नेह लाभला म्हणजेच लोकसंग्रहात भर पडली. या गोष्टीची बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही. या सर्वांचा मी ऋणी राहीन!